'मैत्र जपणारे समकालीन कार्यकर्ते'

    14-Feb-2021
Total Views | 365



khedkar_1  H x


स्व-विकसन (self development), उत्कर्ष याबाबत नेहमीच भौतिक जगातील उदाहरणे अनेक आहेत. पण संघटनात्मक काम करणारा एक माणूस अशा ठिकाणी पोहोचतो की, त्या माणसाच्या आयुष्याला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून त्याचा अमृत महोत्सव होतो, त्याची समिती स्थापन केली जाते. गौरव समारंभाला जगातील एका बलाढ्य संस्थेचे सर्वोच्च अधिकारी येतात हे अभूतपूर्व आहे!

लेखन : सुनील खेडकर


आज मुंबईत श्री रमेशजी पतंगे गौरव समारंभ आहे. मी मनाने कार्यक्रमात असणार आहे. पण शरीराने तिथे उपस्थित राहू शकणार नाही. माझी पिढी जी, ८० च्या दशकात मुंबईत, पार्ले भागात शाखा,नगर,भाग स्तरावर काम करीत होती त्यांच्यासाठी रमेशजी, बिमलजी हे उदाहरण स्वरूप होते. मी आदर्श म्हणणार नाही कारण संघात ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या आचरणातून उदाहरण ठेवत असतात. संघानुकुल जीवन पद्धती असा शब्दप्रयोग तेव्हा खूप ऐकायला मिळाला. त्याचे या दोघांव्यतिरिक्त आणखीन एक उदाहरण म्हणजे कै. सुरेंद्र थत्ते. आजच्या कार्यक्रमाला सुरेंद्र हवे होते असे रमेशजींना देखील वाटत असेल इतके मैत्र जपणारे हे तिघे समकालीन कार्यकर्ते आमच्यासमोर होते. त्यात रमेशजींची पार्श्वभूमी थोडी वेगळी अर्थात आर्थिकदृष्ट्या आव्हानत्मक होती. तिथून सुरु झालेला त्यांचा प्रवास ते पूजनीय सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते आज होणारा गौरव आणि त्यासाठी स्थापित केलेली समिती त्याचे अध्यक्ष बिमलजी केडिया हे सारे अद्भुत वाटत आहे. कारण बिमलजी हे एका उद्योजक,संपन्न व्यापारी कुटुंबात वाढलेले! त्या दोघांच्या कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीमध्ये मोठे अंतर होते. पण दोघेही स्वयंसेवक होते. कार्यकर्ते म्हणून एकत्र वाढत होते. रमेशजींनी 'मी, मनू आणि संघ ' या पुस्तकात याबाबत नमूद लिहिले आहे.माझ्या समोर असलेले त्यावेळेचे भाग,महानगर,प्रांत कार्यकर्ते रमेशजी आणि आता एक प्रस्थापित लेखक, विचारवंत, संपादक रमेशजी हे सगळे विलक्षण आहे. हा प्रवास थक्क करून टाकणारा आहे.गौरव ग्रंथात नक्कीच हा प्रवास शब्दबद्ध होईल असे वाटते.


मुंबई महानगर सहकार्यवाह असताना १९८४ मध्ये १ ते १० डिसेंबर दरम्यान वस्तीश: शाखा लावणे हा उपक्रम त्यांनी आग्रहाने कार्यकर्त्यांसमोर आणला, त्याची अंमलबजावणी सर्वच नगरांमध्ये होईल यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर शाखा विस्तारासाठी एक पायंडा पाडला. मुंबई महानगरात त्यावेळी तो एक धाडसी, महत्वाकांक्षी उपक्रम होता. प्रत्येक वर्षी १ ते १० डिसेंबर वस्तीश: शाखा लावणे हा उपक्रम होत असे. आमच्या शांतीनगरमध्ये त्यावेळी १४ वस्त्या होत्या. सर्व वस्त्यांमध्ये शाखा लागली की रात्री एका ठिकाणी एका वहीत त्याचे वृत्त लिहायचे अशी योजना होती. आता ते दिवस मंतरलेले होते असे वाटते.आज पुण्यात प्रत्येक वस्ती शाखांकित असावी आणि उपवस्ती मध्ये संघाचे दृश्य अस्तित्व असावे यासाठी योजना केली आहे. यावरून ३६ वर्षांनी रमेशजींनी केलेला विचार किती द्रष्टेपणाचे होता हे लक्षात येते. याकाळात मी तिथे कार्यरत होतो म्हणून हे लिहू शकतो.


