नवी दिल्ली : स्टार्टअप्सना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअपची संस्कृती तयार करण्यासाठी केंद्र सरकार कायम प्रयत्नशील आहे. 'स्टार्टअप इंडिया'ला सहा वर्ष पूर्ण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातल्या अनेक तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या सर्व नवोदित तरुणांचे कौतुक केले. स्टार्टअपची संस्कृती देशात दूरवर पोहोचावी या हेतूने १६ जानेवारी हा 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला.
'देशातल्या विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून इनोवेशनबाबत आकर्षण निर्माण करण्यात केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी मुलांना अनेक शाळेत लॅब्समार्फत नव्या कल्पना निर्माण करण्यासाठी संधी दिली जात आहे. या दशकात इनोवेशन, इंटरप्रेन्यूअरशीप आणि स्टार्टअप इकोसिस्टिमला मजबूत करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. इंटरप्रेन्यूअरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून ब्युरोक्रॅटिक्सपासून मुक्त करणे, इनोवेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमची निर्मिती करणे आणि युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणे ही तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.', असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
'गेल्या वर्षी २८ हजारांहून जास्त पेटंट्सला मंजूरी देण्यात आली. २०२०-२१ या कालावधीत अडीच लाखाहून अधिक ट्रेडमार्क्सची नोंदणी करण्यात आली. १६ हजारांहून अधिक कॉपिराईट्सला मंजूरी देण्यात आली. गेल्या काही वर्षातला हा आकडा मोठा असून ग्लोबल इनोवेशन इंडेक्समध्ये भारत ८१ व्या क्रमांकावरून ४६व्या क्रमांकावर आला आहे', असेही ते म्हणाले.