मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्प आणि वांद्रे - वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उन्नत मार्गिकेतील अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे. या उन्नत मार्गिकेत परळ आणि प्रभादेवी स्थानकांना जोडणारा उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. ४.५ किमी लांबीच्या या उड्डाणपुलाच्या कामाला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. अद्याप पश्चिम रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मदतीने पूल उभारला जाणार आहे. प्रथमच अशा प्रकारचा कुठलातरी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा उड्डाणपूल दुमजली असेल, अशी माहीती एका अधिकाऱ्याने दिली. स्थानिक वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन मार्गिकांचा पूल आणि त्यावर प्रत्येकी दोन मार्गिकांचा उन्नत मार्ग असेल.
या उड्डाण पुलाची परळ आणि प्रभादेवी स्थानकात लांबी ७४० मीटर तर रुंदी २४ मीटर असणार आहे. एमआरआयडीसी आणि मुंबई महापालिका यांच्याकडून संयुक्तरित्या ११ पूल बांधले जाणार आहेत त्यापैकी हा एक आहे. याशिवाय इतर पुलंच्या कामांना सुरुवात झाली आहे. परळ आणि प्रभादेवी स्थानकाला जोडणारा हा पूल शिवडी - वरळी उन्नत मार्गाला जोडला जाणार आहे. दादर येथील टिळक उड्डाणपूल, रे रोड उड्डाणपूल, भायखळा आणि सॅन्डहर्स्ट रोड दरम्यान असलेल्या ब्रिटीशकालिन पुल पाडून त्याऐवजी वांद्रे सागरी सेतूच्या धर्तीवर केबल स्टेड पूल बांधले जाणार आहेत. सध्या आखलेल्या धोरणानुसार जुने उड्डाणपूल न तोडता प्रथम नव्या पुलांची उभारणी केली जाईल. त्यानंतरच जुने उड्डाणपूल पाडण्यात येतील अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.