
‘भारत बंद’ला अत्यंत तुरळक प्रतिसाद
कल्याण: शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला अनेकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे. ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती’ वगळता इतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे चित्र निदर्शनास आले. काही ठिकाणी ‘बंद’ला प्रतिसाद देण्यासाठी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु कल्याणमध्ये मात्र आवश्यक गोष्टींप्रमाणेच इतरही सर्व दुकाने सुरु असल्याचे चित्र दिसून आले.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने लागू केले कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगत आज दि. ९ डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला होता. मात्र हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी केले असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. एकंदरीतच शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाला समर्थन देण्यासाठी हा बंद पुकारला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
कल्याण डोंबिवली येथे सकाळपासूनच सर्व दुकान, हॉटेल्स, रिक्षा सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून येत होते. स्थानक परिसरात नेहमीपेक्षा कमी वर्दळ दिसून येत होती. पण बस स्थानकांमध्ये कामावर जाणाऱ्यांची आणि बाहेरगावी जाणाऱ्यांची वर्दळ दिसून आली. दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर ठीक- ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येत आहे..