शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेनंतर बुधवारी सकाळी त्यांनी एक ट्विट करून “पिता-पुत्र तुरुंगात जाणार, तुरुंगाची खोली ‘सॅनिटाईझ’ केली जाते आहे,” असा दावा केला आहे. खरोखरच एखादी पिता-पुत्रांची जोडी तुरुंगात गेली, तर संजय राऊत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचे किरीट सोमय्या ठरतील. सामान्यतः, किरीट सोमय्या एखाद्यावरच्या ‘ईडी’ चौकशीची शक्यता व्यक्त करतात आणि ती होते, असे आपण सर्वांनी यापूर्वी पाहिले आहे. त्यामुळे, आता संजय राऊत कदाचित महाविकास आघाडीचे किरीट सोमय्या ठरण्याची शक्यता आहे. अर्थात, संजय राऊत यांना ‘किरीट सोमय्या’ असे संबोधणे अजिबातच आवडणार नाही. मुळात, किरीट सोमय्या यांनी पुण्यातल्या ‘जम्बो कोविड सेंटर’च्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून हे कंत्राट राऊत यांच्या जवळच्या एका चहावाल्याला दिल्याचा आरोप केला होता. मंगळवारच्या जवळपास तासाभराच्या तथाकथित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ‘जम्बो कोविड सेंटर’संदर्भात अवाक्षरही काढले नाही. त्याबरोबरच या तथाकथिक चहावाल्याशी आपले संबंध जोडले जात आहेत, त्याबद्दलही ते काहीही बोलले नाहीत.
संजय राऊत यांच्या आरोपांनंतर सोमय्या यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अलिबागमधल्या बंगल्यांबद्दल नवी माहिती जाहीर केली आहे. त्या बंगल्यांशी ठाकरे कुटुंबाचा संबंध नसेल, तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि मंत्री रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी अलिबागमधल्या त्या १९ बंगल्यांचा कर कसा भरला, असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. हा कर बँकेच्या माध्यमातून ‘ट्रान्स्फर’ करण्यात आल्याचाही सोमय्या यांचा दावा आहे. दुसरीकडे मोहित कंबोज-भारतीय यांच्यावर संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर कंबोज यांनी राऊत त्यांच्या घरी गणेशोत्सवाला गेले असतानाचे छायाचित्र समाजमाध्यमांवरून प्रसारित केले आहे. “अनोळखी लोक माझ्या घरी गणेशोत्सवाला येत,” असे सांगून आपण राऊत यांना गरज असताना वेळोवेळी पैसे दिलेले आहेत, असा दावाही कंबोज यांनी केला आहे. एकीकडे काँग्रेससह राष्ट्रवादीनेही राऊत यांच्या समर्थनासाठी पहिल्यांदाच समोर येत पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी राऊत यांच्या समर्थनार्थ कागदपत्रेही देता येतील, असे सांगितले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सार्या रणधुमाळीत दि. १० मार्चनंतर काही बदल अपेक्षित आहेत, असं सूचित करून काँग्रेस पक्षाअंतर्गत अनेकांना धडकी भरवली आहे. महाविकास आघाडीला काहीही धोका नाही, तर दि. १० मार्चनंतर अकार्यक्षममंत्री बदलले जातील, अशा आशयाचं विधान अप्रत्यक्षपणे पटोले यांनी केले आहे आणि ते करताना आपण सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी चर्चा केलेली आहे, हे सांगून गोंधळात गोंधळ वाढवला आहे. राऊत यांची पत्रकार परिषद, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेकांनी दिलेली प्रत्युत्तरे या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून अन्य कोणीही बोलताना दिसत नाही. त्यामुळे राऊत एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ते पुसण्याच्या दृष्टीने राऊत यांच्याशिवाय अन्य एखाद्या मोठ्या नेत्यानेही पुढे येणे गरजेचे होते. तसे न झाल्याने राऊत स्वतःचे युद्ध स्वतः लढत आहेत, असं वाटू लागलंय.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सार्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वेसर्वा मानले जाणारे शरद पवार काहीही बोललेले नाहीत. अर्थात, ते बोलतील, तेव्हा ‘अभ्यासाने प्रकटावे’ या उक्तीचा प्रत्यय देतीलच. पण, तो प्रत्यय सर्वांना येईल तेव्हा तो छगन भुजबळ यांच्यावरील आरोपांनंतर पवारसाहेब अंतिमक्षणी बोलले, तसा आला तर फारच अडचणीचे ठरेल. पण, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे म्हणतात. संजय राऊत इतिहास बदलतात की घडवतात, हे लवकरच समजणार आहे. पण काहीही घडलं, तरी सध्या तरी ते एकटे पडल्यासारखे झालेत, हे मात्र खरं!
- शैलेन्द्र परांजपे