कोलांटउड्यांचा मोसम

    29-May-2019
Total Views | 91



कोलांटउडी मारण्यात फक्त ‘टाइम’ मॅगझिन पुढे नाही. पश्चिम बंगालपासून कर्नाटकपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत अशा अनेक कोलांटउड्या मारल्या जाणार आहेत.

 

नरेंद मोदी दुसर्‍यांदा आणि तेही दणदणीत बहुमतासकट देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होत आहेत. त्यांचे चाहते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांना खणखणीत कौल देणारी जनता या सार्‍या घटनाक्रमाने आनंदित आहे. एका शानदार सोहळ्यात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील. याच वेळी निरनिराळ्या कळपांमध्ये निरनिराळे वातावरण आहे. राजकारणात विजयच सर्वात खरा असतो, बाकी सारे झूठ. देशातले पोंगा पंडित आज ज्याप्रकारच्या भाषेत बोलत आहेत, ती विधाने प्रांजळपणे आपला पराभव मान्य करणारी नक्कीच नाही.

 

याउलट देश कसा विभागला जाईल, अल्पसंख्याकांना कशाप्रकारे संकटांना तोंड द्यावे लागेल या आणि अशा कितीतरी प्रश्नांची सरबराई सध्या सुरू आहे. आपले नशीब फुटके असले आणि विजयाने आपल्याला हुलकावणी नव्हे तर चक्क फाट्यावर मारले असले, तरी त्याच फाट्यावर उभे राहून मार्ग शोधायचा असतो किंवा आपले काय चुकले, त्याबाबत आत्मचिंतन करायचे असते. मात्र, असे करतील ते आपले विचारवंत कसले? अल्पसंख्याकांमध्ये भयगंड निर्माण करण्याचे काम आता जोरात सुरू आहे. यातला एक गट मोठा चाणाक्ष. आजची माध्यमे कितीही म्हटली तरी मुक्त नाहीत. ती सातत्याने कोणावर तरी विसंबून राहात आली आहेत. मोदी विरोधाचे ढोल वाजविणार्‍या बर्‍याच लोकांनी आपले जुने बुरखे काढून फेकून दिले आहेत.

 

गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या दंगलीनंतर गुजरातच्या गल्ल्यांमध्ये उभे राहून पाहा, इथे आता कोणीही अल्पसंख्याकांचे संरक्षण कसे करणार नाही, हे सांगणारे आपापल्या एक्झिट पोलमध्ये रालोआला 350 हून अधिक जागा देऊन मोकळे झाले होते. यांचा द्वेषाचा कंडू खरोखरच शमला की नाही, कल्पना नाही मात्र, वास्तव आहे ते असे आहे आणि त्याच्याबरोबर जुळवून घ्यावेच लागेल, हा संदेश मात्र या मंडळींनी स्वीकारला आहे. ‘टाइम’ मॅगझिन या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा निर्मितीचे काम करणार्‍या मासिकाने मोदींच्या व्यक्तिमत्त्वावर आणि भारतीय जनतेच्या नेता निवडीच्या लोकशाहीतील कुवतीवरच प्रश्न उभा करणारा लेख लिहिला होता. अतीश तासीर नावाच्या विद्वान माणसाने हा लेख लिहिला होता. हा लेख लिहिण्यापूर्वी या महाशयांनी भारतातल्या कुठल्या विद्वानासोबत रंगीत पेयांचे चषक भिडविले होते, हे अजूनही कळायला मार्ग नाही पण, आता या अंकाच्या लगेचच पुढच्या आवृत्तीत मोदीच हा खंडप्राय देश कसा चालवू शकतात, यावर छानसा लेख लिहिला आहे.

 

लोकशाही आणि भारतीय जनमानसाची मूल्ये यांचा एक सुरेख मिलाफ आपल्या देशात घडून आला आहे. काही दुर्दैवी हिंसक घटना सोडल्या तर आपल्या देशात लोकशाही प्रक्रिया खूपच प्रगल्भपणे राबविली जाते, असे म्हणायला वाव आहे. आता लालूसारख्या लोकांनादेखील बिहारी लोकांनी ज्याप्रकारे नाकारले, तो मोदींचा करिष्मा आहेच पण त्याचबरोबर लोकांनी दिलेला प्रतिसादही नाकारता येत नाही. परस्परात एकजीव झालेले हे दोन घटक समजून घ्यायचे असतील तर त्यांच्यासारखा विचार करावा लागतो. आपल्याच चष्म्यातून त्याकडे पाहून त्याचे आकलन होऊच शकत नाही. पश्मिच बंगालच्या जनतेने तर कमालच केली. अस्मितेचे, हिंसेचे सगळ्या प्र्रकारचे प्रयोग करून ममता बॅनर्जी थकल्या पण लोकांनी जी काही साथ नरेंद्र मोदींना दिली, ती कमाल आहे. सावध असा, हीच तुफानाची सुरुवात आहे, अशाच आविर्भावात आज पश्चिम बंगालची जनता आहे.

