मुंबई : मागील चार दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना नवी दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर होत आहे.
मात्र शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे. शेतकऱ्यांनी रस्त्याऐवजी मैदानात आंदोलन करावं. त्यानंतर सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असे आवाहन गृहमंत्री अमित शहांनी केले आहे. या आंदोलनांवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र या टीकेनंतर राज्यातील भाजप नेत्यांनी संजय राऊतांना सवाल करण्यास सुरुवात केली आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत यांना पंजाबच्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचा अधिकार काय? महाराष्ट्रात शेतकरी तडफडतोय,आत्महत्या करतोय त्याचं ठाकरे सरकारला काही नाही. राज्यातले शेतकरी अद्दल घडवतील तेव्हा शेतकऱ्यांच्या विषयावर राजकारण करायचं नसतं हे ह्यांना कळेल, असे म्हणत निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.