भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार : शौर्यभास्कर नेताजी सुभाषचंद्र बोस

    22-Jan-2022
Total Views | 238


subhashcadra bose 1


आझाद हिंद सैन्याला माघारी यावं लागलं. त्यातच हिरोशिमा आणि नागासाकीचा प्रकार घडल्यामुळे जपान शरण आला आणि ‘आझाद हिंद सेने’नेही शरणागती पत्करली. ‘आझाद हिंद सेने’च्यावरचा राजद्रोहाचा खटला हा लाल किल्ल्यावर सुरू झाला. हे वाचून वाचकाला वाटतं ‘आझाद हिंद सेना’ हरली; पण या क्षणापासूनच आझाद हिंद सैन्याचं खरं युद्ध सुरू होतं. तेव्हा, आज याच ‘आझाद हिंद सेने’चे संस्थापक आणि भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त या शौर्यभास्कराचे केलेले हे वीरस्मरण...



अध्यात्मिक उन्नतीसाठी बालपणी घरातूनकेलेले पलायन, ‘आयसीएस’सारख्या सन्मानाच्या नोकरीचा भारतमातेच्या मुक्तीसाठी दिलेला राजीनामा, गांधीजींसारख्या दिग्गजांसोबत असणारे मतभेद व त्याचा त्रिपुरी येथील काँग्रेस अधिवेशनात झालेला अविष्कार, शिवचरित्राचा फक्त जयजयकार न करता त्याचं केलेलं अनुकरण, भारतमातेला गुलामगिरीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी ६० सहस्त्र सैनिकांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवून भारताच्या ईशान्य सीमेवर मारलेलीधडक, युद्धाच्या वणव्यातही फुलून आलेलेत्यांचे जगावेगळे प्रेमजीवन आणि जिवंतपणी भूतकाळात फेकले जाऊन नशिबी आलेले अनामत्व, यांसारख्या नाट्यमय घटनांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र काठोकाठ भरलेले आहे. त्यामुळे ते नेहमीच आबालवृद्धांच्या वाचनांचा, चर्चेचा आणि कौतुकाचा विषय राहिले, यात शंका नाही.


 
पण, अशाप्रकारे सुभाषचरित्राचे वाचन संपवून उठणारा वाचक हा ‘शेवटी सुभाषबाबू अपयशीच ठरले...’ असा हळहळत उठतो आणि स्वातंत्र्य हे ‘चले जाव’ आंदोलनामुळे मिळालं, हा निष्कर्ष काढून मोकळा होतो. हिंदी सैनिक ब्रिटिशांशी प्रामाणिक न राहिल्याने त्यांना भारत सोडून जावं लागलं, असंही बोललं जातं. पण, १९४४ साली अपयशाने सांगता झालेल्या ‘चले जाव’ मुळे १९४७ साली ब्रिटिश कसे काय सोडून जातात? जवळपास १०० वर्षं प्रामाणिक असणारा सैनिक एकाएकी ब्रिटिशांशी बंडखोरी का करतो? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत.दि. २१ ऑक्टोबर, १९४३ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, विदेशमंत्री, युद्धमंत्री आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून शपथ घेतली. जपान, जर्मनी, इटली, चीन, मंचुरिया, ब्रह्मदेश, थायलंड, क्रोआटिया आणि फिलीपाईन्स या नऊ देशांनी या सरकारला मान्यता दिली. दोनच दिवसांनी दि. २३ ऑक्टोबर, १९४३ या दिवशी मित्रराष्ट्रांविरुद्ध युद्धाची घोषणा केली.



