नवी दिल्ली : मंगळवारी सुदानमधील सिरेमिक फॅक्टरीत ईएलपीजी टँकरच्या स्फोटात २३ जण ठार आणि १३० हून अधिक लोक जखमी झाले. मंगळवारी सुदानमधील भारतीय दूतावासाने या घटनेत भारतीयांच्या मृत्यूची नोंद केली होती. तथापि, त्यांनी मृतांची संख्या स्पष्ट केली नव्हती.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सुदानमधील घटनेत भारतीयांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की ५८ भारतीय मजूर कारखान्यात काम करत होते, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ११ जणांची ओळख अजून पटलेली नाही. 33 लोक सुरक्षित आहेत.
अपघातात बळी पडलेले काही लोक तामिळनाडूचे आहेत. यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिले, 'तामिळनाडूतील सुदान स्थित तीन भारतीय बेपत्ता आहेत आणि उर्वरित तीन जणांना सुदानच्या खार्दूम येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की ,बेपत्ता लोकांना ओळखण्यासाठी आणि जखमींना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करावा."
घटनेची पुष्टी करताना सुदान सरकारने म्हटले होते की," २३ लोक मरण पावले आहेत आणि १३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सुरुवातीच्या अहवालांमध्ये असे दिसून आले आहे की ,घटनास्थळी सुरक्षेसाठी आवश्यक कोणतीही उपकरणे नव्हती. सरकारने सांगितले की ज्वलनशील साहित्य तिथे अयोग्यरित्या साठवले गेले होते, ज्यामुळे आग पसरली.