आजमितीला मानवाने प्रगती केली असली, तरीही या प्रगतीला साध्य करण्यासाठी त्याने निसर्गाचे एकप्रकारे शोषणच केले. पाश्चात्य विचारधारेनुसार नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराला कोणतीही बंधने नाहीत. मात्र, भारतीय विचारधारा असे मानत नाही. पृथ्वीवरील साधनसंपत्तीचा वापर करताना तिचे काळजीपूर्वक ‘दोहन’ करण्याचा विचार त्यात आढळतो...
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग जेव्हा मानवी सुखाच्या प्राप्तीसाठी केला जातो, तेव्हा त्यासाठी अत्यावश्यक असतात ती म्हणजे नैसर्गिक संसाधने. अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या आपल्या मूलभूत गरजांची पूर्ती असो किंवा मोबाईल, विमाने, ड्रोन यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणे असो, या सर्वांसाठी कच्चा माल म्हणून विविध वनस्पती आणि प्राणी, वस्तू, जमिनीतील खनिजे, पाणी, हवा, सूर्यप्रकाश यांसारखी संसाधने वापरली जातात. आजच्या आणि उद्याच्यासुद्धा संपूर्ण मानवजातीसाठी असलेली ही नैसर्गिक संसाधने वापरण्याचे काही मूलभूत नियम असावेत का, या नियमांचे मूलस्वरूप तत्त्व कोणते आणि हिंदू तसेच पाश्चात्य संस्कृतीचा विचार केल्यास याविषयीच्या चिंतनात काय फरक दिसतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे जर तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दिशेचा फेरविचार करायचा असेल, तर सर्वप्रथम निसर्गाविषयीची आपली दृष्टी आपण निश्चित करायला हवी.
भारतीय चक्रीय निसर्गदृष्टी आणि पाश्चात्य रेषीय निसर्गदृष्टी, यातील फरक आपण गेल्या काही लेखांमध्ये पाहिला आहे. निसर्गचक्राचे आकलन या दोन भिन्न प्रतिमानांमुळे कसे बदलते आणि मानवाचे या सर्व चक्रातील स्थान नेमके कोणते, याविषयीच्या संकल्पना कशा निर्माण होतात, याची चर्चा आपण आधीच केलेली आहे. एक बुद्धी असलेला सजीव म्हणून मानवाचे या सर्व साखळीतील स्थान अनन्यसाधारण आहेच. परंतु, या स्थानामुळेच मानवावर यासंबंधी विशेष जबाबदारी येते. निसर्गातील मानवाच्या स्थानाविषयीची हिंदू जीवनदृष्टी समजून घेतल्यानंतर मानवाच्या कर्तव्याविषयीची हिंदू जीवनदृष्टी नेमकी कशी आहे, याची आज आपण चर्चा करू.
निसर्गसंवर्धनाचे भारतीय प्रतिमान मांडण्याची सुरुवात, आपल्याला अथर्ववेदातील भूमीसूक्त किंवा पृथ्वीसूक्त या सूक्तापासून करता येईल. ‘माता भूमि पुत्रोहं पृथिव्याः’ हे सुपरिचित वचन याच सूक्तातील आहे. पृथ्वी आणि मानव यांचा माता-पुत्र संबंध दाखवून या सूक्तात, या संबंधांच्या विषयी अधिक विवरण येते. त्यातील काही महत्त्वाची मांडणी म्हणजे, ही धरती सर्व द्विपाद आणि चतुष्पाद प्राण्यांचे धारण व पोषण करते आणि त्यासाठी आवश्यक अशा सर्व नैसर्गिक संपत्ती म्हणजेच नद्या, शेते, वनस्पती, खनिजे यांचेही धारण करते. ही धरती याचप्रकारे पूर्वी देवांचे, ऋषींचे, श्रेष्ठ अशा राजांचे धारण करत आलेली आहे आणि त्यांनीही तिचे रक्षण केले आहे. एक प्रकारे आपणही धरतीच्या सर्व संपत्तीचा उपभोग घेताना तिच्या रक्षणाची जबाबदारीही उचलली पाहिजे, असे आपणास या सूक्तातून सांगितले आहे. खनिजांचे उत्खनन करताना भूमातेच्या हृदयालाच धक्का पोहोचेल असे वर्तन आम्ही करणार नाही, असे वचन तिला दिले आहे. या सर्व विवेचनातून पुनःपुन्हा येणारा एक विचार किंवा मांडणी म्हणजे, भूमीला दिलेली गायीची उपमा. भूमी ही धेनुस्वरूप असून तिचे दोहन करून तिच्यातील संपत्ती मिळवावी, असे भूमीसूक्ताचे सांगणे आहे. या मातृस्वरूपाचा आणि धेनुस्वरूपाचा विचार भारतीय तत्त्वज्ञानात आपणास विविध ठिकाणी आढळतो आणि भारतीय चिंतनाचा हा एक केंद्रीय विचार आहे, असे म्हणता येईल.
