नवी दिल्ली - ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षावरील नाराजी व्यक्त केली आहे. एका खाजगी कार्यक्रमादरम्यान रतलाममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. काँग्रेससाठी ही देशातील शेवटची निवडणूक असेल आणि त्यात पक्ष यशस्वी न ठरल्यास तो पुनरागमन करणार नाही, असे ते म्हणाले. सर्वात जुन्या असलेल्या या पक्षाला भविष्यात कार्यकर्ते मिळणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. पक्षात कार्यकर्ते स्वतंत्रपणे काम करत असल्याचे पाहून आपण हताश झाल्याचे, ते म्हणाले.
पक्षाच्या खासगी कार्यक्रमादरम्यान दिग्विजय सिंग यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी विविध गटांमध्ये उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना पाहून त्यांनी विविध गटात उभे न राहण्याचा इशारा कार्यकर्त्यांना दिला. सर्किट हाऊस येथे हा कार्यक्रम झाला. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचे आवाहन केले आणि तसे न केल्यास भविष्यात पक्षाला कार्यकर्ते मिळणे कठीण होईल, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले, “तुम्ही समोरासमोर बोलायला तयार नाही आहात. मी इथे उभा आहे आणि तुम्ही सगळे वेगळ्या दिशेने उभे आहात. असे चालणार नाही. मी तुम्हाला सांगतोय की ही आपल्यासाठी देशातील शेवटची निवडणूक आहे. निवडणूक लढवता येत नसेल तर मनापासून घरी बसा. काँग्रेस पुनरागमन करणार नाही. तुम्हाला कार्यकर्ते सापडणार नाहीत.”