नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चीनचे परराष्ट्र मंत्री आणि स्टेट काऊन्सलर वांग यो यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. दोन्ही बाजूंना सकारात्मक बाबींवर चर्चा झाल्यानंतर चीनी सैन्याने सोमवारी गलवान खोऱ्यातून तसेच पेंगॉग त्सो भागातून आपले सैन्य मागे घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतातर्फे टाकण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय दबाव, रणनिती, सीमेवरील शक्तीप्रदर्शन, भारतीय लष्करातर्फे देणाऱ्या येणाऱ्या जशास तशा उत्तरानंतर चीनने आता माघार घेण्यास सुरुवात केली आहे. एलएसीवरील तंबू हटवण्यास चीनने सुरुवात केली आहे. सैनिकांना मागे घेणार असल्याचे या चर्चेत चीनतर्फे कबूल करण्यात आले होते.
सोमवारी लष्करी अधिकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे सैन्य दीड ते दोन किमी माघार घेणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांपूर्वी लेह दौऱ्यावर गेले होते. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जवानांना व तिथल्या कमांडरला पूर्णपणे सुट दिली होती. देशातही चीनविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता.
चीनी सैनिक सद्यस्थितीत जिथे तैनात आहेत, त्या भागावर भारतीय सैन्य नजर ठेवून आहे. भारतीय जवान या ठिकाणी दीर्घकाळासाठी तैनात राहू शकतात, येत्या काळात लडाखमध्ये वातावरणात कडक थंडी पडू लागेल. या परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी सैन्यासाठी आवश्यक ती सर्व रसद पुरवण्यात येणार आहे. भारतीय सैन्य ऑक्टोबरपर्यंत इथे तैनात राहणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
गलवान खोऱ्यात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. चीनी सैन्य मागे हटण्याचे हे देखील एक कारण मानले जात आहे. सॅटलाईट्सद्वारे टीपलेल्या दृश्यांमध्ये चीनी सैन्यांच्या तंबूंच्या दिशेने पाणी भरत चालले आहे. चीनी सैन्याला यामुळे सहाजिकच मागे जावे लागणार आहे, हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्रांने याबद्दल माहीती दिली आहे.