मनोहारी मनाचे श्लोक

    02-Dec-2021
Total Views | 231

ramdas_1  H x W


 
जे सांगायचे ते समर्थ मनाच्या श्लोकात निःसंदिग्धपणेसांगतात. स्वामी मनाच्या श्लोकांनी रचना करताना तत्त्वज्ञानाच्या भाषेऐवजी सहज समजेल, अशी सोपी भाषा वापरून परमार्थपोषक भक्ती, सदाचार, शुद्ध चारित्र्य, राघवाची निरपेक्ष आराधना इत्यादी गोष्टी समजून सांगतात. स्वामींनी मनाच्या प्रगल्भ अवस्थेत स्वानुभवाचे बोल मनाच्या श्लोकात सांगितले असल्याने त्यातील काही श्लोकांना सुभाषितांचा दर्जा प्राप्त झाला आहे.

 
 
 

‘धन्य ते गायनी कला’ असे म्हणून समर्थांनी गायनीकलेचा गौरव केला आहे. समर्थांचा गायनीकलेचा अभ्यास होता. त्यामुळे त्यांच्या रचनेत लयीचा गोडवा अनुभवता येतो. पारमार्थिक विचार असो, आत्मनिष्ठ, अभ्यासपूर्ण चिंतन असो, ते लयीत मांडण्याची खुबी रामदास स्वामींजवळ आहे. याचा प्रत्यय त्यांनी रचलेल्या आरत्यांतून घेता येतो. गणपती उत्सवात रामदासांनी रचलेल्या आरत्या म्हटल्या जातात. त्या आबालवृद्धांच्या तोंडी सहजपणे येतात. त्या आरत्यांची लोकप्रियताही वर्षानुवर्षे टिकून राहिली आहे. याला कारण म्हणजे त्या आरत्यांतील गेयता, चपखल शब्दरचना,लयबद्धता, शब्दांचे माधुर्य, आघात, भाषेतील ठसका! ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ ही गणपतीची आरती म्हणजे भक्ती आणि गेयता यांचा मधुर संगम आहे. बहुतेक धार्मिक प्रसंगात प्रारंभी समर्थांनी लिहिलेली ही गणपतीची आरती महाराष्ट्रातील घराघरात म्हटली जाते. त्यातील माधुर्य, भक्तिभान लोकांना सुपरिचित आहे, त्याचप्रमाणे ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ ही शंकराची आरती, ‘पंचानन हयवाहन सूरभूषण लिला’ ही खंडोबाची आरती म्हणताना त्यातील गेयता व ठेका अनुपम असल्याचे जाणवते.




हनुमंताची ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ या आरतीतीलशब्दरचना मारुतीची प्रचंड शक्ती, अद्भुत कार्य नजरेसमोर उभे करतात. त्यातील शब्द हृदयावर आघात करीत आपले बल वाढवतात. समर्थ भाषाप्रभू होते. गेयता, लय, उचित शब्दयोजना त्यांच्या समोर हात जोडून उभे राहतात. त्याच गेयता, लयीचा, अर्थपूर्णतेचा प्रत्यय समर्थांच्या मनाच्या श्लोेकात अनुभवायला मिळतो. समर्थ वाड्.मयाचे अभ्यासक ल. रा पांगारकर यांनी असे म्हटले आहे की, “मनोबोधाच्या श्लोकांना दासबोधाच्या बरोबरीचे महत्त्व आहे. चंचल मनाला आवरण्याचे व सुयोग्य वळण लावण्याचे काम अध्यात्मशास्त्र करीत असते. श्रद्धा, निष्ठा, आत्मविश्वास हे गुण मनाशी जोडलेले असतात आणि अध्यात्म त्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. मनावर संस्कार करून ते शुद्ध करून त्याला योग्य वळण लावावे लागते.” संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ ‘मन हेच माणसाच्या बंधनाला आणि मोक्षाला कारण ठरते’ असा आहे.
 

 
मनाला वळण लावण्याचे हे काम दासबोधाप्रमाणे मनाचे श्लोकही करतात, म्हणूनच पांगारकर मनाच्या श्लोेकांना दासबोधाच्या बरोबरीचे मानतात.मनाइतकी लक्षवेधी, आकर्षक, परंतु तितकीच भयावह कठोर मर्मभेदक अशी दुसरी वस्तू नाही. खानदेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी तर मनाला ‘जहरी’ म्हणजे ‘जालीम विषारी’ असे संबोधले आहे. त्या म्हणतात,
 

 
मन जहरी जहरी। त्यांचं न्यारं रे तंतर।
इच्चू साप बरे। त्याले उतारे मंतर॥

 
 
 
 
तसं पाहिलं, तर विंचू-साप या विषारी प्राण्यांचा दंश झाला, तर त्यांचे विष उतरविण्यासाठी मंत्राचा वापर करत. पण, द्वेष-मत्सर-वासना यांनी बाधित झालेले विषारी मन मंत्राने पूर्वपदावर आणता येत नाही. मनातील विष उतरवणे सोपे नसते. असे असले, तरी समर्थांनी मनाच्या श्लोकांद्वारे मनाला बिनविषारी करून जीवाच्या मुक्तीकडे वळवले आहे.जे सांगायचे ते समर्थ मनाच्या श्लोकात निःसंदिग्धपणेसांगतात. स्वामी मनाच्या श्लोकांनी रचना करताना तत्त्वज्ञानाच्या भाषेऐवजी सहज समजेल, अशी सोपी भाषा वापरून परमार्थपोषक भक्ती, सदाचार, शुद्ध चारित्र्य, राघवाची निरपेक्ष आराधना इत्यादी गोष्टी समजून सांगतात. स्वामींनी मनाच्या प्रगल्भ अवस्थेत स्वानुभवाचे बोल मनाच्या श्लोकात सांगितले असल्याने त्यातील काही श्लोकांना सुभाषितांचा दर्जा प्राप्त झाला आहे. लोक त्यातील बर्‍याच ओळींचा वापर म्हणींसारखा करतात. मनाच्या श्लोकांत स्वामींनी पारमार्थिकांसाठी तसेच साधकांसाठी ‘राघवाचा पंथ’ विशद केला आहे. त्यावर सविस्तर चर्चा पुढे येईल.





