मुरबाड : तालुक्यातील म्हसा यात्रेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या बांबूपासून निर्मित वस्तू सध्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहेत. नागरिकांचीही या वस्तूंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून या वस्तूंच्या खरेदीसाठी म्हसा यात्रेत अनेकजण गर्दी करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या म्हसा यात्रेला नुकतीच सुरुवात झाली आहे. या यात्रेत शेतकर्यांसाठी असणारी अवजारे, तसेच गृहोपयोगी वस्तू व शोभेच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. दरवर्षीप्रमाणे येथे मोठी बाजारपेठ पाहावयास मिळत असली तरी यावर्षी वनविभागाने बांबूपासून बनविलेल्या वस्तू आणि फर्निचर हेच आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे. वनविभागाच्या या विशेष कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
यात्रा आली की, एक महिना अगोदर वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ, विकास भामरे आणि नाईक यांच्या सहकार्याने आदिवासी ठाकूर समाजातील लोक बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यास सुरुवात करतात. या यात्रेनिमित्त अनेकांना रोजगार मिळत असल्याने अनेक वनवासी बांधवांनी बांबूपासून बनविलेल्या टोपल्या, आरामखुर्ची, टिपॉय, पेपरवेट, फुलदाणी, आकाशकंदील तसेच मोहाच्या फुलापासून लाडू तयार करणे तसेच इतर वस्तूंना रंग देऊन अगदी सुशोभित केल्या आहेत. वर्षातून एकदा या यात्रेनिमित्त आदिवासी बांधवांना रंगीत टोपली विक्री करण्याची मोठी बाजारपेठ मिळत असते. त्यामुळे रंगीत टोपली व इतर साहित्य मिळण्याचे ठिकाण म्हणजे म्हसोबाची म्हसा यात्रा प्रसिद्ध आहे.
मुरबाडपासून १२ किमी. अंतरावरील म्हसोबा (खांबलिंगेश्वर) देवाचे मंदिर असून येथे दरवर्षी पौष पौर्णिमेला ही यात्रा भरते. येथील जागृत देवस्थानामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून हजारो भक्त येत असतात. गुरे, घोंगडी, टोपलींचे बाजार या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. अनेकवेळा वनवासी बांधव रंगीत टोपल्या बनविण्यात मग्न झाले आहेत. या त्यांच्या परंपरागत व्यवसायाला एक चांगली मोठी बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
- शंकर करडे