उद्योजकांची भारतालाच पसंती

    26-Aug-2021
Total Views | 92

undex_1  H x W:
 
‘कुशमॅन अ‍ॅण्ड वेकफिल्ड’च्या ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स-२०२१’नुसार भारत चीननंतर दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी अमेरिका दुसर्‍या, तर भारत तिसर्‍या क्रमांकावर होता. यंदाच्या क्रमवारीमुळे अमेरिका आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या तुलनेत ‘मॅन्युफॅक्चरर्स’ भारताला अधिक पसंती देत असल्याचे स्पष्ट होते.

 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत दररोज नवनवीन उपलब्धी प्राप्त करत आहे. त्याची प्रचिती जगभरात भारताची प्रतिमा मजबूत होण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रमवारीतील सुधारणेतूनही येत आहे. आता भारताने पुन्हा एकदा जागतिक पटलावर आपला झेंडा रोवला असून, अमेरिकेला मागे पछाडत जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक आकर्षक ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ झाला आहे. ‘कुशमॅन अ‍ॅण्ड वेकफिल्ड’च्या ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स-२०२१’नुसार भारत चीननंतर दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी अमेरिका दुसर्‍या, तर भारत तिसर्‍या क्रमांकावर होता. यंदाच्या क्रमवारीमुळे अमेरिका आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या तुलनेत ‘मॅन्युफॅक्चरर्स’ भारताला अधिक पसंती देत असल्याचे स्पष्ट होते. ‘कुशमॅन अ‍ॅण्ड वेकफिल्ड’द्वारे जारी केलेल्या क्रमवारीतून युरोप, अमेरिका आणि आशिया-प्रशांतमधील ४७ देशांपैकी ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग’साठी सर्वाधिक फायदेशीर ठिकाणांचे आकलन होते. त्यात भारत दुसर्‍या क्रमांकावर आला असून, त्यासाठी निश्चित असे निकषही आहेत. त्यात देशाची ‘मॅन्युफॅक्चरिंग रिस्टार्ट’ क्षमता, ‘लेबर अ‍ॅण्ड मार्केट अ‍ॅक्सेस’, ‘ऑपरेटिंग कॉस्ट अ‍ॅण्ड रिस्क’-राजकीय, आर्थिक, पर्यावरण या निकषांचा समावेश आहे. भारताने या सर्वच निकषांत उत्तम कामगिरी नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. अर्थात, त्यात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचे विशेष योगदान आहे. कारण, २०१४ साली मोदी सत्तेत आले, त्यावेळी ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स’मध्ये भारत २४व्या क्रमांकावर होता. म्हणजे यावरून मोदींच्या आधी सत्तेत असलेल्या मनमोहन सिंग सरकारमध्ये भारताचे स्थान ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरर्स’च्या दृष्टीने उत्तम नव्हते, हे दिसते. पण, नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी उद्योग-व्यवसायासाठी देशातील परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. त्याच्याच परिणामी सात वर्षांच्या कार्यकाळात भारताने सुमारे २२ क्रमांकाची झेप घेत थेट दुसरा क्रमांक मिळवल्याचे स्पष्ट होते.

भारताच्या उजळलेल्या क्रमवारीचे श्रेय देशातील ‘ऑपरेटिंग कंडिशन’ आणि ‘कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस’लाही द्यावे लागेल. ‘आऊटसोर्सिंग’च्या गरजांची पूर्तता करण्यातील देशाच्या धोरणात्मक यशाचाही त्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे भारताच्या वार्षिक क्रमवारीत सुधारणा झाली. कोरोना महामारीच्या संकटकाळातही मोदी सरकारने संपूर्ण प्रक्रिया सुलभ केली आणि ‘आत्मनिर्भर भारत’सह अनेक आर्थिक पॅकेजेसची घोषणा केली, तसेच भारतीय ‘मॅन्युफॅक्चरर्स’नीदेखील लवचिकता दाखवली. ‘ऑपरेटिंग कंडिशन’ म्हणजेच संचालन किंवा दळणवळणाची स्थिती. दळणवळणाची स्थिती बळकट करण्यासाठी मोदी सरकारने नेहमीच पुढाकार घेतला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींच्या विभागामार्फत देशभरात विक्रमी स्तरावर रस्तेनिर्मिती करण्यात येत आहे. गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार, देशात दररोज तब्बल ३७ किमीच्या महामार्गांची उभारणी होत आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍याला रस्तेमार्गाने जोडण्याचे महत्त्वाकांक्षी कार्य सुुरू आहे. रस्त्यांना विकासाचा, प्रगतीचा मार्ग म्हणतात. त्यांच्या बांधणीने उद्योग-व्यवसाय केवळ एकाच ठिकाणी न एकवटता त्यांचे विकेंद्रीकरणही होते. त्यातूनच रोजगारनिर्मितीही होते व अनेकांना आपल्या जवळपास काम मिळते, म्हणूनच रस्त्यांची स्थिती चांगली असणे, त्यांची निर्मिती होणे गरजेचे असते. रस्त्यांबरोबरच रेल्वेचेही उद्योग-व्यवसायाच्या वाढीतील योगदान वाढले आहे. मालगाडीच्या सुलभ वाहतुकीसाठी भारतात ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ची उभारणी वेगाने केली जात आहे. यामुळे रेल्वेने येणारे साहित्य २५ तासांऐवजी १२ तासांतच संबंधित ठिकाणी पोहोचेल. कारण, हे रेल्वेमार्गांचे जाळे केवळ मालगाडीसाठीच असेल. सोबतच भारतात एकेकाळी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची भीती वाटत असे. पण, ती भीतीही मोदी सरकारने दूर केली आहे. ‘मॅन्युफॅक्चरिंग’ला बळकटी देण्यासाठी सरकारने ‘पीएलआय’ स्किमही लागू केलेली आहे. भारताच्या ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स’मध्ये झालेल्या सुधारणेमागे या महत्त्वाच्या घटकांचे आणि त्यांचा कर्ता म्हणून मोदी सरकारचे योगदान असल्याचे दिसते.

