मुंबई :"देशापुढे असलेल्या समस्यांमुळे देशातील परिस्थिती बिघडत आहे. या समस्यांवर कशाप्रकारे मार्ग काढता येईल या विषयावरच आमची चर्चा झाली" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुम्बातील शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत देशापुढील समस्यांकववर चर्चा केली गेली असे सांगण्यात आले. "राजकीय नेत्यांच्या राजकारणासाठी नेहमीच भेटीगाठी होत असतात पण आजची भेट वेगळी होती" असे शरद पवार म्हणाले.
"तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी शरद पवार यांचे सुद्धा योगदान आहे" असे के चंद्रशेखर राव यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली तरी देशात अपेक्षित परिस्थिती दिसत नाही म्हणून लवकरच देशातील इतर नेत्यांशी चर्चा करून बैठक आयोजित केली जाईल असे राव यांनी सांगितले. दरम्यान भाजप विरोधी आघाडीच ही भेट असल्याची शक्यता पुढे येत आहे. चंद्रशेखर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हैद्राबाद भेटीचे आमंत्रण दिले आहे.