रत्नागिरी : सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचं तोंड काळं झालं आहे, त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, सचिन वाझे प्रकरण एनआयएकडे द्यावं, अशी आम्ही वारंवार मागणी केली. मात्र गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या वतीने सचिन वाझेला पडद्याआड घालण्याचे प्रामाणिक प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या वतीने केले गेले आहेत. सचिन वाझेला अटक केल्यानंतर, सचिन वाझेचे धागेदोरे किती आतपर्यंत गुंतलेले आहेत याची कल्पना एनआयएने दिल्यानंतर सचिन वाझे किती मोठा गुन्हेगार आहे याची कल्पना लोकांना आली असल्याचं लाड यावेळी म्हणाले.
तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आपण केली असल्याचं लाड यावेळी म्हणाले. या मागणीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही असं सांगितलं आहे. मात्र अनिल देशमुख यांनी जर चांगल्या पद्धतीने काम केलं असतं, तर सचिन वाझेला अटक करायची गरज लागली नसती, असं लाड यावेळी म्हणाले. सचिन वाझे हा एक गुन्हेगार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती, ती गाडी सचिन वाझे यांनी ठेवली असल्याचं कबूल केलं आहे, तसेच जी दुसरी इनोव्हा गाडी होती, ती गाडी देखील पोलिसांचीच होती. याचा अर्थ असा होतो की मुंबई पोलिसांनी साठलोठं करून, मुंबई पोलिसांनीच दहशतवादी कृत्य केलंय, हे समोर येतंय. त्यामुळे ज्या खात्याचे मंत्री, तसेच सचिन वाझेच्या निलंबनाची गरज नाही असं जे गृहमंत्री म्हणत होते, त्या गृहमंत्र्यांचं तोंड आता काळं झालं आहे. त्यामुळे सचिन वाझेची अटक, स्कॉर्पिओमध्ये केलेलं कृत्य आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातून मिळालेली इनोव्हा या सर्व गोष्टी पाहता सचिन वाझे आणि पोलीस खातं किती सहभागी होतं, हे समोर येतंय. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं प्रसाद लाड यावेळी म्हणाले.