शहरी माओवादीच नक्षल चळवळींचे अध्वर्यू!

महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन

    01-Oct-2021
Total Views | 169

maoist_1  H x W
 
 
 
पुणे : “सर्वसामान्यांना अनेकदा प्रश्न पडतो की, नक्षल चळवळ का संपत नाही? याचे खरे कारण म्हणजे हे शहरी माओवादी. शहरी माओवादी हेच खरे या चळवळीचे अध्वर्यू आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गुरुवार, दि. ३० सप्टेंबर रोजी येथे केले.
 
नक्षल चळवळींचे अभ्यासक भरत आमदापुरे लिखित ‘शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी पुण्यातील पत्रकार भवनात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रवीण दीक्षित यांनी भूषवले. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार, व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर, ‘विवेक विचार मंच’चे कार्यवाह महेश पोहनेरकर आणि ‘अधिवक्ता परिषद पुणे’चे अ‍ॅड. सागर सातपुते उपस्थित होते.
 
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रवीण दीक्षित म्हणाले की, “आपल्याला कल्पना आहे की, नक्षल चळवळीच्या पूर्वी माओवादी चळवळ आणि माओवादी चळवळीच्या पूर्वी ‘कम्युनिस्ट चळवळ’ सुरू झाली होती. १९१७ साली ‘बोलशेविक रिव्हॉल्युशन’ सुरू झाली होती. ज्यावेळेला रशियामध्ये लेनिन यांनी जाहीर केले होते की, जे काही लोकशाहीमध्ये असलेल्या त्रुटी आहेत, त्या त्रुटींचा आपण पूर्ण फायदा घ्यायचा आणि सत्तेच्या जवळ जायचे. एकदा सत्तेच्या जवळ पोहोचल्यानंतर आपले जे कोणी विरोधक असतील, त्यांची मुस्कटदाबी करायची आणि आपली हुकूमशाही राबवायची, हा आपला खरा उद्देश आहे आणि हे जे लेनिन १९१७ साली ‘बोलशेविक रिव्हॉल्युशन’च्या वेळी जाहीर केले होते. तेच माओंनीसुद्धा जाहीर केले होते, ज्यावेळी चीन स्वतंत्र झाला होता. १९४९ साली माओंनी ज्यावेळेला चीनमध्ये साम्राज्य स्थापन केले, त्यावेळेला लोकांचे दशकानुदशके अनन्वित हाल झाले. अशा हे लेनिन असो किंवा मधल्या काळातला रशियातला स्टॅलिनसारखा हुकूमशाह असो किंवा माओ असो, याच्यापासून प्रेरणा घेणारे आणि स्वतःला माओवादी आणि लेनिनमध्ये असणारे गट भारतामध्ये होते.
 
सुरुवातील तेलंगणमध्ये हे गट ‘अ‍ॅक्टिव्ह’ होते. त्यावेळेला हैदराबाद संस्थान होते. हैदराबाद संस्थानमध्ये जे रझाकार अत्याचार करत आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही काम करतो आहे, हे गट होते. १९६७ मध्ये बंगालमध्ये नक्षलबाडिया या गावी ही चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्याला एक नाव पडले ‘नक्षलवादी मूव्हमेंट.’ १९८० पासून ती महाराष्ट्रातही सुरू झाली. गडचिरोली आणि आजूबाजूंच्या गावांमध्ये त्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये यांच्यात मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाली. २००४ साली यांच्यामध्ये विचारमंथन सुरु झाले. २००७मध्ये यांनी कम्युनिस्ट पार्टी माओईस्टची स्थापना झाली. या पक्षातर्फे ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅण्ड स्टॅक्टिक्स’हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. त्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येत की, शहरी माओवादाचा उल्लेख या पुस्तकातच करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना अनेकदा प्रश्न पडतो की, ही चळवळ का संपत नाही. याचे खरे कारण म्हणजे हे शहरी माओवादी. शहरी माओवादी हेच खरे या चळवळीचे अध्वर्यू आहेत,” असे ते म्हणाले.
 
 
दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यावेळी म्हणाले की, “हा कार्यक्रम जशा प्रकारे प्रकाशनाचा आहे, तशा प्रकारे तो आपल्या एका कार्यकर्त्याला प्रकाशात आणण्यासारखा सुद्धा आहे आणि तो कार्यकर्ता आहे आपला भरत आमदापुरे. भरतने ज्या कौशल्याने ज्या प्रकारे हे सर्व वाचून काढले, सर्व जजमेंट्स एकत्र केल्या आणि लिहून काढले ते खरेच कौतुकास्पद आहे. मला असे वाटते की, ‘नवा भारत’ या संकल्पनेवर आपण चर्चा करत असतो. ‘नव्या भारता’समोरच्या आशा, आकांक्षा आणि क्षितिजे जशी नवी आहेत खुणावणारी आहेत, तशीच ‘नव्या भारता’समोरची संकट, समस्या आणि कायदेशीर लढायासुद्धा नव्या आहेत.
 
ज्यांना या देशाची चिंता करायची आहे, त्यांना या नव्या संकटाची, चिंताची आणि आव्हानांचीसुद्धा एका प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे. नव्या नव्या संकल्पना समोर येत आहेत. नक्षल आपल्याला माहीत होते. मात्र, ‘अर्बन नक्षल’ एक नवा प्रकार सुरू झाला. जिहाद आपल्याला माहीत होता. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ अशा प्रकारचे शब्द कानावर यायला लागले. पुस्तक प्रकाशित करण्यामागचे एक मूळ कारण होते. या पुस्तकात आलेली सर्व ‘जजमेंट्स’ ‘पब्लिक डोमेन’मध्ये उपलब्ध आहेतच. ती सोप्या शब्दांत सर्वांना वाचायला मिळाली पाहिजे, अशी चर्चा सर्वत्र होते. गणपती सार्वजनिक असला, तरी कुणीतरी डोक्यावर उचलून घेऊन येतो. त्या व्यक्तीमुळेच गणपती आपल्या मंडपात येत असतो. भरतने ती जबाबदारी घेतली आणि उत्तम पुस्तक साकारले,” असे ते म्हणाले.
 
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने झाली. ‘विवेक विचार मंच’चे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मंचाची भूमिका मांडली. ‘अधिवक्ता परिषदे’चे कार्यकर्ते अ‍ॅड. सागर सातपुते यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व त्यांनी अधिवक्ता परिषद यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा भाटे यांनी केले.
 
नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवादाचे मोठे आव्हान
 
“चीन आणि पाकिस्तानसह देशांतर्गत नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवादाचे मोठे आव्हान देशासमोर आहे,” असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. “२००४ साली ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ची (माओवादी) स्थापना झाली. भाकप माओवादी संघटनेच्या लोकांवर झालेल्या छापेमारीमध्ये त्यांची शहरी भागात काम करण्याची रणनीती उघड झाली. माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये ज्या प्रकारे क्रांती झाली, नक्षलवादी ती ‘टेक्निक’ १०० टक्के जशीच्या तशी भारतामध्ये प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ते आपण कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने पाहिले,” असे त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121