‘आझाद हिंद सेने’ने आराकानचे भीषण जंगल, चिंद्विन-इरावतीसारख्या अजस्त्र नद्या, माऊंट पोपाचे उंच उंच कडे पार करून भारताच्या ईशान्य कोपर्‍यावर जाऊन धडक मारली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, इंफाळ आणि कोहिमामधील ब्रिटिश लष्करी अधिकार्‍यांनी आपली होत असलेली पीछेहाट, अन्नधान्याची टंचाई पाहून शरणागतीची तयारी केली. नुकतीच काही वर्षांपूर्वी ब्रिटनच्या ‘नॅशनल आर्मी म्युझियम’ने इंग्लंडने लढलेल्या आणि जिंकलेल्या दहा सर्वोत्कृष्ट लढायांची यादी जाहीर केली. यात नेपोलियनशी लढलेली ‘वॉटर्लूची लढाई’, हिटलरशी लढलेली ‘नॉर्मंडीची लढाई’ यांचा समावेश आहे. याच दहा लढायांमध्ये इंफाळ-कोहिमाच्या युद्धाचा अग्रक्रमाने उल्लेख करण्यात आला आहे. आम्हाला ही लढाई जिंकण्यासाठी पराक्रमाची शर्थ करावी लागली, हे स्वतः ब्रिटिशांनी मान्य केलं आहे. एवढा भीषण आघात ‘आझाद हिंद सेने’ने या लढाईत ब्रिटिशांनी केला होता. इंफाळच्या लढाईला दुसर्‍या महायुद्धाच्या परिभाषेत ’डंकर्क ऑफ द ईस्ट’ असंही म्हणतात; ज्यात ब्रिटिशांचं दोन डिव्हिजन सैन्य जपान्यांच्या घशात जाता जाता वाचलं. पण पुढे पाऊस सुरु झाला. ‘आझाद हिंद सेने’ची रसद रेषा मोडकळीस आली. संपर्काची व्यवस्थाही पावसामुळे नष्ट झाली. त्यामुळे आझाद हिंद सैन्याला माघारी यावं लागलं. त्यातच हिरोशिमा आणि नागासाकीचा प्रकार घडल्यामुळे जपान शरण आला आणि ‘आझाद हिंद सेने’नेही शरणागती पत्करली. ‘आझाद हिंद सेने’च्यावरचा राजद्रोहाचा खटला हा लाल किल्ल्यावर सुरू झाला. हे वाचून वाचकाला वाटतं ‘आझाद हिंद सेना’ हरली; पण या क्षणापासूनच आझाद हिंद सैन्याचं खरं युद्ध सुरू होतं. हे युद्ध रणांगणातलं नसून ब्रिटिश सैन्यातल्या २५ लाख भारतीय सैनिकांच्या मनाशी केलेलं हे युद्ध आहे!



 
लाल किल्ल्यावर हा खटला उभा राहिल्याबरोबर भारतीयांना आजवर अज्ञात असणारा आझाद हिंद सैनिकांचा पराक्रम या खटल्याच्या निमित्ताने हळूहळू माहित होऊ लागला. सामान्य जनतेतील आझाद हिंद सैनिकांची लोकप्रियता वाढू लागली. दिल्ली-मुंबई-कराची-मद्रास या ठिकाणी या सैनिकांच्या समर्थनार्थ लाखोंच्या संख्येत मोर्चे निघू लागले. काँग्रेसच्या सभांना पुन्हा गर्दी होऊ लागली. लोकांचा रेटा पाहून ब्रिटिश सरकारला या सर्व आझाद हिंद सैनिकांना मुक्त करावं लागलं. आझाद हिंद सैनिक आपापल्या गावी परतू लागले. त्यांचे गावोगावी जंगी स्वागत-सत्कार होऊ लागले. त्यांचे होणारे हे सत्कार पाहून, देशभक्त म्हणून झालेला गौरव पाहून अद्याप ब्रिटिश लष्करात असणार्‍या भारतीय सैनिकांना प्रश्न पडला, ’ब्रिटिशांशी बंडखोरी करून त्यांच्याच साम्राज्याशी युद्ध करणारे हे आझाद हिंद सैनिक जर देशभक्त असतील तर आपण कोण? देशद्रोही?’ सैनिकांच्या मनात चाललेली ही चलबिचल ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आली आणि त्यांनी संभाव्य धोका ओळखून तडकाफडकी त्यांचे निशस्त्रीकरण करण्यास सुरुवात केली. ब्रिटिश लष्करातील भारतीयांची संख्या २५ लाखांवरून तीन लाखांवर आणली गेली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. मुंबईतील ’तलवार’ आणि कराचीतील ’हिंदुस्थान’ या जहाजांसहित नाविक दलातील सर्वच्या सर्व म्हणजे ७५ जहाजांवर १९४६च्या सुरुवातीलाचबंडाचे निशाण उभे राहिले.




