मुंबई : राज्यातील शेतकर्यांना वीजबिल माफ करण्याच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे.
बुलढाण्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची एक जुनी ‘ऑडिओ क्लिप’ ऐकवत शेतकरी वीजबिलावरून त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर फडणवीसांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. “शेतकरी वीजबिल माफीबाबत आमच्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यांच्या सरकारच्या काळात त्यांनी शेतकर्यांना एका नव्या पैशाची सवलत दिली नव्हती. त्यामुळे आमच्यावर टीका करणार्यांनी जनाची आणि मनाचीही ठेवली पाहिजे,” अशा तिखट शब्दांत त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
सोमवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून टीका करणार्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेत त्यांच्या सरकारने केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “वीजबिल माफ करणार, अशी घोषणा आम्ही केली नव्हती. ज्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारने कोरोनाच्या कालावधीत वीजबिल माफ केले होते, त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्रातही व्हावी, अशी आमची मागणी होती. परंतु, महाविकास आघाडीच्या (मविआ) तत्कालीन निर्दयी सरकारने शेतकर्यांना एकही नव्या पैशाची सवलत वीजबिलात दिली नव्हती.
मविआच्या काळात शेतकर्यांची वीजजोडणी तोडणार्या मंडळींनी आमच्यावर बोलू नये,” असे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच, आमचे सरकार जे बोलते ते करून दाखवते. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असल्याने शेतकर्यांची वीजजोडणी तोडू नयेत, असे आदेश दिल्यानंतर संबंधित विमा कंपन्यांना थकबाकी वसुली न करण्याचे शासकीय निर्देशदेखील दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.