पुणे : कोंढवा येथील संरक्षक भिंत कोसळून पंधरा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री कात्रज भागात सिंहगड संस्थेची संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत सहा मजुरांचा मृत्यू झाला. यात इतर पाचजण जखमी आहेत.
जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राधेलाल पटेल (२५), जेटू लाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२), जेटू चंदन रवते अशी मृतांपैकी चौघांची नावे आहेत. जखमी आणि मृत झालेले मजूर हे सगळेच छत्तीसगडचे रहिवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.
आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या ठिकाणी अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मुसळधार पावसात आधी झाड पडले. भिंत कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. अग्निशमन दलाला बचावकार्यात एनडीआरएफच्या टीमने देखील मदत केली.
कोंढवा दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू
पुण्यातील कोंढवा भागात २९ जूनच्या मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला. कोंढवा येथील एका कंपनीसमोर ही दुर्घटना घडली. हे सर्वच मजूर देखील इतर राज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आले होते. ते सगळेच बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील रहिवासी होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat