महाराष्ट्र ही फक्त शूरांचीच भूमी नसून, येथे अनेकानेक इतर गोष्टीही पाहायला मिळतात. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्यात प्रामुख्याने भगवान शंकराची मंदिरे जवळपास सर्वच गावात आढळतात. असे असले तरी त्यातील काही मंदिरंही सर्वार्थाने नेहमीच विशेष असतात. रायगड जिल्ह्यातील नेरळ गावात स्थित असणार्या अशाच एका मंदिराबद्दल आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
नेरळ गावाच्या पश्चिमेला श्री कुसुमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. आज आपल्याला दिसणारे मंदिर हे कौलारू असून चारपाकी आहे. मूळ मंदिर हे साधारण असेच; परंतु आकाराने काहीसे छोटे होते, ज्यावर नळीची कौले होती. नेरळमधील गृहस्थ कै. रावबहाद्दर अनंत गणेश सुगवेकर यांनी शके १८८७ मध्ये म्हणजेच साधारणपणे सन १९६५च्या दरम्यान या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला. पौष कृ. १२, शुक्रवार, शके १८८६मध्ये जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते मंदिराची कोनशिला रचण्यात आली होती. जीर्णोद्धारापूर्वी पुरातन मंदिराच्या जागी पायापासून पुन्हा बांधकाम करून सध्याचे मंदिर उभे राहिले. त्यामुळे सध्या दिसणारी वास्तू जवळपास ५६वर्षे पुरातन आहे. भोवताली सध्या तरी इतके पुरातन मंदिर उपलब्ध नाही.
आज कुसुमेश्वराचे मंदिर नेरळमध्ये राहणार्या धारप कुटुंबीयांची खासगी मालमत्ता आहे. अरुण धारप हे या कुटुंबातील पाचव्या पिढीतील सदस्य आहेत. सध्या तेच या मंदिराची देखरेख करतात. हे सर्व करण्यासाठी धारप कुटुंबीयांनी ‘कुसुमेश्वर देवस्थान समिती’स्थापन केली असून, धारप कुटुंबातील सदस्य या समितीतील सभासद आहेत. कागदोपत्री जरी हे मंदिर धारप कुटुंबीयांकडे असले तरी ते नेरळमधील समस्त ग्रामस्थांचे नेहमीच प्रथम श्रद्धास्थान राहिले आहे. मंदिर आले की, त्याला जोडून आख्यायिका असणे तसे स्वाभाविक असते. पण, कुसुमेश्वरच्या बाबतीत अशी एकही आख्यायिका सांगितली जात नाही. कुसुमेश्वर येथे शेकडो वर्षांपासून विराजमान आहे आणि तो भक्तांसाठी नेहमीच धावून जातो, याबाबतीत मात्र गावात सर्वत्र एकसूर आळवला जातो. परंतु, प्रथम मंदिर कोणी बांधले? शिवलिंग येथे कसे आले? ते येथेच प्रकट झाले की, येथे आणून स्थापले? याबाबतीत सध्या आपल्याला कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. धारप कुटुंबाकडे असणारी अनेक पुरातन कागदपत्रे वाळवी लागल्याने नष्ट झाली, मंदिराबाबतची काही महत्त्वाची माहिती असणारी कागदपत्रेही त्यात नष्ट झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या धारपांच्या पाचव्या पिढीबाबत जरी अंदाज लावला, तरी साधारण २०० ते २५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे देवस्थान येथे आहे. साहजिकच नेरळकर ग्रामस्थ आणि कुसुमेश्वर देव हे नाते गाढ श्रद्धेचे...
सुरवटांच्या भिंती असलेले हे मंदिर कौलारू आहे. मंदिरात हवा खेळती राहण्यासाठी भिंतीत छोट्या-मोठ्या अनेक खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. कौलांतूनच मंदिराचा कळस हळुवार डोकावताना दिसतो. व्हरांडा, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. आतल्या बाजूने पाहिल्यास मंदिराला एकमजल्याचा पोटमाळा आहे. सभामंडपातून असणार्याला कडीजिन्याने आपण वर जाऊ शकतो. हा पोटमाळा लाकडी भाल आणि खांबांनी तोलून धरला आहे. हे लाकडी खांब आपल्याला सभा मंडपात पाहता येतात. कुसुमेश्वर मंदिर पाहिल्यास आपल्याला कोकणातील मंदिरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. लाकडांचे नक्षीकाम आतल्या भागात ठिकठिकाणी पाहायला मिळते. अंतराळात नंदी विराजमान आहेत. गर्भगृहाच्या देवकोष्ठांत अनुक्रमे श्रीहनुमान आणि श्रीगणेश मूर्ती स्थापन केल्या आहेत. गर्भगृहाच्या द्वारललाट बिंबावर श्रीगणेश विराजमान आहे.
दोन पायर्या उतरून गेल्यास आपण श्रीकुसुमेश्वराचे दर्शन घेऊ शकतो, तर शिवलिंगाच्या मागील देवकोष्ठात पार्वतीची उभी मूर्ती आहे. शिवपीठावर पितळी पत्र्याचे आवरण बसवण्यात आले असून, शाळुंका त्या आवरणात न झाकता मोकळी ठेवली आहे. देवाचे उत्सव आणि विशेष दिनी अनुक्रमे चांदी किंवा पितळेचे आवरण शाळुंकेवर घालण्यात येते. गर्भगृहाभोवतीने प्रदक्षिणापाथ आहे. शिवपिंडीवर अभिषेक केलेले पाणी गोमुखातून बाहेर पडते. अलीकडे मूळचे दगडी असणारे गोमुख भग्न झाले आहे. पूर्वी मंदिरात काळ्या पाषाणातील मोठा दगडी नंदी, गर्भगृहातील पार्वती, देवकोष्ठांतील हनुमान व गणेशाच्या दगडी मूर्ती होत्या. परंतु, या मूर्तींची काही कारणांनी झीज झाल्यामुळे त्यांच्याऐवजी सध्याच्या संगमरवरी मूर्ती बसवण्यात आल्या. येथील शाळुंका पाहिल्यास आपल्याला देवाच्या नावाबाबत पडलेले कोडे काही प्रमाणात सुटते. बहुतेक मंदिरांमध्ये आढळणार्या शाळुंकांप्रमाणे येथील शाळुंका काळ्या रंगाच्या पाषाणातील नसून ती एखाद्या सुंदरफुलाच्या कोमल कळीप्रमाणे आकर्षक, नाजूक व रंगाने तांबूस आहे. कदाचित, याच मुळे हे शिवलिंग ‘कुसुमेश्वर’ संबोधले गेले असावे, असे मनोमन वाटते.