भारतातील उद्योग-व्यवसायाच्या सुलभीकरणाचे प्रमाण ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ क्रमवारीतूनही पाहायला मिळते. २०१४ साली भारताचे या क्रमवारीत १४२वे स्थान होते. २०१५ साली सरकारने २०२० पर्यंत या क्रमवारीत पहिल्या ५० देशांमध्ये येण्याचे लक्ष्य ठेवले. गेल्या वर्षी दिवाळखोरीविषयक कायदा, ‘जीएसटी’ आणि अन्य क्षेत्रांशी संबंधित आर्थिक सुधारणांनंतर भारताने २३ स्थानांची झेप घेत ७७वे स्थान मिळवले, तर आता भारत ६३व्या स्थानावर आहे. केवळ सात वर्षांत इतके मोठे अंतर पार करणारा भारत लवकरच ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये पहिल्या ५० देशांमध्ये सामील होईल, असे वाटते. दरम्यान, विविध जागतिक स्तरावरील क्रमवारीत भारताची सातत्याने सुधारणा होत असतानाही देशांतर्गत विरोधक, तथाकथित विशेषज्ञ, पत्रकार, संपादक वगैरेंकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. केंद्राच्या सत्तेत भाजपचे नरेंद्र मोदी आहेत, केवळ या एका कारणावरूनच असे केले जाते. कारण, हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी विचारधारा उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, देशाला विकासाच्या, प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही, असाच त्या सर्वांचा ग्रह झालेला आहे. म्हणूनच, मोदी सरकारच्या कामगिरीमुळे देशाची जागतिक पटलावरील क्रमवारी सुधारली तरी त्याचे कौतुक सोडा. पण, पुरेशी दखलही घेतली जात नाही. उलट, छोट्याशा बाबीवरूनही विरोधाचेच सूर आळवले जातात आणि आताचे सरकार चांगले नाही, असे ठसवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण, देशातील मोदी विरोधकांनी कितीही आरडाओरडा केला तरी जागतिक स्तरावरील विविध ‘रेटिंग एजन्सी’ त्याला बधू शकत नसतात. सरकार जे काम करत आहे, त्याचे परिणाम दृश्य स्वरूपात त्यांना दिसत असतात. ते पाहून भारत सरकार नेमके कोणते निर्णय घेत आहे, त्यातून उद्योग-व्यवसाय व आर्थिकवृद्धी कशी होत आहे, याचे मापन त्यांच्याकडून केले जाते. ‘कुशमॅन अ‍ॅण्ड वेकफिल्ड’च्या ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स’मध्ये भारताने दुसर्‍या क्रमांकावर घेतलेल्या भरारीतून ते प्रतिबिंबित होते. यातून आगामी काळात भारताची आर्थिक शक्ती सतत वाढती राहील व भारत जागतिक स्तरावर महाशक्ती म्हणून नावारूपाला येईल, याचीही खात्री वाटते.


 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेश अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पुढील वर्षी बांगलादेशात निवडणुका होणार असल्याची घोषणा केली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पदच्यूत केल्यानंतर जेव्हा मोहम्मद युनूस सत्तेत आले, तेव्हा अंतरिम सरकारला विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आजही तो कायम आहे. दुसरीकडे, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि सैन्य यांच्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सर्व सार्वजनिक सभा, मिरवणुका आणि रॅलींवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. युनूस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121