बौद्धिक दिवाळखोर दिवाळी

    07-Nov-2021   
Total Views | 93

Libral _1  H x
बळीराजाच्या खुनाची दिवाळी
मनुवादी आणि जातीवादी अशी ही दिवाळी
 
 
दिवाळी सुरू झाली की, अशा खुनाखुनीच्या ‘ट’ला ‘प’ जोडणार्‍या कवितांचा कुजका नासका रतीब घालणारे अगदी कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात, असे उगवतात. तर्कहीन अतार्किक किती आणि कसे बोलू शकतो, याचे अतिशय घाणेरडे उदाहरण म्हणजे ही लोकं. यांची एक न्यारीच दुनिया. ज्या दुनियेत लोकांच्या आदर्शाबद्दल, आनंदाबद्दल यांना कमालीचा आकस असतो. तर अशी ही यांची द्वेषाची, मत्सराची आणि आकसाची हिडीस दुनिया. लोक आंनदाने श्रद्धेने सण साजरा करत असतात आणि या हिडीस दुनियेच्या लोकांचे मध्येच रडगाणे पिरपिर-किरकिर सुरू असते. हिंदू मान्यतेच्या प्रत्येक सणांबाबत यांचा एक इतिहास असतो. तो इतिहास नेमका रामायण-महाभारत वगैरेशी निगडित असतो. धर्मग्रंथांमध्ये जे खलनायक आहेत, तेच यांच्या इतिहासात नायक असतात. आता यावरही आक्षेप घेण्यासारखे काही नाही. यांना रावण आवडो, कंस आवडो, वा दुर्योधन आवडो, ती यांची चॉईस. पण, ही चॉईस सांगताना दुसर्‍यांच्या श्रद्धांना दुखावण्याचा हक्क यांना कोणी दिला? कधी कधी वाटते यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. कारण, दिवाळी साजरी करू नका, आपल्यासाठी ती दुःखाची आहे, म्हणणार्‍या या लोकांनी दिवाळीचा बोनस वगैरे जर मिळत असेल तर तो नाकारला असेल का? जर काही उद्योग-व्यवसाय असतील, तर ते बंद ठेवले असतील का? शक्यच नाही. कारण, दिवाळीचे प्रचंड उत्साहवर्धक अर्थचक्र यांनाही माहिती आहे. देशात गरिबातला गरीबही हा सण आनंदात जावा म्हणून महिनोन्महिने कष्ट करतो. नियोजन करतो. गरिबांना आणि दुःखितांच्या जीवनात आनंदाचे कारण निर्माण होणे गरजेचे आहे. या वर्षीची दिवाळी हे जनतेच्या आनंदाचे कारण बनली. नुकतीच ‘सीएआयटी’ने आकडेवारी जाहीर केली की, यंदाच्या दिवाळीतील खरेदीने दहा वर्षांचा विक्रम मोडला. सण-उत्सव भारतीय संस्कृती आणि समाजजीवनाचा आत्मा आहेत. हा आत्मा संस्कृती आणि समाजापासून कुणीही दूर करू शकत नाही. मात्र, जनतेच्या मनातली ही दिवाळी या बौद्धिक दिवाळखोर लोकांना कधी कळणारच नाही. खून, मनू, आर्य, द्रविड यातच बिचार्‍यांची हयात आणि नसलेली अक्कल वाया जात आहे. बिचारे बौद्धिक दिवाळखोर!
 
 

काम करू नका : एक शपथ

 
 
क्रांती रेडकर किंवा आर्यन खान वगैरे वगैरेशी गृहनिर्माण खात्याचे काही देणे-घेणे नसूच शकते. पण, तरीही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे ‘हमाम में सब नंगे’ आहेत. यावरून कळते की, महाविकास आघाडीचे मंत्री त्यांच्या खात्याच्या नेमके विरुद्ध काम करतात. जसे धनंजय मुंडे यांच्याकडे खाते काय? आणि या खात्याचे काम करताना त्यांनी केले काय? या सगळ्यावर कडी म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री. त्यांना तर त्यांच्याच सहकार्‍याने ‘हू’पेक्षा श्रेष्ठ ‘कोविडोलॉजिस्ट बेस्ट सीएम’ पदवी दिली. पण, मुख्यमंत्री म्हणून जनतेसाठी मंत्रालयात जाण्याची तसदी त्यांनी घेतल्याचे ऐकिवात नाही. तर अशा या महान मंत्रिमंडळाचे असेच एक मंत्री नवाब मलिक. महाविकास आघाडी सरकारने खुलासा करावा की, नवाब मलिक हे कोण आहेत? ते अल्पसंख्याक मंत्री आहेत की, आर्यन खानचे वकील? अल्पसंख्याक खात्याचे मंत्री म्हणून सध्या त्यांच्याकडे एकच काम आहे ते म्हणजे आर्यन खान कसा निर्दोष, निरागस, सोज्वळ आहे वगैरे वगैरे सिद्ध करणे. आर्यन हा काय अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करतो का? त्याने असे कोणते समाजहिताचे आणि देशहिताचे काम केले की, महाविकास आघाडीचा मंत्री २४ तास आपली सगळी ऊर्जा, सगळी ताकद आर्यन खानसाठी वापरत आहे? नवाब मलिकसारखे नेते अल्पसंख्याक समाजाची प्रतिमा देशासमोर काय ठेवतात? अल्पसंख्याक समाजापुढे असंख्य प्रश्न आहेत. शिक्षणाच्या संधी मिळत असूनही मदरशाचे शिक्षण घ्यायला प्राधान्य, आम्ही ८०० वर्षे या देशावर राज्य केले, या मानसिकतेचा नवाबी अहंकार मनात बाळगत कायदा सुव्यवस्थेला आव्हान द्यायची मानसिकता, देशाच्या संविधानापेक्षा कुण्याही मौलवीने दिलेला फतवा मोठा आणि तो मान्य करायचाच ही विवशता, आपली ओळख टिकवण्यासाठी कालबाह्य परंपरा-रूढी यांचे पालन, या सगळ्यामुळे आधुनिक प्रगतिशील समाजाच्या प्रवाहातून झालेले अलगीकरण, त्यातून मंदावलेले अर्थचक्र, आलेली व्यसनं आणि गुन्हेगारी हे सगळे सगळे प्रश्न अल्पसंख्याक समाजापुढे राक्षसासारखे उभे आहेत. या प्रश्नांसाठी नवाब मलिक यांनी काय केले?असो. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्री आपल्या खात्याचे काम सोडून भलतेच काम करतात, हे पाहून वाटते की, या सगळ्यांना मंत्री बनवण्याआधी स्वतःच्या खात्याची कामं करू नका, अशी बंद दाराआड आतून शपथ दिली की काय, देव जाणे?



योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी; तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई!

मराठी चित्रपट 'जारण'ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही 'जारण'ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच 'जारण'ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे. हा प्रवास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, भावनिक गुंतवणूक, आशयघन कथा आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ आहे. चित्रपटाला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121