मुंबई, वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांना देखील स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देता येईल. उपोषण व संप करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
विधानमंडळ समिती कक्षामध्ये परिवहनमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह( शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार उपस्थित होते.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये टँकर वाहतूकदार व इतर वाहतूकदारांचे प्रतिनिधी देखील घेण्यात येतील. व्यापार वाढल्याने विकासास फायदा राज्य शासनाला देखील होतो . व्यापार -उद्दीम वाढण्यामध्ये वाहतूकदारांचा मोलाचा वाटा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाहतूकदारांच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. वाहतूकदारांचा विकासात सहभाग महत्वाचा असल्याने त्यांना संरक्षण देणे हे शासनाचे काम आहे.
परिवहन मंत्र्यांनी शहरांमध्ये पार्किंग जागा निर्माण करणे, विशेषतः मुंबई शहरातील खाजगी प्रवासी बसेस, स्कूल व्हॅन, माल ट्रक, टँकर आधी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होईल. परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना यावेळी दिल्या आहेत.
राज्यमंत्री कदम म्हणाले, मुंबई शहरात खाजगी प्रवासी बस व स्कूल बस यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जात आहे. बेस्ट बसेसच्या पार्किंगच्या जागा, हजारोंच्या संख्येने असलेल्या बसेस साठी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. नगर विकास पोलीस व परिवहन विभागाच्या वतीने एकत्रित बैठक घेण्यात येईल. इ चलान बाबत तक्रारीची दखल घेऊन यावेळी पोलीस विभागाला सूचना दिली.
मुख्य सचिव चव्हाण व परिवहन आयुक्त भिमनवार यांनी यावेळी माहिती सादर केली.वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी संप मागे घेण्याबाबतच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बैठकीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, मुंबई बस मालक संघटना, फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर, स्कूलबस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ट्रक लोरी ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र हेवी वेहिकल इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन, वाहतूकदार बचाव कृती समिती या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.