
मुंबई : कुलाबा परिसरात नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी खाजगी कंपनीच्या 'सीएसआर'अंतर्गत एकूण २४ हजार झाडांचे वृक्षारोपन केले होते. मात्र, आता बागेचे सुशोभिकरण आणि संरक्षणाच्या कामाच्या नावाखाली पालिकेकडून बागेमध्ये लावलेली झाडे कापण्याचा प्रकार होत आहे. नगरसेविका नार्वेकरांनी याबाबत पालिकेकडे तक्रार दाखल केली आहे.
'कुलाबा वुड गार्डन'मध्ये बागेच्या सुशोभिकरण आणि सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा जाळी उभारण्याचे काम सुरू आहे. एका स्थानिक कंत्राटदाराच्या मार्फत हे काम करण्यात येत आहे. या कंत्राटदाराकडून काम करत असताना बागेतील झाडांना ईजा होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी केला आहे. २०१९ साली नार्वेकरांच्या पुढाकाराने 'सीएसआर'मार्फत ३० वेगवेगळ्या जातीची झाडे या गार्डनमध्ये लावण्यात आली होती. पालिकेनेच वृक्षारोपनासाठी हाती घतलेल्या मियावाकी पद्धतीनुसार या झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र, आता याच वाढलेल्या झाडांवर घाला घालण्याचे काम पालिकेच्या कंत्राटदाराकडून होत आहे.
सुरक्षा जाळी बसवण्याच्या नादात कंत्राटदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या झाडांची नासधूस केल्याचा आरोप नार्वेकरांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार आपण पालिकेकडे केली असून नासधूस झाल्यामुळे कंत्राटदाराकडून दंड आकरण्याची मागणी पालिकेला केली असल्याची माहिती हर्षिता नार्वेकर यांनी दिली. मात्र, या प्रकरणात अनेकदा पालिकेत प्रश्न उपस्थित करूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप हर्षिता नार्वेकर यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.