रक्त आणि पाणी एकाचवेळी वाहू शकत नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
30-May-2025
Total Views |
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे बाधित झालेल्या लोकांची भेट घेतली आणि बाधित कुटुंबांना रोजगार नियुक्ती पत्रे दिली. त्याचवेळी रक्त आणि पाणी एकाचवेळी वाहू शकत नसल्याचा इशाराहील त्यांनी पाकिस्तानला दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूंछ येथील बळींच्या कुटुंबियांना सांत्वन व्यक्त केले आणि सांगितले की पाकिस्तानने निवासी क्षेत्रे आणि धार्मिक स्थळांवर हल्ला केला. जम्मू-काश्मीर सरकारने या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्यासाठी एक योजना लागू केली आहे. तथापि, नुकसानभरपाई आणि सरकारी नोकऱ्या त्यांच्या जीवितहानी भरून काढू शकत नाहीत. सरकार आणि देशाच्या भावना तुमच्याशी जोडल्या गेल्या आहेत, असा दिलासाही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की भारत कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन करणार नाही. याला अचूक आणि आणखी कडक प्रत्युत्तर दिले जाईल. सैन्याने हे केले आहे. पूंछमध्ये अनेक लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. लोकांच्या व्यवसायांचे नुकसान झाले आहे. जम्मू-काश्मीर सरकारने त्या लोकांना मदत केली आहे. केंद्र सरकार त्यांच्यासाठी एक पॅकेज देखील आणेल, असेही आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.