कोणत्या तरी एका प्रशिक्षण वर्गात त्यांनी रीडिंग बिट्वीन द लाइन्स म्हणजे काय ते उदाहरणासहित सांगितले होते. ते आजही उपयोगी ठरत आहे. एकदा एका बैठकीतून (बहुतेक १९९१ मध्ये पुण्याहून मुंबईला) रेल्वेने येताना सर्व रेल्वे स्टेशन वर बहुजन समाज पक्षाचे नाव,चिन्ह, घोषणा रंगवल्या होत्या त्यापाहून मी त्यांना विचारले की यांचे प्रत्यक्ष अस्तित्व नाही तरी यांना हे सगळे कसे जमते? (त्यावेळी हा पक्ष नुकताच अस्तित्वात आला होता). त्यावर त्यांनी सांगितले होते की यांना चर्चचे पाठबळ आहे. पुढे जाऊन याची सर्वांनी प्रचीति घेतली. अजून एक आठवत आहे म्हणजे त्यावेळी बौद्धिक विभागात समाचार समीक्षा असा एक आयाम नवीनच आला होता. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राचे बौद्धिक प्रमुख असलेल्या रमेशजीनी केलेली समाचार समीक्षा ऐकून पुढे एखाद्या घटनेकडे, बातमीकडे कसे पाहायचे त्याचा वास्तुपाठ होता. त्यानंतर तसा अनुभव पुण्यात ज्येष्ठ पत्रकार श्री मोरेश्वर जोशी यांच्या समाचार समीक्षेने आला होता. त्यावेळी कै.सुरेंद्र थत्ते यांच्यासोबत आम्हा २५-३० वयोगटातील कार्यकर्त्यांच्या खूप गप्पा, हास्य विनोद होत असे, बिमलजी हे देखील मोकळेपणाने बोलायचे ठिकाण होते. पण रमेशजी हे भीतीयुक्त आदराचे स्थान होते. अर्थात त्यामुळे त्यांच्या बद्दल असणारी आपुलकी कधीही कमी झाली नाही.


