ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात राबवल्या जाणार्या ‘क्लस्टर’ योजनेमुळे अनेक झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प रखडले असून या ‘क्लस्टर’मधील ‘झोपू प्रकल्प’ प्राधिकरणाने न करण्याचे निर्देश रद्द करण्याची मागणी आ. संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.‘क्लस्टर’मुळे त्यातील अनेक प्रकल्प रखडल्याने विकासक हैराण झाले असून त्याचबरोबर घर खाली करणार्या नागरिकांना विकासकाकडून घरभाडे मिळणे बंद होण्याची भिती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात ‘क्लस्टर’चा असलेला अडसर दूर करण्याची मागणी भाजपचे आ. संजय केळकर यांनी पत्रामध्ये केली आहे.
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पनवेल, भिवंडी, मीरा-भाईंदर, वसई-विरार या आठ महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, माथेरान, पेण, अलिबाग व पालघर या आठ नगर परिषद आणि बोईसर ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील मुंबई वगळून उर्वरित क्षेत्रांसाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्र वगळून उर्वरित महाराष्ट्राकरीता एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मंजूर करण्यात आलेली असून त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजना’ राबविण्यात येत आहे. परंतु, ठाणे महापालिका क्षेत्रात ‘क्लस्टर योजना’ राबविण्यासाठी 44 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले असून यामुळे ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’चे काही भूखंड हे नागरी पुनर्निर्माण आराखड्यात समाविष्ट केल्याने त्या योजनेत अडसर निर्माण झाल्याचे आ. संजय केळकर यांनी म्हटले आहे.
‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’चे काही भूखंड हे नागरी पुनर्निर्माण योजनेच्या आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यातील अनेक प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे, प्रस्ताव स्वीकृती, इरादापत्र प्रदान करणे यासाठी मंजुरी प्रदान करण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु, शासनाच्या निर्देशानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना पुढील मंजुरी देणे शक्य होत नाही. तसेच तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरविकास विभागाने पारित केलेले निर्देश रद्द करावे, अशी मागणी आ. केळकर यांनी केली आहे. ठाण्यात ‘क्लस्टर योजने’साठी ४४ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार केले असून त्यात ‘झोपडपट्टी पुनर्विकास योजने’चा समावेश करण्यात आला आहे. परंतु, ‘झोपडपट्टी पुनर्विकास योजने’ची प्रक्रिया पूर्ण होत आलेली असल्यामुळे त्याबाबत प्रथम निर्णय घेण्यात यावा, असेही आ. केळकरांनी त्यांनी म्हटले आहे.