जबलपूरमधील लष्कराच्या बराकीतही ’जय हिंद’चे घोष निनादू लागले. यात भर म्हणून मुंबईत तीन लाख गिरणी कामगार संपावर गेले. रस्त्यावरून संचलन करत जाणार्‍या ब्रिटिश लष्करावर सामान्य जनतेतून हल्ले होऊ लागले. रस्त्यावर आलेल्या नागरिकांनी दूरसंचार साधनांवर ताबा मिळवला. इंग्लंड आणि भारत सरकार यांच्यातील संवादाचं पुण्यातील खडकी येथील केंद्रही जनतेच्या ताब्यात गेलं. नेहमी इमानदार म्हणून गौरवले गेलेले गुरखेसुद्धा बंडकर्‍यांवर गोळ्या चालवण्यास नकार देऊ लागले. पोलिसांनी कामावर यायचं नाकारलं. सर्वत्र हलकल्लोळ माजला. या बंडाची धास्ती घेऊन गोर्‍या सैनिकांच्या आधाराने भारतातून रातोरात पळून जाण्याची योजनाही ब्रिटिशांनी तयार केली होती, अशी माहिती ‘मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टरेट’ पदापर्यंत पोहोचलेले पहिले भारतीय अधिकारी लेफ्टनंट जनरल सिन्हा यांना सापडलेल्या काही गोपनीय पत्रांतून मिळते. हे बंड परमोच्च स्थितीला पोहोचलं असतानाच, काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यस्थी करून ’आपल्याला हिंसेने मिळालेले स्वातंत्र्य नको’ असा पवित्रा घेऊन आंदोलनकर्‍यांना आपले आंदोलन थांबवायला लावले आणि ब्रिटिशांना फाळणी करण्यास अवधी मिळाला; अन्यथा आजचं चित्र निश्चित वेगळं असतं.




‘आझाद हिंद सेना’ ही एका अर्थाने सावरकरांच्या योजनेचं क्रियान्वयन आहे. सावरकरांनी युद्धाच्या मुहूर्तावर शस्त्र हस्तगत करून योग्य वेळी ते ब्रिटिशांवर रोखण्याची सूचना भारतीय तरुणांना केली होती. सामान्य माणसाला प्रात्यक्षिक करून दाखवलं की, लवकर समजतं. ते प्रात्यक्षिक म्हणजे ‘आझाद हिंद सेना!’ ब्रिटिशांच्या ३५ लाख सैन्यासमोर ५०-६० हजारांच्या आझाद हिंद सैन्याचा निभाव लागणार नाही, हे न कळण्याइतके नेताजी दुधखुळे नव्हते; पण जोपर्यंत ब्रिटिश सैन्यातल्या भारतीयांसमोर या ५० हजारांचं हौतात्म्य साकार होत नाही, तोपर्यंत बंदुका कुणाकडे वळवायच्या हे त्यांना लक्षात येणार नाही, हे जाणून नेताजींनी ’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असं हौतात्म्याचं आवाहन जपानचे युद्धबंदी असणार्‍या हिंदी सैनिकांना केलं. हिंदी सैनिक जपानच्या तुरुंगात भिंतीला टेकून नुसते बसले असते तरी ब्रिटिशांकरवी त्यांच्या भारतातील घरी पगार पोहोचता होत होता. युद्धाची फिकीर नव्हती, त्यामुळे जीव सुरक्षित होता. ‘आझाद हिंद सेने’त सामील झाल्यामुळे ब्रिटिशांकडचा पगार बंद होणार, ‘आझाद हिंद सेने’त पगार मिळण्याचा प्रश्नच नव्हता आणि पुन्हा रणांगणावर उतरावे लागल्यामुळे जीव जाण्याची भीती असं असतानाही ५० हजार सैनिक नेताजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत उभे राहिले आणि धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरे गेले.
त्यामुळे स्वातंत्र्यदिनाची संगतीच लावायची म्हटली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आवाहन-‘आझाद हिंद सेने’चे युद्ध-लाल किल्ल्यावरचा खटला-त्यावरून सुरू झालेले नाविकांचे बंड-त्यामुळे दिसलेला स्वातंत्र्यदिन अशीच लावावी लागेल. इतिहासात अनेक युद्ध ही रणांगणावर जिंकलेली, पण टेबलावर गमावलेली आढळून येतात.