 

तृणमूलचे सरकार येत्या सहा महिन्यांत पडेल, अशी भविष्यवाणी यापूर्वीच झाली आहे. अभंग असा डाव्यांचा बालेकिल्ला पाडून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या सत्तेवर विराजमान झाल्या. मात्र, आपल्या सत्तेचे पाय मजबूत करण्यासाठी त्यांनी ज्याप्रकारे बंगालच्या जनतेला गृहित धरले आणि अल्पसंख्याकांचे लाड चालविले ते अस्सल बंगाली जनतेला रूचले नाही. यातून जे घडले, ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता तृणमूलच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये येणे पसंत केले आहे. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल 52 नगरसेवकांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली आहे. यात अजून एका आमदाराचा समावेश आहे. हा आमदार चक्क प्रदीर्घ काळ सत्ता राखलेल्या सीपीएमचा आहे.

 

भेदरलेल्या ममतांनी आपल्या मंत्रिमंडळात बरेच अदलाबदल केले खरे, पण पंचायत समित्या आणि लोकसभेच्या निवडणुकीतली भाजपची मुसंडी पाहिली तर दोन वर्षांत येणार्‍या निवडणुकीत कसे काही खरे नाही, याचाच प्रत्यय येतो. काँग्रेसच्या अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्याच्या वृत्तीसाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली पण त्यातून ममतांनी काहीच बोध घेतला नाही. वस्तुत: मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसने मारलेली मुसंडी त्यांच्या पथ्यावर पडायला हवी होती. मात्र झाले उलटेच. आता तर मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या मुख्यमंत्रिपदावरच अंतर्गत पक्षविरोधाचे ढग दाटून आले आहेत. बहुसंख्य आमदार त्यांच्या स्वत:च्या राजकीय भवितव्याविषयी साशंक आहेत आणि त्यामुळे कमलनाथ यांच्यासमोरचे संकट अधिकाधिकच गडद होताना दिसेल. भाजपने किंचित आकड्यांच्या खेळात गमावलेल्या कर्नाटकातही तशीच स्थिती आहे.

 

कर्नाटक खर्‍या अर्थाने काँग्रेसमुक्त झाला आहे. कर्नाटकातल्या ज्या अल्पसंख्याकांनी भाजपच्या विरोधात कौल देऊन काँग्रेस आणि जेडीएसच्या बाजूने कल दिला होता, त्यांच्या विरोधात जाऊन तिथल्या अल्पसंख्याक आमदारांनीच आता भाजपचा पर्यायही आपण नाकारता कामा नये, यासाठी विधाने देण्याची स्पर्धा लावली आहे. मुस्लीम महिलांनी भाजपला केलेले मतदान नाकारता येणारे नाही. त्यामुळे स्वत:ला अल्पसंख्याकांचे ठेकेदार म्हणविणार्‍यांसमोरही अशाच कोलांटउड्या मारण्याखेरीज पर्याय नाही.

 

सर्वात मोठी कोलांटउडी काँग्रेसच्या युवराजांची असेल. लोकसभेतल्या आपल्या कामगिरीसाठी या महाशयांनी आपल्या चार पिढ्यांच्या मालमत्ता झालेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांनी तो कुणाला दिला आणि तो कोण स्वीकारणार हा मोठाच प्रश्न. स्टॅलिन आणि लालूंसारख्या त्यांच्या पाठिराख्यांनी आतापासूनच त्यांना गळ घालायला सुरुवात केली आहे पण मागे सोनिया गांधींनी असे केेले होते, तेव्हा गाडीच्या टपावर उभे राहून डोक्याला पिस्तूल लावलेल्या एका कार्यकर्त्याला दूरचित्रवाणी माध्यमांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. राहुल गांधींसाठी असेदेखील करायला कुणी नाही, यातच सगळे आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121