अहिल्यादेवींकडून काशिविश्वनाथाची मुक्ती आणि मोदींचे वारसाजतन

    18-Dec-2021
Total Views | 311



ahilyadevi 2.jpg_1 &
काशिविश्वनाथाचे मंदिर पाडण्यात आले होते. परंतु, १६६९ पासून खंडीत अवस्थेतील मंदिराची आणि ज्योतिर्लिंग स्थानाची पूजा चालू राहिली. शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशितीर्थाची मुक्ती केली. या ऐतिहासिक न्याय आणि प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या घटनेची पुनरावृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशिविश्वनाथ धाम मुक्तीची योजना या लेखाच्या माध्यमातून समजूून घेऊ.


मोहम्मद घौरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने काशिविश्वनाथासह येथील प्रमुख मंदिरे सन ११९४ मध्ये नष्ट केली. नंतरच्या काळात हुसेन शाह सिर्की (१४४७-१४५८) आणि सिकंदर लोधी (१४८९-१५१७) यांनी काशिविश्वनाथ आणि काशीतील इतर प्रमुख मंदिरे नष्ट केली. औरंगजेबाच्या दि. १८ एप्रिल, १६६९च्या हुकुमावरून हे मंदिर पुन्हा पाडण्यात आले. इस्लामी हल्लेखोर पुन्हा पुन्हा काशीवर हल्ले करत राहिले. पण, शिवनगरी काशी पुन्हा हिंदुत्वाच्या अमृताने सजत राहिली.सुभेदार मल्हारराव होळकर यांची छावणी इ. स. १७४२च्या जून महिन्यात काशीत होती. त्यावेळी त्यांनी काशीच्या मंदिराची दुरवस्था पाहून काशिविश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धारकरावा, अशी त्यांची इच्छा होती.मात्र, मशीद पाडून काशिविश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागेल. त्यावेळी काशीत यवन सत्ता प्रबळ होती. सुभेदार मल्हारराव होळकर तेथून निघून जाताच तेथील ब्राह्मणांची हत्या होईल, या भीतीने स्थानिक ब्राह्मणांनी यास विरोध केला व मल्हारराव होळकर यांची काशिविश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांनी ती इच्छा अहिल्यादेवींसमोर पुढे कधी तरी कथित केलेली असावी.



अहिल्यादेवींनी काशीच्या विश्वनाथ मंदिराचे जीर्णोद्धार कार्य हाती घेत न्याय केला आणि मंदिराची प्रतिष्ठाही वाढवली. मंदिरातील नित्यनियमाने होणार्‍या पूजाअर्चेसाठी अडचण निर्माण झाली असता, त्यांनी तारापूरच्या भूमिहार ब्राह्मण परिवारास पुजारी म्हणून नियुक्त केले होते. काशिविश्वनाथ देवस्थानावर झालेल्या हल्ल्यामुळे आणि हत्येमुळे काशीचा एकही ब्राह्मण पुरोहित पदावर तिथे काम करायला तयार होत नसे. इतकी भीती पुरोहित वर्गात निर्माण झाली होती. म्हणून काशिविश्वनाथाचा पहिला पुजारी तारापूरच्या भूमिहार परिवारातील नियुक्त करुन तेथील ब्राह्मण पुरोहित वर्गाची भीती दूर केली.काशिविश्वनाथ मंदिराचे जीर्णोद्धार कार्य सुरू करण्यापूर्वी अहिल्यादेवींनी तेथील जागेचा आणि नियोजित नवीन मंदिराचा आराखडा तयार करून घेत नवीन वास्तू तयार करताना लागणारी जागा तत्काळ विकत घेऊन मोबदला जागीच अदा करावा, असा आदेश पारित करुन होळकर दरबारातील बाळाजी लक्ष्मण यांस काशीला रवाना केले आणि राजस्थान येथील शिल्पकारागिरांना काशिविश्वनाथ मंदिर जीर्णोद्धार कार्यासाठी पाठवून देत मंदिर निर्माण कार्यासाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद काशीपासून जवळ असलेल्या होळकरांच्या कोंच महलमधून व्यवस्था लावून दिली. कोंच परगण्याचा कमावीसदार यांस तसे पत्र पाठवून खर्चाच्या पैशांची विनाविलंब तरतूद करून पै-पैच्या खर्चाच्या नोंदी चोखपणे घेत, हे शिवकार्य अखंडपणे व्हावे यात कोणताही कसूर न व्हावा, अशी सूचना पत्राच्या शेवटी केली होती.




