‘सीए’चे विद्यार्थी घडविणारे सुहास आंबेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2021   
Total Views |

CA _1  H x W: 0



विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डोंबिवलीतील ‘सीए’ सुहास आंबेकर यांनी ‘सीए’चे विद्यार्थी घडावेत, याकरिता खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या याकार्याविषयी आपण जाणून घेऊया.


सुहास यांचा जन्म कोकणातील देवरूख येथे झाला. त्यांचा जन्म कोकणाच्या निसर्गरम्य परिसरात झाला असला, तरी बालपण मात्र डोंबिवलीत गेले. ते चार वर्षांचे असताना डोंबिवलीत राहायला आले आणि कायमच डोंबिवलीकर झाले. त्यांचे आई आणि वडील हे दोघेही शिक्षक होते. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत.

सुहास यांचे शालेय शिक्षण टिळकनगर शाळेत झाले. ठाण्याच्या बेडेकर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. ‘सीए’ करायचे हे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. त्यामुळे दादर येथील ‘सीए’ राजेंद्र पाध्ये यांच्याकडे त्यांनी ‘सीए’चे शिक्षण घेतले. ‘सीए’मध्ये ‘इंटर’ आणि ‘फायनल’ या दोन्हीमध्ये दोन ग्रुप असतात. हे दोन्ही ग्रुप त्यांनी पहिल्याच प्रयत्नात क्लीअर केले होते. ‘ऑडिट’ आणि ‘इन्कम टॅक्स’ यामध्ये त्यांची प्रॅक्टिस जास्त आहे.


या व्यवसायात आता त्यांना २५ वर्षे झाली आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘सीए’ विजय शेलार यांच्यासोबत पार्टनरशिप करीत व्यवसायात पदार्पण केले. नंतर त्यांचा भाऊ ‘सीए’ सचिन आंबेकर हेदेखील त्यांना मदत करीत आहे. या व्यवसायात सुहास यांच्यासोबत १२ पार्टनर आहेत. सुहास आणि त्यांचे बंधू हे व्यवसायात पार्टनर तर आहे. पण, ते आजही एकत्र कुटुंबात राहतात. शहरात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावताना दिसत आहे. सुहास यांच्या मते एकत्र कुटुंबांत राहण्याचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे ते स्वत: एकत्र कुटुंबात राहत आहेत.

दिल्लीत असलेल्या ‘आयसीएआय’ या संस्थेची ठाण्यात एक शाखा आहे. या संस्थेमध्ये ‘मॅनेजिंग कमिटी’ असते. त्या ठिकाणी २०१३ ते १६ या काळात दोन वर्षे खजिनदार आणि उपाध्यक्ष अशी दोन पदे त्यांनी भूषविली होती. या पदावर असताना ‘सीए’साठी कार्यक्रम घेणे, मुलांसाठी अ‍ॅडमिशनचे विषय सोडविणे. विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करणे, त्यांना पुस्तके देणे हे सर्व विषय त्या ठिकाणी सोडविले जातात. त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी विविध प्रकारचे कोर्स करावे लागतात. ‘सीए’च्या विद्यार्थ्यांसाठी खास नेहरू मैदानाच्या समोरच एक अभ्यासिका आहे.

‘सीए’ मुलांना अभ्यासासाठी चांगली जागा मिळावी यासाठी ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे. सध्या घरात विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. घरे लहान असतात, अशा विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा फायदा होतो. यामुळे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन अभ्यास करू लागले आहेत. ‘रेफरन्स बुक’ही विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी ‘सीए’चे १०० विद्यार्थी बसतात. सुहास यांनी ‘आयसीएआय’च्या पदावर असताना वरील सर्व कामे करण्यात मोठा हातभार लावला आहे. ठाणे जिल्हा मोठा असल्याने कल्याणला नवीन शाखा उघडण्यात आली. त्यांच्या पहिल्या कमिटीतही ‘सीए’ सुहास निवडून आले. सुहास यांच्या हाताखालून आतापर्यंत ३०पेक्षा जास्त विद्यार्थी शिकून ‘सीए’ झाले आहेत.

आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने २०१३पासून सुहास हे सामाजिक कामांकडे वळले. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कामाची आवड होती. सुहास आणि त्यांचे बंधू सचिन हे दोघेही डोंबिवलीतील अनेक सामाजिक कामात हिरिरीने सहभागी होत असतात. डोंबिवलीतील गावकीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेश मंदिर संस्थानच्या २०१७च्या निवडणुकीत सुहास यांनी सहभाग घेतला होता.


गणेश मंदिरातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सगळ्या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. समाजाचा पैसा पुन्हा समाजाकडे गेला पाहिजे या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम गणेश मंदिर करीत आहे. मंदिरातर्फे सामाजिक, पर्यावरण, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करीत आहे. मंदिरातर्फे आता नुकतीच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘आपत्तीग्रस्त निवारण निधी संकलन’ करण्यात आले होते. या निधीसाठी डोंबिवलीकरांना आवाहन केले होते.

‘कोविड’ लसीकरण मोहीम ही सध्या संस्थानातर्फे राबविण्यात येत आहे. मंदिरात नागरिकांना लसीकरणांची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संस्थानच्या सर्वच कामात सुहास यांचा सहभाग असतो. ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे सदस्य आहेत. २०१९-२० या कालावधीत डोंबिवली जिमखाना येथे ‘मॅनेजिंग कमिटी’वर स्वीकृत सदस्य होते. टिळकनगर शाळेच्या शिक्षण प्रसारक मंडळाचेही ते सदस्य आहेत. टिळकनगर शाळेची इमारत नुकतीच नव्याने बांधण्यात आली आहे. या इमारतीसाठी निधी संकलनाचे कामही सुहास यांनी केले आहे.

सुहास हे टिळकनगर शाळेचे विद्यार्थी असल्याने आपल्या शाळेला सुसज्ज करण्यासाठी आणि भावी विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता त्यांनी निधी संकलन केले. स्वत:चा व्यवसाय सांभाळून ‘सीए’च्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि भविष्यात चांगले ‘सीए’ घडवित यासाठी प्रयत्न करणारे सुहास आंबेकर यांना दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.



@@AUTHORINFO_V1@@