पालकमंत्री अदिती तटकरेंकडून वन विभागाला सूचना
मुंबई (अक्षय मांडवकर) - रायगड तालुक्यातील गिधाडांच्या अधिवासांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पुढाकाराने वन विभाग आणि 'सिस्केप' संस्थेमार्फत गिधाड संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी चिरगाव येथील राखीव वनक्षेत्राला 'संवर्धन राखीव क्षेत्रा'चा (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्याबरोबरच गिधाडांकरिता उपहारगृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
सद्यपरिस्थितीत कोकणामध्ये गिधाडांची मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते. जिल्ह्यातील म्हासाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांचा अधिवास आहे. याठिकाणी प्रामुख्याने पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. शिवाय स्थलांतर करुन येणाऱ्या हिमालयीन ग्रिफाॅन, युरेशियन ग्रिफाॅन आणि काळ्या गिधाडांची नोंद आहे. गेल्यावर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील गिधाड अधिवासाला धक्का बसला. मात्र, ही परिस्थिती आता पूर्ववत झाली असली तरी चक्रीवादळानंतर गिधाडांची संख्या कमी झाल्याची माहिती 'सिस्केप' संस्थेचे प्रमुख आणि गिधाड अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून महाड येथील 'सिस्केप' ही संस्था जिल्ह्यातील गिधाडांच्या संवर्धनासाठी काम करत आहे.
संस्थेच्या पुढाकाराने येथील गिधाडांचा अधिवासाच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. संस्थेच्या पाठपुराव्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सोमवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह 'सिस्केप' संस्थेचे प्रतिनिधीही उपस्थिती होते. बैठकीमध्ये म्हासाळा तालुक्यातील चिरगावमधील ४४ हेक्टर राखीव वनक्षेत्राला 'काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती रोहा वन विभागाचे उपवनसंरक्षक राकेश शेपट यांनी दिली. या विषयावर आम्ही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच गिधाडांसाठी उपाहारगृह बांधण्यासंदर्भात चर्चा झाली. 'सिस्केप' संस्था मार्च महिन्यामध्ये जिल्ह्यात गिधाडांच्या गणनेचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न करत आहे. रायगड जिल्ह्यात स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने 'इन-सेतू' म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने या संस्थेव्दारे गिधाड संवर्धनाचे काम सुरू आहे.
कोकणातील गिधाडांची परिस्थिती
चिपळूणच्या’सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेने २००६ साली गिधाडांच्या संवर्धनाचा प्रकल्प हाती घेतला होता. याअंतर्गत कोकणपट्ट्यातील गिधाडांच्या घरट्यांच्या संवर्धनाचे आणि त्यांना मुबलक प्रमाणात खाद्य पुरविण्याचे काम करण्यात आले. यासाठी दापोली तालुक्यातील सुकोंडी गावात गिधाडांसाठी पहिले उपाहारगृह बांधण्यात आले होते. कालांतराने या उपाहारगृहाचे नियोजन वन विभागाच्या ताब्यात दिले.वन विभागाने दापोली तालुक्यातील सुकोंडी, मंडणगड तालुक्यातील कळकवणे, म्हसाळा तालुक्यातील चिरगाव आणि श्रीवर्धन तालुक्यातील जासवली या ठिकाणी गिधाडांची उपाहारगृहे बांधली. मात्र, सद्यपरिस्थितीत केवळ म्हसळा तालुक्यातील उपाहारगृह कार्यान्वित असून इतर उपाहारगृहे बंद पडली आहेत. याठिकाणी केवळ गुरांची हाडे विखुलेली पाहावयास मिळतात.कसे का झाले? तर या उपाहारगृहांमध्ये गिधाडांसाठी मृत जनावरे खाद्य म्हणून येऊन पडणे बंद झाले. यापूर्वी उपाहारगृह बांधलेल्या जागेचे भाडे, त्यात मृत जनावरे टाकण्याकरिता दिला जाणारा दोन-तीन हजार रुपयांचा मोबदला आणि जनावराच्या वाहतुकीसाठी येणारा साधारण एक हजार रुपयांचा खर्च वन विभागाकडून येणार्या निधीच्या माध्यमातून पुरविण्यात येत होता. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून निधीच न आल्यामुळे या उपाहारगृहात खाद्य टाकले जात नाही आहे. कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने गिधाडांची घरटी ही नारळ आणि आंब्यासारख्या उत्पन्न देणार्या झाडांवर आहेत. गिधाडांच्या उष्ण विष्ठेमुळे या झाडांना फळ लागत नसल्याच्या तक्रारी बागायतदार करतात. त्यासाठी पूर्वी वन विभागाकडून बागायतदारांना गिधाडांची घरटी असणार्या झाडांची नुकसानभरपाई देण्यात येत होती. मात्र, ही नुकसानभरपाईही आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बर्याचदा बागायतदार घरटे तयार करण्यासाठी आलेल्या गिधाडांना हुसकावून लावतात. २००० सालापासून रायगड जिल्ह्यात ’सिस्केप’ या संस्थेकडून सातत्यपूर्ण गिधाड संवर्धनाचे काम सुरू आहे. गिधाडांचे संरक्षण, संवर्धन आणि संशोधन करण्याचे काम ही संस्था करत आहेत. गेल्या वर्षी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील गिधाडांची घरटी नष्ट झाली होती. नारळ, आंबा, पुनई (जंगली बदाम), साकवीण, वनभेंड, अर्जुन यांसारख्या मोठ्या झाडांवर गिधाडांचे वास्तव्य आहे. मात्र, ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे गिधाडांची घरटी नष्ट झाल्याचे निरीक्षण ’सिस्केप’ संस्थेच्या कार्येकर्त्यांनी नोंदवले होते. परंतु, गेल्या दोन महिन्यांमध्ये गिधाडांचे दर्शन पुन्हा या भागांमध्ये होऊ लागले आहे.