नोव्हेंबरच्या अखेरीस पुणे महानगराने राम मंदिर ते राष्ट्रमंदिर ग्रंथाची नोंदणी १०००च्या पुढे गेल्या बद्दल त्यांनी कौतुक करण्यासाठी मला फोन आला तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. कारण आमच्या वयातील अंतर, माझा त्यावेळी एक बंडखोर, असमंजस कार्यकर्ता म्हणून असणारा त्यांच्यासमोरील लौकिक! मी खूप आणि नको इतके स्पष्ट बोलणारा आणि ते नेमके, मोजके बोलाणारे! आणि आता त्यांनी समोरून केलेला फोन! ते कमी बोलणारे असले तरी जे बोलले त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून मला भरून पावले! सामाजिक समरसता मंच स्थापनेत असणारा त्यांचा सहभाग हा देखील एक ठळक पैलू! त्याबाबत मी इथे लिहू शकत नाही.कारण त्यातील तपशील माहिती नाही. पण ते योगदान देखील मोलाचे आहे हे खचितच! तसेच साप्ताहिक विवेक आणि रमेशजी हे देखील एक समीकरणं आहे. आजच्या कार्यक्रमात त्याबाबत खूप बोललं जाईल. माझ्या घरी विवेक आला की आधी रमेशजींनी लिहिलेला लेख वाचायचा आणि मग मागील दोन पानांवरील वृत्त वाचायचे असा अनेक वर्षांचा शिरस्ता आहे. माझी आई देखील याला दुजोरा देईल. ‘स्व-विकसन’ (self development), उत्कर्ष याबाबत नेहमीच भौतिक जगातील उदाहरणे अनेक आहेत.पण संघटनात्मक काम करणारा एक माणूस अशा ठिकाणी पोचतो की त्या माणसाच्या आयुष्याला ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून त्याचा अमृत महोत्सव होतो, त्याची समिती स्थापन केली जाते. गौरव समारंभाला जगातील एका बलाढय संस्थेचे सर्वोच्च अधिकारी येतात हे अभूतपूर्व आहे! संघानुकूल जीवन पध्दती अंगीकृत केल्यावर स्वतःचे कुटुंब, उत्पन्न याला किती स्थान द्यायचे याचे रमेशजी हे एक अनुकरणीय उदाहरण! त्यांनी स्वीकारलेल्या नोकऱ्या, त्यातून मिळणारे उत्पन्न, त्यातून होणारे घर, त्यामुळे होणारा प्रवासाचा त्रास, यास्थितीत तीन मुलींचे संगोपन आणि त्याचबरोबर सतत सुरु असणारा अभ्यास, ठरवलेले लिखाण त्याच्या परिणामांचे मूल्यमापन! किती गोष्टी लिहाव्यात!

या सगळ्या प्रवासात सौ वहिनींनी दिलेली साथ हे अधोरेखित करायला हवे. संघ कार्यकर्त्याला घरून साथ मिळाली किंवा मिळाली नाही तर काय होते त्याची अनेक उदाहरणे अवतीभवती आहेत. सौ वहिनी यादेखील स्वत:चे उदाहरण समोर ठेवतात.दोघांचे सहजीवन हे देखील कार्यकर्त्यांसाठी एक उदाहरण! घरात तीन मुली वाढत होत्या. त्यांची करिअर, त्यांची लग्ने, नातवंडे या सर्व गोष्टींचे संतुलन त्यांनी कसे केले असेल? तिन्ही मुली वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी व्यावसायिक आहेत हे देखील विशेष! या पार्श्वभूमीवर लिखाणासाठी रमेशजींना वाचन, मनन, चिंतन, लेखन यासाठी जी मोकळीक हवी असेल ती सौ वहिनींमुळे मिळाली असणार. अन्यथा इतकी विपुल ग्रंथसंपदा एका साप्ताहिकाच्या संपादकाकडून निर्माण होवू शकत नाही. मराठीत एखाद्या नियायकालिकाच्या संपादकाची इतकी विपुल वैचारिक ग्रंथसंपदा कदाचित अरुण टिकेकर यांची असेल. जानेवारीच्या अखेरीस सौ वहिनी आणि रमेशजी माझ्या घरी आले होते. सुमारे ३५ वर्षांपूर्वी ते सांताक्रूझच्या घरी आले होते ते एका कार्यकर्त्याच्या भूमिकेत. माझ्या मते यावेळी आले होते ते एक ज्येष्ठसुहृद म्हणून! मला वाटते की हि दैवी योजना होती की आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहता येणार नाही म्हणूनच सौ वहिनी आणि रमेशजी यांचा प्रकट अमृतमहोत्सवी गौरव समारंभाच्या आधी आम्हाला त्यांचा आमच्या घरी पाहुणचार करण्याचा योग आला. माझ्या आईने त्यांना प्रेमाने शाल प्रदान केली आणि पत्नीने सौ वहिनींना साडी देऊन त्यांची ओटी भरली. त्यादिवशी दोघांनाही अनेक जुन्या गोष्टी आठवल्या. खूप छान वाटले! रमेशजी आणि सौ वहिनींचे वैवाहिक जीवन अनेक वर्षे सुखाने, वैचारिक, भौतिक समृद्धीने जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना.
अग्रलेख
जरुर वाचा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121