महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राजेश पायलट, माधवराव सिंधिया या सर्वांच्याच हत्या झाल्या. राहुल गांधींनीच लावलेला तर्क जर या प्रत्येक ठिकाणी लावला तर त्या त्या घटनेनंतर फायदा कोणाला झाला? त्याचे उत्तर राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या कोणाही नेत्याने द्यावे.
गेल्यावर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामात सीआरपीएफच्या ४० जवानांना आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले. तद्नंतर पाकिस्तानने पोसलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि भारतानेदेखील एअर स्ट्राईक करत बालाकोटस्थित दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष झाल्यानिमित्ताने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संपूर्ण देशवासीयांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. परंतु, सारा देश एका बाजूला हुतात्म्यांना अभिवादन करत असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना या दुःखद घटनेवरही राजकारण करण्याची बुद्धी झाली व त्यांनी जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील होण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी दर्जाहीन विधाने करण्याला प्राधान्य दिले.
राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याविषयी तीन प्रश्न विचारले आहेत, ते म्हणजे-“पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले ? आणि ज्या सुरक्षाविषयक त्रुटींमुळे हा हल्ला झाला, त्यासाठी मोदी सरकारमधील कोणत्या व्यक्तीला जबाबदार धरण्यात आले?” हे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले आहेत. देशाचे एक नागरिक आणि केंद्रातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधींना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे-आक्षेप आहे तो त्यांच्या पहिल्या प्रश्नावर. हा प्रश्न विचारताना राहुल गांधींना हे समजले नाही का की, अशा प्रश्नाने हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना नेमके काय वाटेल? त्यांची मनःस्थिती कशी होईल? देशासाठी प्राणार्पण करणार्या जवानांचे हौतात्म्य राजकीय पक्षांसाठी केवळ एक नियमित घडणारी घटना असून त्याचे राजकारण करण्याची संधीच ते शोधत असतात, असेच त्यांना वाटले असणार! म्हणूनच राहुल गांधींनी विचारलेला प्रश्न हुतात्म्यांचा अवमान करणारा ठरतो. अर्थात पठाणकोट हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकला ‘खून की दलाली’ म्हणणारी व्यक्ती हुतात्म्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या अपमानाव्यतिरिक्त अन्य काय करू शकते?
दरम्यान, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष-राहुल गांधींनीच हल्ल्याचे राजकारण करू नये, असे ज्ञान वाटण्याचे काम केले होते. तेच आज मोदीद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊन राजकारण करताना आणि लष्करावर प्रश्न विचारताना दिसतात. राहुल गांधींच्या मेंदूतून निघालेल्या विकृत प्रश्नाचा त्यांना अपेक्षित अर्थ म्हणजे-पुलवामा हल्ला भाजपने घडवून आणला. का? कारण की त्यानंतरच्या दोन-तीन महिन्यांत होणार्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा घेता यावा. भारताने पुलवामा हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तरावरही काँग्रेसने सवाल उपस्थित केले होते. नरेंद्र मोदी पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकचा लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण काँग्रेसच करू शकते, कारण त्यांची जी कोणती विचारधारा होती-असेल, ती आता पार रसातळाला गेल्याचे दिसते. हाती कोणताही ठोस कार्यक्रम उरलेला नाही, त्यामुळे करायचे काय तर, दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करण्याची कामे आता त्या पक्षाकडे उरली आहेत. असली घाणेरडी कामे करून आपण जनतेची मने जिंकू, असे त्या पक्षाला अजूनही वाटते. परंतु, काँग्रेसच्या या बेशरम कृत्यांचे उत्तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतच मतदारांनी देऊन ठेवले आहे. तरीही तो पक्ष आणि त्या पक्षाचा बालिश नेता जर अशाप्रकारे विधाने करत असेल तर कदाचित लवकरच त्या पक्षाचे दुकानही बंद होईल.
पुलवामा हल्ल्यावर प्रश्न विचारत राहुल गांधींनी भाजपला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा अट्टाहास चालवला असल्याने इतरही अनेक प्रश्न उपस्थित होतात. म्हणतात ना, बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी आणि त्याला कारण राहुल गांधीच असणार. महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राजेश पायलट, माधवराव सिंधिया या सर्वांच्याच हत्या झाल्या. राहुल गांधींनीच लावलेला तर्क जर या प्रत्येक ठिकाणी लावला तर त्या त्या घटनेनंतर फायदा कोणाला झाला? त्याचे उत्तर राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या कोणाही नेत्याने द्यावे. बरं इतकेच नाही तर मोदींनी संसदीय अधिवेशनात विचारलेला प्रश्नही पुन्हा विचारावा लागेल-देशाची फाळणी केली ती कोणाच्या फायद्यासाठी? पाकव्याप्त काश्मीर अस्तित्वात आले ते कोणाच्या फायद्यासाठी? जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केले ते कोणाच्या फायद्यासाठी? भोपाळ वायुकांडातील आरोपी-सॅम अॅन्डरसनला देशातून बाहेर जाऊ दिले ते कोणाच्या फायद्यासाठी?
मुंबईवर २६/११ चा हल्ला झाला तो कोणाच्या फायद्यासाठी? या प्रश्नांची उत्तरे राहुल गांधी देतील का? की ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चेल्याचपाट्यांना खाद्य पुरवून विश्रांतीसाठी देशाबाहेरचा रस्ता धरतील? राहुल गांधी किंवा काँग्रेस वरील प्रश्नांची उत्तरे देणार नाहीच, कारण ते स्वतःला देशाचे मालक समजतात, आमचे अस्तित्व देशावर सत्ता गाजवण्यासाठीच असल्याचे ते मानतात, म्हणून आम्ही कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास बांधील नाही, असेही त्यांचे म्हणणे असते. अर्थात राहुल गांधींनी आताच हा प्रश्न विचारल्याचे दिसत असले तरी काँग्रेसींच्या तोंडातून अशाच प्रकारची कितीतरी विधाने याआधीही निघालेली आहेतच. देशभक्तीपेक्षा राजकारणाला सर्वोच्च समजणार्या दिग्विजय सिंग यांच्यापासून सलमान खुर्शीद, नवज्योतसिंग सिद्धू आणि कमलनाथ यांनीही सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि दहशतवादी हल्ल्यांवर जीभ चालवलीच होती. गांधी घराण्याशी निकटचा संबंध असलेले आणि पक्के काँग्रेसी सॅम पित्रोदा यांनी तर पाकिस्तान प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करत पुलवामा हल्ल्यावरून त्या देशाला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानची भाषा याहून निराळी नसतेच आणि आज राहुल गांधीही पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत. मात्र, चौकीदार चोर है, रेप इन इंडियासारखी विधाने करून पक्षाला मातीत घालणारे राहुल गांधी सुधारले नाहीतच. पाकिस्तानची भाषा वापरून कदाचित राहुल गांधींना पक्षाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकायचा असेल, त्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा!