ग्राहकांच्या बदलत्या सवयीचा फटका जवळपास सगळ्याच क्षेत्रांना बसणार आहे. यामुळे विविध अॅप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर सध्या प्रचंड मागणीत आहेत.
कोविड-१९च्या महासंकटानंतर ज्या क्षेत्राला सर्वात चांगले दिवस येणार आहेत, त्यातील सर्वात प्रमुख म्हणजे सॉफ्टवेअरचे क्षेत्र. जागतिक मंदी आणि कोरोनामुळे बर्याच गोष्टींची मागणी कमी होईल. त्यामुळे व्यवसायातील खर्च कमी करण्यासाठी ऑटोमेशन आणि ऑनलाईन सुविधांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढेल. ग्राहकांच्या बदलत्या सवयीचा फटका जवळपास सगळ्याच क्षेत्रांना बसणार आहे. यामुळे विविध अॅप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर सध्या प्रचंड मागणीत आहेत. वर्षभरातून दोन-चार वेळा आणि हजारांतून दोन चार जण जे ‘झूम’ अॅप्लिकेशनचा वापर करायचे, ती संख्या आता काही लाखांवर जाऊन, लोकं दिवसातून चारदा या अॅपचा वापर करायला लागले आहेत. यात मायक्रोसॉफ्टच ‘टीम्स’, ‘स्काईप’, ‘जीओमीट’ यांसारखे अनेक पर्याय आहेत. एवढंच काय व्हॉट्सअॅपनेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची चार जणांची मर्यादा आता आठ वर नेली आहे. ‘लॉकडाऊन’मुळे ऑफिसेसच्या मिंटिग्स, शाळांचे वर्ग, डॉक्टरांचे सल्ले हे सगळंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर अवलंबून व्हायला लागलं आहे.
अॅप्समुळे किती चांगला फायदा होऊ शकतो हे तुम्ही सध्या वापरात असलेल्या ‘आरोग्य सेतू’वरूनदेखील तुम्हाला लक्षात येतील. ‘आरोग्य सेतू’चा सगळ्यांनी योग्य वापर केला तर आपल्या आजूबाजूला कोरोनाचा रुग्ण आहे का किंवा तुम्ही गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना ‘पॉझिटिव्ह’ व्यक्ती आहे का, हेदेखील कळू शकणार आहे. ही सगळी अॅप्स मात्र नक्कीच वापरायला सोपी आणि उपयुक्त असायला हवी. आता कोरोनानंतरच्या काळात कोणत्या क्षेत्रात तुम्ही सॉफ्टवेअर किंवा अॅप्लिकेशनची संधी निर्माण करू शकता ते शोधा. उदाहरण द्यायचं झालं तर वर्तमानपत्रांचेही घेऊ शकतो. सध्या वितरण बंद असल्याने प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅपवर भल्या पहाटे कित्येक वर्तमानपत्र मोफत येतात. ‘लॉकडाऊन’ उघडल्यावर मोफत वर्तमानपत्र येणे बंद होईल. परंतु, वर्तमानपत्रांसाठी ई-पेपरच्या व्यतिरिक्त असं एखाद अॅप ज्यामध्ये वर्तमानपत्र वाचता येऊ शकेल, ज्यामुळे वर्तमानपत्राचा जाहिरात विभाग आपल्या जाहिरातदारांना आज किती जणांनी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचले, याचा आकडा पारदर्शकतेने सांगू शकेल. वाचकांच्या संख्येत पारदर्शकता आल्यास जाहिरातदारदेखील वाचकांच्या संख्येनुसार जाहिरातींचे दर ठरवून जाहिरात देऊ शकतील.
अनेक संधी तुमच्या आजूबाजूला आहेत, त्या तुम्ही शोधा आणि त्याचा फायदा करून घ्या. बर्याच गोष्टींचे अॅप्स उपलब्धदेखील असतील, पण त्यात तुम्ही जर काही नावीन्यपूर्ण सेवा आणल्यात तर तुम्ही या संधीचं सोनं करू शकाल. पुढील कित्येक दिवस लोक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणार आहेत. ती कोणती कोणती ठिकाणे आहेत आणि त्यांना तुम्ही तिथे व्हर्च्युअली कसे पोहोचवू शकाल? किंवा लोकांनी गर्दीच्या ठिकाणी न जात त्यांचे काम तुम्ही कसे करून देऊ शकाल? मग ते कदाचित मंदिर असेल, मॉल, पर्यटनस्थळ किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल. अगदी दोन दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ आणि व्हॉट्सअॅपची जी भागीदारी झाली, त्यातूनदेखील अशाच अनेक सुविधा अपेक्षित आहेत, ज्यामुळे अगदी तुमच्या घरचा बाजूचा किराणा दुकानदारदेखील तुम्ही दुकानात न जाता घरपोच सामान पोहोचवेल. हे सगळं करताना एक फायदा हा आहे की, स्थानिक व्यापार्यांशी तुम्ही जर योग्य भागीदारी केलीत, तर फार काही भांडवलाची गरजदेखील भासणार नाही, जसे कीओला, उबर ज्यांची एकही गाडी नसताना गाड्यांची सुविधा देणार जगातलं सगळ्यात मोठं जाळं निर्माण केलं. थोडक्यात काय तर या ऑनलार्ईनच्या जगात उत्तम कल्पना तुमचं जग बदलू शकते. तेव्हा याबाबत नक्की विचार करा.
- प्रसाद कुलकर्णी