प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ते प्रकाशन करण्याबाबत होणार प्रयत्न
नाशिक: दि. २६ ते २८ मार्च दरम्यान होणार्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’मध्ये आपल्या साहित्यविषयक पुस्तकांचे, ग्रंथांचे प्रकाशन मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते व्हावे, अशी अनेक लेखकांची व लेखिकांची इच्छा असणे स्वाभाविक आहे.
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या नगरीमध्ये स्वतंत्र साहित्य प्रकाशनार्थ व्यवस्था केली जाते. त्यानुसार ‘कुसुमाग्रज नगरी’मध्येही एका स्वतंत्र साहित्य प्रकाशन कट्ट्याची सर्वसमावेशक व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी आकर्षक असे व्यासपीठ असणार आहे. प्रकाशन समारंभाच्या दृष्टिकोनातून तेथे आवश्यक ती ध्वनी व प्रकाश व्यवस्था, व्यासपीठावर टेबल-खुर्च्या असणार आहे. शिवाय रसिक वाचकांच्या दृष्टीने खुर्च्यांची सुयोग्य बैठक व्यवस्थाही असणार आहे. अशा ठिकाणी लेखकाला आपल्या पुस्तकाचे, ग्रंथाचे प्रकाशन करण्याची सर्व व्यवस्था असणार आहे.
संबंधित व्यक्ती अथवा प्रकाशन संस्थेने जर आधी कल्पना दिली, तर संमेलनाच्या निमित्ताने आलेल्या मान्यवर व प्रथितयश साहित्यिकांशी बोलूनही त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे जे पुस्तक अथवा ग्रंथ प्रकाशित होतील, त्याची विक्री व्यवस्थाही करण्यात येईल. ज्या प्रकाशन संस्थेने ते पुस्तक प्रकाशन केले असेल आणि त्यांचा ग्रंथनगरीत स्टॉल असेल तर तेथे विक्रीसाठी ठेवू शकतात. मात्र, त्यासाठी साहित्य संमेलन व्यवस्थेतील संबंधितांना माहिती द्यावी लागेल. तसे निवेदन करून ती पुस्तके विक्रीसाठी ठेवण्याचे नियोजन केले जाणार आहे.
विनामूल्य प्रकाशन व्यवस्था
अशा पद्धतीने प्रकाशन करणार्या व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून रुपये एक हजार अशी रक्कम घ्यावी, अशी एक सूचना आलेली होती. तथापि एकूणच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि साहित्याचाही अधिकाधिक प्रसार व्हावा, या दृष्टीने कोणतेही मूल्य न आकारता, अशी प्रकाशन कट्ट्याच्या माध्यमातून व्यवस्था होणार आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कृपया साहित्यिकांनी, नवोदित लेखकांनी, संबंधित प्रकाशन संस्थांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन आहे.