ते कवित्व नव्हे!

    18-Aug-2021
Total Views | 139

kavita_1  H x W

कथा, कादंबरी, नाटक, कविता तसेच लोकवाड्.मयातील गवळणी, भारुडे, लावणी, पोवाडे अशा वाड्.मयीन कलाप्रकाराच्या विविध अंगांनी मराठी वाड्.मय समृद्ध होत गेले. या वाड्.मय प्रकारांनी सर्वसामान्य माणसांचे मनोरंजन केले. त्यातील रसास्वादाचा आनंद रसिक घेत असतात.



पोवाड्यातील वीररसामुळे भोवतालचे वातावरण स्फूर्तिदायक होऊन ऐकणार्‍याचे बाहू स्फुरण पावतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कसा मारला, ही कथा आपण अनेक वेळा ऐकलेली असते. शिवाजी महाराजांचा तो पराक्रम माहीत असूनही आपण जेव्हा अफजलखान वधाचा पोवाडा ऐकतो, तेव्हा आपण थरारून जातो. याचे कारण गाणार्‍याचा आवेश आणि पोवाड्याची शब्दरचना दोन्ही परिणामकारक असतील, तर आपण प्रभावित होतो, या वाड्.मय प्रकाराची निर्मिती करताना लेखकाच्या, कवीच्या अंगी प्रतिभा असावी लागते. विशेषत: काव्य प्रकारासाठी प्रतिभेची आवश्यकता असते. नवरसांनी युक्त काव्याचा आस्वाद घेताना श्रोतृगण भारावून जातो, तो कवीच्या प्रतिभा गुणांमुळे. अनेक कवी शृंगार, वीर, करुण, हास्य इत्यादी रसांचा वापर आपल्या कवितेतून करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात. एकनाथांच्या भारुडातून रुपकांद्वारा आध्यात्मिक विचार लोकांपर्यंत पोहोचवून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले जाते.


तथापि, आज या भारुडांचे सादरीकरण लोकांना हसवण्यासाठी केले जाते. लोकही त्याकडे निखळ मनोरंजन म्हणूनच पाहतात. काही कवी कवितांतून चमत्कृती साधून वाचकाला आश्चर्याचा धक्का देण्याचा आनंद मिळवून देतात. निसर्गपर कवितांतून एका वेगळ्या विश्वात गेल्याचा आनंद मिळतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बालकवींची ‘श्रावणमासी’ ही कविता. ती मन आनंदित करते. शृंगार, वीर, हास्य इत्यादी रसांचा वापर होत असला, तरी त्यात भक्तिरस फारसा आढळत नाही. त्या काव्यांतून निर्विवादपणे मनोरंजन होत असले, तर या कविता लोकोद्धाराचे काम करू शकत नाहीत. भक्तिरसात परमात्म्याविषयी शरणागताची भावना असल्याने त्यातून भक्तांचा अहंभाव कमी होण्यास मदत होते, असा भक्तिरस अनुभवायचा असेल, तर संतवाड्.मयाकडे जावे लागते. काही कवी भक्तिरसात्मक रचना करतात, नाही असे नाही; तथापि त्यांच्या रचनेत संतांसारखी आत्मप्रचिती क्वचितच अनुभवायला मिळते.


तथापि ग. दि. माडगुळकर यांसारख्या प्रतिभावान कवीच्या भक्तिरसपूर्ण कवितांतून ती आत्मियता साधली जाते आणि आत्मप्रचिती अनुभवता येते, पण अशी भक्तिरसाची अनुभूती इतर कवींच्या बाबतीत क्वचितच पाहायला मिळते. याउलट संतवाड्.मयाचा विचार केला, तर संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील संत चोखामेळा, सोयरा, कान्होपात्रा इत्यादी अनेक संतांच्या अभंगांतून येणारी प्रचिती परमेश्वरतत्त्वाच्या जवळ नेणारी आढळते. संत ईशतत्त्वाची आत्मप्रचिती घेतात. साधना करून त्यांची प्रतिभा जागृत झाल्याने ती आत्मप्रचिती ते अभंगांतून, त्यांच्या काव्यातून व्यक्त करतात. ही प्रचिती इतरांना आणून देण्याचे सामर्थ्य संतांपाशी असते. त्यामुळे संतांचे अभंग ऐकताना भक्तिरसाची एक वेगळी अनुभूती येते. संत निरपेक्षपणे लोकोद्धाराचे काम करीत असतात. इतर कवींच्या नवरसात्मक कविता तसे लोकोद्धाराचे काम करीत असतात. पारमार्थिकदृष्ट्या इतर कवींच्या कवितेकडे पाहिले तर हे कवी शृंगार, हास्य आदी रसांतून प्रपंचाची आसक्ती निर्माण करतात. कवींच्या या कवितांतून देहबुद्धी वाढते. देहबुद्धी वाढली की, त्या पाठोपाठ अहंभाव वाढीचा धोका असतोच. अहंभाव, गर्व, ताठा माणसाच्या अधोगतीला कारण ठरतात. एकंदरीत, या काव्यप्रकारांनी भोगवादाला, चंगळ राहणीला तसेच विषय वासनांना प्रोत्साहन मिळत जाते. ही काव्य मनोरंजनाबरोबर देहसुखाची लालसा वाढवतात, यात संदेह नाही. काव्याच्या या अप्रत्यक्ष परिणामांपासून आपला बचाव करता आला, तर त्या काव्यातील निखळ रसांचा आनंद आपण घेऊ शकतो.