श्रावण शके १७१२ अर्थात १७९० ला श्रावण महिन्याच्या आठव्या दिवशी गुरुवारी भगवान श्री. काशिविश्वनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. सोहळ्यात मोठा यज्ञासह जप करण्यासाठी मोठा मंडप घालण्यात आला होता. काशिविश्वनाथमंदिराच्या जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळ्याची महती सर्वदूर पसरल्याने साधूसंतांनी अहिल्यादेवींना आशीर्वाद देत ‘सर्व भग्न शिवालयांना तुमच्या हातून न्याय मिळावा आणि पुन्हा तेथे महादेवाची पूजाअर्चा सुरू व्हावी,’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती.काशिविश्वनाथ मंदिर जीर्णोद्धारझाल्यानंतर तेथील नियमित पूजाअर्चा तसेच वार्षिक उत्सव सोहळ्यासाठी अहिल्यादेवींनी पंडित मुरारीची नियुक्ती नियुक्ती करुन त्यास तेथे घर बांधून देऊन उदरनिर्वाहासाठी जमीन इनाम दिली.बाळाजी लक्ष्मण याने अहिल्यादेवींच्या स्वप्नातील काशिविश्वनाथाच्या नगरीचा कायापालट करताना काशिविश्वनाथ मंदिरासह इतर १९ वास्तू उभ्या केल्या आहेत, ज्याची नोंद होळकर ‘स्टेट गॅझेट’मध्ये असून, त्यामध्ये पंडित मुरारी निवासस्थान (घर नंबर २० न.प. वाराणसी),होळकर जमादार निवास (घर नंबर २ न.प. वाराणसी), गुल्लारवाडा (न.प वाराणसी), सरकारच्या नियमित कामासाठी म्हणजे पाच घरांचे निर्माण ( घर क्र ६,१०,१४,१५,१६ न.प.वाराणसी),सीतलामाता मंदिराच्या पाठीमागे एक दगडी ओटा निर्माण केला (मालमत्ता क्र. ९९-७ न.प वाराणसी),अहिल्येश्वर मंदिर वाराणसी, मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या घर क्र.१६च्या बाजूला एक चाळ निर्मिती, घर क्र. १७, ७५, ७७ क्रमांकाच्या वास्तू निर्माण, तारकेश्वर मंदिर आणि मनिकर्नेश्वर मंदिर निर्माण, श्री महादेवाची इतर चार मंदिर निर्माण, दशाश्वमेध उर्फ अहिल्या घाट, जनाना घाट, नवाबाच्या नावाने एक बगीचा, रामेश्वर पंचकोशी, कपिलधारा धर्मशाळा, मनकर्णिका घाट, गौतमेश्वर मंदिर, अहिल्याद्वारकेश्वर महादेव मंदिराचा समावेश आहे. काशी येथील दशाश्वमेध घाट वास्तू लोकार्पण विधीसाठी अहिल्यादेवींनी आपले खासगी कारभारी गोविंद रघुनाथ गाणु यांस पाठवून त्यांच्या खर्चाकरिता दहा हजार रुपये दिले होते. यावेळी गोविंदपंत आपल्या कुटुंबांसह काशी येथे गेले होते, तर विश्वनाथ भट मालवी यांस तीन हजार रुपये देऊन काशीस पाठवले. पुढे काशी येथे अन्नछत्र सुरू करण्यासाठी अहिल्यादेवींनी ३५०० रुपयांची तरतूद केली होती. तसेच काशिविश्वनाथाच्या कावडीची ही विशेष व्यवस्था लावून दिली होती.



मनकर्निका घाटावर एक शिलालेख लावलेला असून या शिलालेखातून अहिल्यादेवींनी काशिविश्वनाथाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केलेली आहे.
श्रीमद्धोलकरोपाख्यः ख्यातो राजन्य - दर्पहा । मल्लारिराव - नामा भूत् खण्डेरावस्तु तत्सुतः ॥१॥
विलासी गुणि - कल्पद्रुः शूरो वीरोऽभिशासितः । तत्पत्नी पुण्य - चरिता कुल -
द्वय विभूषिता ॥२॥
अहिल्याख्या, तया काश्यां त्रिषु लोकेषु कीर्तये। बद्धो घट्टः सुसोपानो मणिकर्ण्यः सुविस्तृतः ॥३॥
तत्पार्श्वयोर्विधायेमौ प्रासादावुन्नतौ प्र (पृ.) थक् तयोः पश्चिमदिक्संस्थे स्थापितौ गौतमेश्वरौ ॥ ४॥
प्राक्संस्थे तारकेशांक अहिल्योद्धारकेश्वरः। स्थापिती वसु- देम-विद्युत्सम्मित बैंक्रमे ॥ ५॥
रामेन्दूर्दाध-भू युक्ते शालिवाहनजे शके। राध-शुक्ल-द्वितीयायां गुरौ दुन्दुभि-वत्सरे ॥६॥
घटोत्सर्गः सुसम्पन्नो यजमानाभ्यनुज्ञया। स्वामिकार्य- हितैकेच्छु-जीयाजीराम-
हस्ततः ॥७॥
संवत् १८४८ वैशाख शुद्ध २, गुरुवार॥