तथापि, मनाच्या श्लोकांतील बराचसा भाग आत्मोन्नतीसाठी, समाजाची घडी व्यवस्थित बसावी, यासाठीही आहे. अनेक सद्गुणांचा ऊहापोह मनाच्या श्लोकांतून स्वामींनी केला आहे. त्यातून जीवाच्या कल्याणाचा ‘राघवाचा पंथ’ सापडेल, तसेच सामाजिक नीतिमत्ता सुधारून सुसंस्कारी समाज तयार करता येईल. ज्या रामराज्याची स्वप्ने सर्व समाजसेवक निरिच्छ राजकारणी पाहत असतात. त्या रामराज्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. स्वामींच्या मनात हिंदवी स्वराज्य सुराज्य व्हावे, रामराज्य व्हावे, असे होते. शिवरायांचा मनसुबाही रामराज्याला अनुकूल होता, त्यामुळे शिवसमर्थ काळ वैभवाचा होता. तत्त्वज्ञान व शौर्य एकत्र आल्याने तत्कालीन समाजाने सुदिन पाहिले. मनाच्या श्लोकांचा बारकाईने अभ्यास करणार्‍यांच्या लक्षात येते की, त्यात मानसशास्त्र, समाजशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी आधुनिक ज्ञानशाखांना उपयुक्त असे विचार समर्थ सहजपणे हाताळताना दिसतात.



 
विचार मांडताना समर्थ पौराणिक उदाहरणे, दाखले देतात, हे खरे आहे. पण, त्याने सिद्धांताला बळकटी यावी, असा स्वामींचा उद्देश असतो. मनाच्या श्लोकांचा नव्हे, तर एकंदर समर्थ वाड्.मयाचा अभ्यास करताना हे ध्यानात ठेवावे लागते की, समर्थांची भाषा, निवेदन पद्धती ३५० वर्षांपूर्वीची आहे. आजच्या काळातील संदर्भ, जाहिराती, लोककल्पना, त्या काळाला लावता येत नाहीत. तसे करताना आपण कालविपर्यास करीत आहोत, याचे भान काही टीकाकारांना राहत नाही. मनाच्या श्लोकांत स्वामींनी सदाचाराचे महत्त्व जागोजागी सांगितले आहे. स्वामींच्या मनात आदर्श समाजाचे विचार आणि रामराज्याचे स्वप्न होते. लोकजीवनाचा, सामाजिक क्रांतीचा परिणाम समकालीन राजकारणावर दिसून येतो आणि राजकीय उलथापालथीचा परिणाम एकंदर समाजजीवनावर होतो.


 
समर्थांनी मानवी जीवन सुधारण्याचा आणि योग्य दिशेने सामाजिक परिवर्तन घडून आणण्याचा निरपेक्ष भावनेने प्रयत्न केला आहे. स्वामींनी सदाचाराचा, शुद्ध चारित्र्याचा, रामभक्तीचा उपदेश मनाच्या श्लोकांद्वारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांचे हजारो महंत भिक्षेच्या वेळी लोकांत मिसळून मनाच्या श्लोकांचे पठण करीत. ते ऐकून लोकांना त्यातून अनेक विचार, गुण समजत. स्वामिनिष्ठा, हिंदवी स्वराज्याची जाणीव, चारित्र्याचे नीतिमत्तेचे महत्त्व कानावर पडल्याने लोक सदाचाराचा विचार करू लागत. मनाच्या श्लोकांत राघवाचा भक्तिपंथ, आत्मोन्नती असे आध्यात्मिक विचार सांगितले असतील, तरी त्यातून निर्माण होणारे सदाचार, नि:स्वार्थ बुद्धी, धैर्य, नीतिमानता इत्यादी गुण समाजोपयोगी तसेच राष्ट्रासाठी पोषक आहेत. लोककार्यासाठी चंदनाप्रमाणे झिजून आपली कीर्ती सर्वत्र पसरावी हा मनाला केलेला उपदेश आणि नि:स्वार्थ बुद्धीने, निरपेक्ष मनाने सत्कर्मे करत राहण्याची शिकवण मनाच्या श्लोकांतून मिळत राहते. त्यामुळे मनाच्या श्लोकांचे सामाजिक मूल्य दुर्लक्षित करता येत नाही.




समर्थांच्या विचारांना उगीच ‘अध्यात्म... अध्यात्म’ म्हणून भुई बडवण्याची ज्यांना सवय झाली आहे, त्यांनी मनाच्या श्लोकांना धार्मिकतेचा टिळा लावलेला पाहून आपणही त्यांना प्रोत्साहन देऊ लागलो, तर ते आपले करंटेपण ठरेल. मनाचे श्लोक सर्वांसाठी आहेत. त्याचा अभ्यास करून लाभ करुन घेण्यात आपले, समाजाचे आणि राष्ट्राचे हित आहे. कसे ते आपण पुढील लेखांतून पाहणार आहोत. (क्रमश:)






 
अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121