 
समर्थांनी दासबोधात कवित्वाचे काही प्रकार सांगितले आहेत. ते त्यांच्या काळाला अनुसरुन असतील, तरीही सामान्यपणे प्रत्येकाला ते माहीत हवेत. त्याचप्रमाणे स्वामींनी कवित्व कसे असावे आणि कसे नसावे, हेही त्यात स्पष्ट केले आहे. त्यासंबंधी चर्चा करण्याअगोदर स्वामींनी दासबोधात चांगल्या ग्रंथांची लक्षणे सांगितले आहेत. ती सर्व चांगल्या काव्यालाही लागू पडणारी आहेत. मागे ‘तो ग्रंथ नव्हे’ या शीर्षकाखाली एक लेख लिहून आदर्श ग्रंथांची स्वामींनी सांगितलेली लक्षणे स्पष्ट केली होती. त्यामुळे आता फक्त त्यातील एक महत्त्वाची ओवी सांगतो. त्यात स्वामींचे उत्तम साहित्यविषयक विचार स्पष्ट झाले आहेत. स्वामी म्हणतात-

जेणे धारिष्ट चढे। जेणे परोपकार घडे।
जेणे विषयवासना मोडे। त्या नाव ग्रंथ॥
ग्रंथाप्रमाणे कवितेच्या बहिरंगापेक्षा कवितेतील विचारांना, त्यातील भावाला अधिक महत्त्व आहे. उत्तम ग्रंथांचे हे गुण काव्याला लावले, तर कवितेच्या वाचनाने माणसाच्या अंगी धैर्य उत्पन्न झाले पाहिजे. त्याच्या ठिकाणी परोपकार करण्याची सद्बुुद्धी निर्माण झाली पाहिजे. देहातून सुख घेण्याची जी प्रवृत्ती माणसात असते, त्या वासनेला आळा बसला पाहिजे. त्या विषयवासनेला नुसते आवरून उपयोगाचे नाही, तर तिचा बिमोड झाला पाहिजे, असे समर्थ सांगतात. उत्कृष्ट कवितेच्या वाचनाने ‘विषयवासना मोडे’ असा शब्दप्रयोग स्वामी करतात आणि तो यथार्थ आहे. समर्थांनी हे गुण उत्तम ग्रंथासाठी म्हणून सांगितले आहेत. शेवटी जाता जाता स्वामींनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
 
जेथे नुपजे विरक्ति भक्ती। तो ग्रंथचि नव्हे॥
ज्याच्या वाचनाने विरक्ती उत्पन्न होत नाही, मन भक्तीकडे वळत नाही, त्याला ‘ग्रंथ’ म्हणता येत नाही. काव्याच्या बाबतीतही असे म्हणता येईल की, ज्या कवितेने विरक्ती भक्ती उत्पन्न होत नाहीत, त्याला काव्य कसे म्हणावे? इतकी उच्च अपेक्षा कवितेकडून नसली, तरी निदानपक्षी काव्य रसाळ तरी असावे. काव्य माणसाला निराळ्या वातावरणात नेऊन मन प्रसन्न करते. पण, ज्या कवींना हेही साधता येत नाही, ते कवी व्यर्थ शब्दांची जुळवाजुळव करीत बसले असून निरर्थक कविता करीत आहेत. अशांना उद्देशून समर्थांनी त्यांचा समाचार ‘कविता गवताऐसी उदंड वाढली आहे’ या शब्दांनी घेतला आहे. तथापि प्रतिभावान कवींना व त्यांच्या लोकोपयोगी काव्याला स्वामींनी मनापासून गौरविले आहे. ते करताना समर्थांची प्रतिभा विलक्षण बहराला आली आहे. या कविश्वरांचे नेमके वर्णन कसे करावे, हे त्यांना सुचत नाही. स्वामी म्हणतात, “या कविश्वरांना अमृताचे मेघ म्हणू की, विवेकाची धनदौलत असलेली कोठारे म्हणू.” पुढे, आपल्या विचार व कल्पना सागराला आवर घालून समर्थ म्हणतात, “या कविश्वरांना साष्टांगभावे नमस्कार करून मी मौन पत्करतो.” तथापि, समर्थांनी मौन पत्करणे त्यांच्या भक्तांना परवडणारे नाही. यासाठी पुन्हा हा विषय दासबोधातील समास 14.3 मध्ये सांगून समर्थ तेथे कवित्वाचे प्रकार आणि कवित्वाचे लक्षणे सांगतात. ती आपण पुढील काही लेखांतून पाहू. (क्रमशः)
- सुरेश जाखडी






 
 
 
 

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121