मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संस्थापक व संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर काल रात्री घरी परतत असताना मुंबईत झालेल्या हल्ल्याचा मुंबई प्रेस क्लबने निषेध केला आहे. त्यांची कार थांबवण्याचा, शाई फेकण्याचा, कारच्या खिडक्या फोडण्याचा प्रयत्न तसेच त्यांना अडवत धमकावणे हे हिंसक कृत्य आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचारांना स्थान नाही अशा शब्दांत मुंबईप्रेस क्लबने या घटनेचा निषेध केला. पत्रकारांच्या व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणण्याच्या कोणत्याही कृतीचा मुंबई प्रेस क्लबकडून निषेध आहे.
या गुन्ह्यातील दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. आम्ही महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना या प्रकरणाची त्वरित चौकशी करुन या प्रकरणाची संपूर्ण सत्यता समोर आणण्याचे आवाहन करतो. इतकेच नव्हे तर पत्रकार अर्णब यांनी केलेल्या आरोपानुसार काँग्रेस कार्यकर्त्यांचा या प्रकरणात हात आहे की नाही याचा देखील तपास करावा अशी मागणी मुंबई पत्रकार संघाने केली. लोकशाहीच्या चौथा स्तंभावर हिंसाचार आणि धमकी देण्याचे कोणतेही औचित्य असू शकत नाही. याचबरोबर मुंबई प्रेस क्लबने हे देखील स्पष्ट केले की, रिपब्लिक टीव्ही किंवा अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या विधानाचा आम्ही मांडलेल्या भूमिकेशी काहीही संबंध नाही.