डोंबिवली - नाहर मल्टीस्पेशिलिटी रुग्णालयाचे मालक आणि मनसे कल्याण शीळचे विभागाध्यक्ष दिनेश पाटील यांनी मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त सात दिवसांसाठी 53 रूपयांत बेड सेवा देत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांनी खाजगी रुग्णालयामध्ये 5 बेड गोरगरीब रुग्णांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी रुग्णालयाचे व्यवस्थापक अरूण जांभळे यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 14 जून पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 21 जून पर्यत सुरू राहणार आहे. या सात दिवसांच्या कालवधीत येणाऱ्या सर्वच कोविड रुग्णांना ही सेवा देण्यात येणार आहे. यावेळी डॉ. वैभव सिंग, डॉ. हरिश साळुंखे,डॉ. कुणाल गायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जांभळे यांनी सांगितले, कोरोना महामारीने अवघ्या जगात कहर माजविला आहे. अनेकांना आपला प्राण गमाविले आहेत. काहींना आपली नोकरी गमावावी लागली. आर्थिक संकटामुळे अनेकांनी आजारपण अंगावर काढली. गरीबांना थोडा फार का होईना दिलासा मिळावा यासाठी आम्ही ही योजना आणली आहे. यापूर्वी ही रुग्णालयांनी अनेक प्रकारे रुग्णांना मदत केली आहे. ही संकल्पना राज्यात राबविण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांनी सर्व खाजगी रुग्णालयांना आवाहान केले तर एखाद्या रुग्णालयात शंभर बेड आहेत. त्यातील पाच बेड कोरोना रुग्णासाठी कमी दरात उपलब्ध करून देण्यास काहीच हरकत नाही. नाहर रुग्णालयात 53 रूपये बेड दरामध्ये डॉक्टरांचे तपासणी दर, बेड दर नर्सिंग यांचे दर लावण्यात आले आहेत. आयसीयु आणि वॉर्ड अशा दोन्हीसाठी ही सेवा देण्यात आली आहे. सध्या कोविडचे दोन रूग्ण या योजनेखाली उपचार घेत आहेत असे सांगितले.
डॉ. वैभव सिंग म्हणाले, कोरोना काळात सर्वानी कोरोना नियमावलीचे तंतोतत पालन केल्यास तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल. ज्येष्ठांपासून लहान मुलांना पर्यत सर्वाचेच लसीकरण होणे आवश्यक आहे. कोरोना महामारी नियंत्रित आणण्यासाठी सरकारने डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊन काम केले पाहिजे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आम्ही त्यांच्या किंमती रुग्णाला परवडणाऱ्या ठेवल्या होत्या. कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडर किंवा औषधोपचारांचा काळाबाजार हा कोणताही डॉक्टर अथवा रुग्णालय करीत नव्हते. यावर नियंत्रण ठेवणे सरकारचे काम होते, असे ही त्यांनी सांगितले.
----------------------------------------------------------