कुडाळ : कोकणातील एकमेव बहुचर्चित चिपी विमानतळाचा गणेशोत्सवाचा मुहूर्तही हुकला आहे. आता नवरात्रोत्सवाचा नवा मुहूर्त खासदार विनायक राऊत यांनी दिली जाहीर केला आहे. "सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ विमान वाहतुकीला पूर्णपणे सज्ज आहे. परवा मी दिल्लीला होतो. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हिएशन सेक्रेटरी, डिजिसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनीचे या सर्वांशी संपर्क साधला असता येत्या ७ ऑक्टोबरला चिपी विमातळावरून विमान वाहतुकीस सज्ज आहे." अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
यापूर्वी चाकरमान्यांना विमानाने कोकणात गणपतीसाठी जाता येणार, अशी जाहिरातबाजी महाविकास आघाडीतील कोकणातील नेत्यानी केली होती. मात्र, आता ७ ऑक्टोबर नवरात्र उत्सवातील पहिला दिवस या दिवसापासून सिंधुदुर्गातून विमान वाहतूक सज्ज आहे. त्या अनुषंगाने त्यांनी त्याची तयारी चालू करण्याची विनंती हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहून विनंती केल्याची खासदार विनायक राऊत यांनी केली.
नवरात्र उत्सवातील पहिला दिवस सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टीने सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल. विमान वाहतूक सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने सुद्धा केंद्र सरकारकडे तशी परवानगी मागावी अशी विनंती विनायक राऊत यांनी केलेली आहे. सिंधुदुर्गात विमानतळ सुरु झाल्याने तळकोकणात जाणाऱ्या प्रवासी आणि चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये कुडाळजवळील या विमानतळासाठी ५२० कोटींचा खर्च करण्यात आला. चिपी विमानतळामुळे देशातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यला पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.