भूगर्भातील पाण्याला प्रदूषणाचा घेर; 'या' ठिकाणांवरील पाणी अतिप्रदूषित

    12-Mar-2021   
Total Views | 259

ground water_1  


'एमपीसीबी'च्या अहवालातील माहिती

मुंबई (अक्षय मांडवकर) - ’महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने (एमपीसीबी) २०१९-२० या वर्षात केलेल्या भूगर्भातील पाण्याच्या तपासणीत राज्यातील एकूण २७ केंद्रांवरील पाणी प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील एकूण तीन केंद्रांवरील पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचे नमूद केले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ’जलप्रदूषण गुणवत्ता अहवाल, २०१९-२० ’मध्ये ही आकडेवारी मांडण्यात आली आहे.
 
 
 
’एमपीसीबी’कडून दरवर्षी राज्यातील भूगर्भातील पाण्याची चाचणी होते. यासाठी मंडळाकडून राज्यभरात 66 चाचपणी केंद्र ठरविण्यात आली आहेत. या केंद्रांवर वर्षभरातून दोन वेळा भूगर्भागातील पाणी तपासले जाते. २०१९-२० च्या तपासणीत राज्यातील २० केंद्रांवर पाण्याची गुणवत्ता प्रदूषित आणि सात केंद्रांवर अतिप्रदूषित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. कोल्हापूरमधील पार्वती उद्योग संकुलाच्या बोअरवेलमधील, रत्नागिरी खेडमधील अर्केतवाडी येथील विहिरीतील आणि पुण्याच्या मालेगावमधील गृहस्थ देशमुख यांच्या मालकीच्या विहिरीतील पाणी हे पिण्यायोग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्येही रत्नागिरीतील विहिरीत पाण्याच्या गुणवत्तेचा निर्देशांक (डब्ल्यूक्यूआय) सर्वात जास्त म्हणजे ६८४ नोंदविण्यात आला. यामध्ये प्रदूषणातील विविध घटकांचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा चौप्पट आहेत.
 
 
 
राज्यातील १९ तपासणी केंद्रांवरील पाण्याचे प्रदूषण हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या १९ केंद्रांमध्ये ठाणे जिल्ह्यातील तुर्भे स्टोअर येथील विहीर, फाईव्ह स्टार उद्योग संकुलातील विहीर आणि वसई गोखिवरे- पालघर घरतवाडीमधील बोअरवेलचा प्रामुख्याने समावेश आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे १४ केंद्रांवरील पाण्याची गुणवत्ता ही उत्तम दर्जाची आहे. २०१८-१९ तुलनेत २०१९-२० मध्ये राज्यात भूगर्भागातील पाण्याची उत्तम गुणवत्ता असणार्‍या गटात वाढ झाली आहे. २८-१९ मध्ये या गटात पाच केंद्रे होती, तर २०१९-२० मध्ये १४ केंद्रावरील पाणी उत्तम दर्जाचे असल्याचे तपासणीतून पुढे आले. याशिवाय २५ केंद्रांवर पाण्याची गुणवत्ता चांगली या स्तरावर नोंदविण्यात आली आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121