मंदिरासमोर मोठाल्या दगडी चिर्यांची दीपमाळ आहे, त्याला लागून चदगडी तुळशी वृंदावन आहे. पूर्वी या तुळशी वृंदावनाला लागून एकमजल्याचा नगारखाना होता, जेथून दररोज पहाटे सनई-चौघडा वाजवला जाई. मंदिराला लागूनच उत्तरेकडे श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे समाधी स्मारक आहे. पूर्वाश्रमीचे खेड येथे राहणारे दिनकर शास्त्री खेडकर यांनी आपल्या उत्तर आयुष्यात संन्यस्थ आयुष्य स्वीकारले. त्यावेळी त्यांनी या मंदिर परिसरातच राहून उपासना व साधना केली. त्यांच्या मृत्यूपश्चात येथेच त्यांचे समाधी स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाच्या उत्तरेला श्रीशितळा देवीचे मंदिर आहे. परंतु, त्यात देवीची कोणतीही मूर्ती पाहायला मिळत नाही. येथे सात टाकांच्या स्वरूपात देवी पूजली जाते. असे मानले जाते की, हे सातही दगडी टाक कोणा एका नतद्रष्टाने शेजारी असणार्या तळ्यात फेकून दिले. परंतु, त्यात दैवीशक्ती असल्याने हे टाक त्या पाण्यावर तरंगू लागले. ग्रामस्थांनी त्याची दाखल घेऊन तेथेच मंदिर बांधून त्यांची स्थापना केली ते हे शितळादेवीचे मंदिर! नवरात्री वेळी दूरदूरहून भाविक येथे दर्शन आणि आपले नवस पूर्ण करण्यासाठी येताना दिसतात. शिव मंदिराच्या दक्षिणेला एक छोटा खोलीवजा मठ होता. त्यात परमपूज्य श्रीमंत दांडेकर महाराजांचे वास्तव्य होते. येथे राहूनच ते आपली साधना करत असत. शिवमंदिराच्या पश्चिमेला मोठे तळे आहे. जे पूर्वी मंदिरासाठीचे असून मागील ५०वर्षांपेक्षा अधिक काळापासून नेरळ ग्रामपंचायतीकडे आहे. सन १९५२ मध्ये नेरळमध्ये भीषण दुष्काळ पडला. त्यात हे तळे पूर्णपणे आटले. या आटलेल्या तळ्यातील गाळ काढून त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढवावी, असा विचार सर्व ग्रामस्थांनी केला. त्यासाठी तळ्यातील गाळाचे वर्गीकरण करण्यात आले व गावातील प्रत्येक एका समाजाने त्या भागातील गाळ उपसून तळे साफ करायला हातभार लावला. या कार्याची सुरुवात त्या काळी सेनापती बापट यांच्या हस्ते पहिली कुदळ मारून करण्यात आली होती.
कुसुमेश्वर मंदिरात दोन महत्त्वाचे उत्सव साजरे केले जातात. त्यातील पहिला उत्सव महाशिवरात्रीपासून सुरू होतो, जो त्या नंतर येणार्या अमावस्येच्या रात्री निघणार्या व संबंध गावातून मिरविल्या जाणार्या पालखीने संपन्न होतो. पालखी पुन्हा मंदिरात आली की, महाप्रसाद असतो. त्यानंतर लळिताचे नारदीय पंथाचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होते, तर दुसरा उत्सव हा ‘श्रावण प्रतिपदा ते भाद्रपद प्रतिपदा’ असा साधारण एक महिनाभराच्या काळात असतो. या दरम्यान, ११ लघुरुद्र तर भाद्रपद प्रतिपदे दिवशी महारुद्र केला जातो. त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री त्रिपुर लावून व संपूर्ण मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई करून छोटा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीतील अष्टमीच्या रात्री कुसुमेश्वरच्या सभामंडपात महालक्ष्मीच्या मूर्तीची पूजा केली जाते, त्यासमोर काही महिला घागर फुंकण्याचा कार्यक्रम साजरा करतात. गजानन महाराजांच्या प्रकटदिनी मंदिरात भाविकांकडून छोटा उत्सव साजरा केला जातो.कुसुमेश्वराच्या पश्चिमेला माथेरानचा डोंगर आणि ‘पेब’ उर्फ ‘बिकट गडकिल्ला’ आहे. पेशवेकालीन साहित्यात नेरळ आणि बिकटगडाचे अनेकदा उल्लेख सापडतात. काही जाणकार आणि अभ्यासकांच्या मते, शिवकाळातही बिकटगडाचे स्थान महत्त्वाचे होते, मग हे मंदिर आणि कुसुमेश्वर देव त्याकाळाचे साक्षी आहेत का? एकंदर विचार केला तर मनाला कुठेतरी असे नक्कीच वाटून जाते.
- ओंकार महाडिक