नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. “चर्चेसाठी जोरामथांगा यांनी ऐझॉल येथे येण्याचे निमंत्रण दिले असून सीमावाद गोळीबार प्रकरणी त्यांनी माफी मागितले,” असे सरमा यांनी मंगळवार, दि. २७ जुलै रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “आसामच्या राखीव वनक्षेत्रावर कब्जा करण्याचा मिझोरामचा प्रयत्न आहे. मात्र, आसाम तसे कदापिही होऊ देणार नाही. ज्यावेळी सीमावादप्रकरणी गोळीबार सुरू होता. त्यावेळी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांशी सहावेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या सर्व प्रकाराविषयी माफी मागितली आहे.त्याचप्रमाणे सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी आपल्याला ऐझॉल येथे बोलाविले आहे,” असेही सरमा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन्ही राज्यांमधील सीमावाद हा राजकीय मुद्दा नसल्याचेही सरमा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “दोन्ही राज्यादरम्यानचा सीमावाद हा दीर्घकाळपासून सुरू आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही हा वाद उफाळला होता. त्यामुळे हा दोन्ही पक्षांमधील वाद नसून राज्यांमधील वाद आहे. त्याचप्रमाणे राखीव वनजमिनीवर लोकसंख्येत वसविता येणे शक्य नाही. हा वाद जंगलाविषयी आहे आणि जंगलांना सुरक्षित ठेवण्याचे आसामचे धोरण आहे. त्याचप्रमाणे याविषयी आसाम सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे,” असे सरमा यांनी यावेळी स्पष्ट केले.