नवी दिल्ली : 'माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही तर पारंपरिक आणि रक्ताचा संबंध आहे. माझं सिंधुदुर्गासोबतही संबंध आहे. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचे प्रतिक आहे. मी ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. पण छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते, असे उद्गार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी काढले.
ते म्हणाले, "शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आम्हा मराठ्यांचा गौरव क्षण आहे. आमची सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. हे तीन दशकांचं संकट होतं. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं माझ्या वडिलांचं विमानतळाचं एक स्वप्न होतं."
"रेल्वे मंत्री असतानाही कोकणात रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद आणि अभिनंदन करतो. गोव्याची प्रसिद्धता आम्हाला सिंधुदुर्गात हवी आहे. इथे पर्यटनाचं केंद्र आम्हाला पाहिजे. आज सुरुवात झाली. ही फक्त सुरुवात आहे. पाचशे किमीचं अंतर पन्नास मिनिटात पार करणार आहोत. पुढच्या काही दिवसात २०-२५ फ्लाईट सिंधुदुर्गात आल्या पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी लोकल फॉर ग्लोबलची घोषणा केली आहे. आम्ही सिंधुदुर्गाचा नक्कीच तसा विकास करु. पंतप्रधानांच्या नेतृत्वात काम करु. आम्ही सर्व एकत्र येऊन काम केलं तर असंभव कार्यक्रम करून दाखवू", असेही ते म्हणाले.