काही युद्ध ही रणांगणात हरलेली, परंतु परिणामांमध्ये जिंकलेली असतात. ‘आझाद हिंद सेने’चं युद्ध हे दुसर्‍या प्रकारचं आहे. नेताजींची ‘आझाद हिंद सेना’ ही रणांगणावर पराभूत झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र विजयी ठरली आहे. हा फक्त तर्क नाही. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान असणारे क्लेमंट अ‍ॅटली यांनी हे मान्य केले आहे. १९५६ साली अ‍ॅटली भारतात आले असताना बंगालचे तत्कालीन गव्हर्नर जस्टीस पी. बी. चक्रवर्ती यांच्याशी झालेल्या एका संवादात चक्रवर्तींनी विचारलं, “ ’चले जाव’ आंदोलनाचे आपण बलपूर्वक दमन केले होते. महायुद्धाचे तुम्ही जेते होतात; मग असं काय घडलं की, तुम्हाला भारताला स्वातंत्र्य देऊन इथून निघून जावं लागलं?” याला उत्तर देताना क्लेमंट ऍटली म्हणाले, “वी लेफ्ट जस्ट बीकॉज ऑफ इंडियन नॅशनल आर्मी अ‍ॅण्ड सुभाष बोस!” मग यात महात्मा गांधींच्या ’चले जाव’ आंदोलनाची कितपत भूमिका होती? चक्रवर्तींनी पुढचा प्रश्न टाकला. उत्तर आलं-“मि-नी-म-ल!”वरील संवाद जस्टीस चक्रवर्तींनी प्रख्यात इतिहासकार आर. सी. मुजुमदार यांना नंतर पत्राद्वारे कळवला आहे.




त्यामुळे सावरकर म्हणतात त्याप्रमाणे स्वातंत्र्याचं श्रेय कुणाचं? तर ज्यांनी ज्यांनी त्याकरिता प्रयत्न केलेत त्या सर्वांचं! अगदी ज्याने घरातल्या देवासमोर बसून हात जोडून भारताच्या स्वातंत्र्याची प्रार्थना केली त्याचंही! पण, जर कुणा एकाच्या नावे हे श्रेय करायचंच असेल, तर ते नाव निर्विवादपणे नेताजी सुभाषचंद्र बोस हेच आहे. नेताजी हे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे विजयी सरसेनापतीआहेत. भारतीय स्वातंत्र्याचे खर्‍या अर्थाने शिल्पकार आहेत. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात पदार्पण करत असताना आणि ७५व्या‘प्रजासत्ताक दिना’च्या दिशेने वाटचाल करत असताना निदान प्रत्येक देशभक्त भारतीय मनाने नेताजींचे हे योगदान समजून घेणं आणि त्यांच्या प्रतिमेभोवती साम्यवादी, हुकूमशाह, परकीय शक्तींचे हस्तक यासारखं जाणून उभं केलं जाणारं मळभ दूर करून स्वातंत्र्य संग्रामाच्या अवकाशातल्या या शौर्यभास्कराला जोडलेल्या हातांनी कृतज्ञतेचं अर्घ्य अर्पण करणं, हीच त्याच्या १२५व्या जयंती वर्षात वाहिलेली सर्वोत्कृष्ट आदरांजली असेल, यात कुठलीही शंका नाही.




- अंबरीष पुंडलीक
(लेखकाच्या ’सुभाष बावनी’ या पुस्तकाचे आजच प्रख्यात व्याख्याते- लेखक- निरुपणकार सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे.)




अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121