भारतीयत्वाची भावना बळकट करणारी पंढरीची वारी !
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : विठ्ठलाच्या दरबारात प्रत्येक व्यक्तीला प्रवेश असतो. विठ्ठलभक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, त्यामुळे 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' याची प्रेरणा विठ्ठलभक्तीतूनच प्राप्त झाली आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाचे भुमीपूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील संतसमुदाय उपस्थित होता. पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमास ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले.
भारताचा इतिहास पाहिल्यास देशावर अनेक आक्रमणे झाली. अनेक शतकांची गुलामगिरी सहन करावी लागली, अनन्वित अत्याचार सहन करावे लागले. मात्र, तरीदेखील या सर्व संकटांचा सामना करून पंढरीची वारी अविरतपणे सुरू आहे. जगातील सर्वांत प्राचीन अशी जनयात्रा म्हणजे पंढरीची वारी ठरली आहे. पंढरपुरला पोहोचण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आपापल्या दिंड्या घेऊन निघतात, मात्र त्यांचे गंतव्यस्थान हे एकच असते. त्यामुळे पंढरीची वारी म्हणजे भारताच्या शाश्वत भावनेचे प्रतिक आहे. आपल्या आस्था वेगवेगळ्या असतील, मार्ग वेगळे असतील, पद्धती आणि विचारही वेगवेगळे असतील. मात्र, प्रत्येकाचे ध्येय हे एकच आहे ते म्हणजे भागवत धर्म. त्यामुळे भारतीयत्वाच्या भावनेत बळकटी देण्याचे काम पंढरीची वारी करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंढरीची वारी हे सामाजिक समरसतेचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भेदाभेद अमंगळ ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे, त्यानुसार वारीमध्ये महिला – पुरुष, श्रीमंत – गरीब, उच्च-नीच असा कोणताही भेद नसतो. वारकरी परस्परांना माऊली या नावाने संबोधित करून एकमेकांच्या या पडतात, त्याद्वारे ते मातृशक्तीचाही सन्मान करीत असतात. विठ्ठलाचा दरबार हा समाजातील सर्व घटकांसाठी खुला आहे, त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या माझ्या घोषणेमागील प्रेरणा ही विठ्ठलभक्तीच आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
पालखी मार्गांची निर्मिती करणे माझ्यासाठी भाग्याचे - नितीन गडकरी
महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी असून पंढरपूर हे राज्याचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे पंढरीच्या वारीसाठी पालखी मार्गांची निर्मिती करणे हे माझ्यासाठी अतिशय भाग्याचे आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, २०१९ साली पंतप्रधानांच्या सुचनेनुसार देशातील तीर्थस्थळांचा विकास हा भारतमाला योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल. त्यांअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातील तीर्थस्थळांचा विकास वेगाने केला जात आहे. कैलासमानसरोवर यात्रेसाठी चीनच्या सीमेपर्यंतही महामार्गांची बांधणी अंतिम टप्प्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
असा आहे पालखी मार्ग
दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किमीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पाटस ते तोंडाळे-बोंडाळे असा सुमारे 130 किमीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, या मार्गांचे चौपदरीकरण करून त्यांच्या दोन्ही बाजूंना पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्याचा प्रस्तावित खर्च अनुक्रमे सुमारे 6690 कोटी रुपये आणि सुमारे 4400 कोटी रुपये इतका आहे.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी पंढरपूरचा विविध ठिकाणांहून संपर्क वाढविण्यासाठी विविध राष्ट्रीय महामार्गांवरील 223 किलोमीटरहून अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्प देखील राष्ट्राला केले. यासाठी सुमारे ११८० कोटी रूपये खर्च आला आहे या प्रकल्पांमध्ये म्हसवड - पिलीव - पंढरपूर (NH 548E), कुर्डुवाडी - पंढरपूर (NH 965C), पंढरपूर - सांगोला (NH 965C), NH 561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि NH 561A चा पंढरपूर - मंगळवेढा - NH 5-A या रस्त्यांचा समावेश आहे.