काशिविश्वनाथ मंदिराचा आधी न्याय, मग प्रतिष्ठा

काशिविश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन घेतलेल्या निर्णयामुळे भारताच्या धार्मिक अधिष्ठानाचे महत्त्व वाढले असून त्यांनी काशिविश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराप्रसंगी ‘आधी न्याय आणि मग प्रतिष्ठा’ असे धोरण राबवले होते.काशीच्या विश्वनाथाचा वनवास संपवून तेथील साधूसंत आणि महंतांच्या भक्तीला अहिल्यादेवींनी शक्तीची साथ देत काशीच्या विश्वनाथ मंदिराचा भव्यदिव्य स्वरूपात कायापालट करायचा निर्धार केला, जागा मोजणी करुन बाळाजीस त्या वास्तूत कुठे काय काय निर्माण करायचे आहे, याचा आराखडा (झश्ररप)तयार करुन दिला.वाराणसीच्या काशिविश्वनाथाचे हिंदू धर्मात असलेले स्थान आणि मोक्षप्राप्तीची महती ओळखून तेथे काशिविश्वनाथ मंदिर, मनकर्निका घाट, तारकेश्वर मंदिरासह इतर खासगी मंदिरे आणि वाडे बांधकाम हाती घेत काशिनगरीला नावाप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली होती. काशियात्रा हिंदूधर्मीय व्यक्तीसाठी अतिशय पवित्र आणि जीवनाचे सार्थक केल्याचे मानली जाणारी असून तत्कालीन परिस्थितीत काशीला जाण्यासाठी खूप अडचणी होत्या त्या अडचणी महादजी बाबा शिंदे यांनी दूर केल्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सर्वांना पुन्हा एकदा काशियात्रा निर्भयपणे करता येईल, असा विश्वास सर्वांच्या मनामध्ये कोणतीही हिंसा न करता निर्माण केला. हिंदू-मुसलमान असा भेद इतिहासाच्या घटनेतून उभा करण्याचा मुळीच हेतू नाही. मात्र, तत्कालीन काशीच्या दुरवस्थेवर कायमचा तोडगा अहिल्यादेवींनी काढल्यानंतर २५४ वर्षे निरंतर काशी ही संतमहंतांच्या तसेच तीर्थकरु, यात्रेकरुंच्या भक्तिभावाने शिवमय राहिली, हेच त्यांच्या कार्याचे यश आहे.




त्याची पुनरावृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.१३ डिसेंबर रोजी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गादीनिशानाच्या २५४व्या (राज्यभिषेक)दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काशीचा न्याय करुन प्रतिष्ठा बहाल केली आहे.मोदीजींनी काशिविश्वनाथकॉरिडोरबद्दल घेतलेला निर्णय मला वैयक्तिकरित्या राष्ट्रीय अस्मिता बळकट करणारा वाटतो. याकरिता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचे त्रिवार अभिनंदन करतो.आज उभे राहिलेल्या काशिविश्वनाथ धाम निर्मितीसाठी शासनाचे ७० कोटी खर्चून १४०० लोकांचे ४०० कुटुंब स्थलांतरित करण्यात आली. तसेच ३९० कोटी रुपयांना ३१४ घरे खरेदी करण्यात आली. दरम्यान एका मालमत्तेचे १७ मालक होते. त्यांना विश्वासात घेऊन मालमत्ता मिळवली यातील काही सदस्य परदेशात होते. त्यांच्यांशी संपर्क करण्यात आला, तर ४० जुन्या मंदिरांवर अतिक्रमण केलेले होते, ते अतिक्रमण काढण्यात आले.
हर हर महादेव!


 

रामभाऊ लांडे
(लेखक होळकर रियासतीचे अभ्यासक आहेत.)


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121