वाडा : दि.१९ तालुक्यात गेल्या १३ जून पासून मान्सून सक्रिय झाला असून सर्वच भागात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.सर्वत्रच पूरस्थिती तयार झाली असून शेतकऱ्यांच्या हंगामी शेती कामांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शेतीची काम योग्य वेळेत होत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
वाडा तालुक्यात पाच दिवसांपासून सतत कोसळधार सुरुच असून शेतं, ओहळ,नदी, नाळे, दुथडी भरून वाहत आहेत. तसेच शेत जमीन देखील तुडूंब भरून गेल्याने पेरणी कशी आणि कुठे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.सततच्या कोसळधार पावसाने भात पेरणी लांबणीवर पडली आहे.तर काही शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केली असून ती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे.
पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्याची भाताचे कोठार म्हणून ओळख आहे. येथील वाडा कोलम हा देशात प्रसिद्ध आहे.अनेक संकटांवर मात करून येथील शेतकरी हा आपली शेती करीत आहे. परंतू सततच्या मुसळधार पाऊसामुळे शेत तुडूंब भरून गेली आहेत.शेती हंगामातील पहील्याच भात बियाणे पेरणी प्रक्रियेत मोठे संकट ओढविले असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.
भात बियाणांची पेरणी ही योग्य वेळीच व्हायला हवी.कारण पेरणी लांबणीवर गेली तर आपसूकच भात लागवड लांबणीवर पडते.परिणामी उशिरा झालेल्या लागवडीवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन भातशेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी प्रभाकर पाटील ( कोंढले ) यांनी सांगीतले.