१०० कोटी हिंदूंना मंदिर – मठापर्यंत आणणार ‘मंदिर सेतू’

    02-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली
: विजयादशमीपर्यंत देशातील १०० कोटी हिंदूंना सहकुटुंब मंदिरे, मठ आणि अन्य श्रद्धास्थानांमध्ये आणण्याचा संकल्प महाराष्ट्रातील ‘मंदिर सेतू’ या संस्थेने मंगळवारी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरापासून सोडला आहे.

‘मंदिर सेतू’ अमित कुमार, पराग शेंडे, नितीन काळे यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांची भेट घेतली आणि या मोठ्या मोहिमेची माहिती दिली. यावेळी चंपतराय यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी श्रीरामललाचे दर्शन घेऊन आपल्या संकल्पाचा प्रारंभ केला.

देशातील सर्व भागांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असून दुर्गापूजा आणि श्रीरामलीला आयोजन समित्यांना देखील या मोहिमेशी जोडून घेतले जाणार आहे. त्यासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि सामाजिक संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू आहे. सर्वांकडून संमती पत्रे घेतल्यानंतर ते देशाच्या कानाकोपऱ्यात संदेश पसरवतील आणि विजयादशमीपर्यंत जवळच्या श्रद्धा केंद्रांवर हिंदू कुटुंबांकडून १०० कोटी प्रार्थना करण्याचे लक्ष्य साध्य करतील.