अमृतसर : दसऱ्यानिमित्त रेल्वे रुळावर उभे राहून रावण दहन पाहणाऱ्या नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. दिल्ली-अमृतसर या रेल्वे मार्गावर जौडा फाटक येथे ही दुर्घटना घडली. येथे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १०० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. १० ते १२ मृतदेह रेल्वे रुळावर आढळले आहेत.
अमृतसह येथील जौडा फाटकाच्या बाजूला दसऱ्यानिमित्त रामलीला आणि रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाजूला असलेल्या रेल्वे रुळांवर उभे राहून लोक हा कार्यक्रम पाहत होते. अमृतसर येथून हावडा मेल आली त्याच वेळी दुसऱ्या बाजूनेही दुसरी रेल्वे आली. त्यामुळे लोकांना नेमके कोणत्या बाजूला पळावे हे समजले नाही. दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, या भागात सुमारे अडीचशे लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. सहा वाजता कार्यक्रमाची वेळ असताना स्थानिक नेत्यांनी कार्यक्रमाला उशीर केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या आरोपांनुसार या नवज्योत सिंह सिंद्धु यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित होत्या मात्र, घटनेनंतर ते तिथून निघाल्या. पोलिसांनी मदतकार्य सुरू केले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/