मुंबई : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सर्व सिनेट सदस्यांनी कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्या दालनात शुक्रवारी आंदोलन केले.
'विद्यार्थी प्रश्न मार्गी लावा, गोड बोलणे बंद करा', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. विद्यापीठातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी निवदने देण्यात आली होती. परंतु; कुलगुरूंनी याप्रकरणी काहीही ठोस कारवाई केली नाही. सिनेट सदस्यांच्या पत्रांनाही उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सर्व सिनेट सदस्यांनी शुक्रवारी थेट मुंबई फोर्ट येथील कुलगुरू कार्यालयात ठिय्या मांडला. कुलगुरुंविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
रत्नागिरी उप केंद्राची झालेली अवस्था, विद्यापीठाचा परीक्षा विभागाने नव्या उत्तर पत्रिका छापणाच्या घेतलेला निर्णय, अशा अनेक मागण्यासंदर्भात कुलगुरू कार्यालयाकांडून उत्तर मिळालेले नाही. याच्या निषेधार्थ म्हणून सिनेट सदस्यांकडून हातात पोस्टर्स घेऊन सुहास पेडणेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'कुलगुरू गोड बोलणे बंद करा, पत्रांना उत्तर द्या' अशा घोषणा देत कुलगुरूंच्यासमोरच जमिनीवर बसून सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, सुप्रिया कारंडे, वैभव थोरात, शशिकांत झोरे, शीतल देवरुखकर यांच्यासह कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/