कोणत्याही व्यक्तीसाठी आईचे महत्त्व काही वेगळे सांगायला नको. आई व मुलाचे प्रेम ही जगाच्या पाठीवरील सर्व मानवी समाजांना लागू पडणारी एक संस्कृतीनिरपेक्ष अशी भावना आहे, असे आपण म्हणू शकतो. प्रत्येकच आई आपल्या मुलाचे संगोपन आणि संवर्धन नीट व्हावे म्हणून झटत असते आणि प्रत्येक मूल हे आपल्या आईची काळजी कशी घेता येईल, त्याचा विचार करते. भारतीय चिंतनाचे वैशिष्ट्य हे की, इथे ही ‘मातृसंकल्पना’ विस्तृत करून गाय, नदी, भूमी अशांसाठीसुद्धा वापरली जाते. ही संकल्पना आपल्या इतकी अंगवळणी पडली आहे की, आपल्याला तिचे महत्त्व नीटसे लक्षात येत नाही; परंतु वैचारिक वसाहतवादापासून मुक्ती मिळवायची असल्यास ज्या काही नाभीय संकल्पना आपल्याला पुन्हा स्वतः समजून घेऊन ठासून मांडायला लागतील, त्यातील एक ही भारतीय मातृसंकल्पना आहे. थोडासा खोलवर विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की, भूमी आपल्याला जे काही देते त्याच्या बदल्यात आपण तिच्यासाठी काही करावे अशी काही अपेक्षा तिची नसते. कोणतेही स्वतःचे कष्ट नसताना पांथस्थ झाडावरील मधुर फळे खाऊ शकतो आणि नदीचे निर्मळ पाणी पिऊ शकतो. पण, त्याहीपुढचे म्हणजे कोण्या पांथस्थाने खावीत म्हणून झाड, फळे धारण करत नसते की नदीही वाहत नसते. हे करणे हा त्यांचा स्वभावधर्मच आहे. पृथ्वीवर मानवजातीच्या उत्पत्ती आधीही नद्या वाहतच होत्या आणि ऋतू फुलतच होते. या निसर्गचक्राशी एकरूप होऊन त्याच्या विविध उपभोग्य वस्तूंचा उपभोग घ्यायला मिळणे याविषयी एक स्वाभाविक आत्मीय कृतज्ञता, या सर्व जाणिवेतून निर्माण होते तिचा आविष्कार म्हणजेच मातृसंकल्पना. या संकल्पनेतून जन्म घेतो तो या सृष्टीच्या दोहनाचा विचार. या सृष्टीकडून जे मिळवायचे ते एखाद्या गायीचे दूध काढल्याप्रमाणे. तिच्या पोषणाची योग्य काळजी घेऊन, तिला कोणतीही दुखापत किंवा त्रास होऊ न देता, तिच्या सर्व वासरांना पुरेल असे शिल्लक ठेवून मग जे दूध प्राप्त होईल, तेच ग्रहण करायचे. आजच्या यंत्रयुगात गायींचेच दूध आचळांना यंत्रे लावून काढण्यात येते आणि खर्या आईला फक्त ‘मदर्स डे’ पुरते भेटले जाते.
रेषीय प्रतिमानाद्वारे उभारलेल्या अर्थशास्त्रादि विषयात असे मानले गेले की, नैसर्गिक स्रोत अनंत आहेत आणि त्यांच्या वापरावर कोणतेही बंधन मानायची गरज नाही. या चिंतनातून निर्माण झालेल्या औद्योगिक व्यवस्थेने गेल्या साधारण दीड शतकांत, निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. या सर्वांचे परिणामही याच पाश्चात्य जगाच्या लक्षात येऊ लागल्याने, त्यांनीच निसर्गसंवर्धनासाठी अनेक संस्थांचीही निर्मिती केली. पर्यावरणीय प्रश्न आणि त्यांचे उत्तर शोधण्याची निकड हे काही आज कोणाला समजावून किंवा पटवून देण्याचे विषय राहिलेले नाहीत, इतके त्यांचे परिणाम उघड आहेत. पण, या सर्व पाश्चात्य प्रयत्नांचे सैद्धांतिक मूळ तपासल्याशिवाय त्यांच्या यशस्वीतेची खात्री देता येणार नाही. आधीच्या लेखांमध्ये पाहिल्याप्रमाणे पाश्चात्य चिंतन हे मानवकेंद्रित असून, मानवी सुखाचा विचार तिथे सर्वोपरी आहे. त्यामुळे मानवी भोगांची शाश्वतता टिकावी, सुखलालसेचे दुष्परिणाम इतके होऊ नयेत की, मानवी जीवनच अशक्य होऊन जाईल इतपत बंधने पाश्चात्य विचारात मान्य होतात.
त्यातही तंत्रज्ञानाच्या वापराने काही समस्या टाळण्याचेही प्रयत्न होतात. पण तंत्रज्ञान म्हणजे काही जादू नव्हे, त्याने फक्त आजचे प्रश्न उद्यावर (किंवा युरो-अमेरिकेतील प्रश्न आफ्रिकेत) ढकलता येतात, ते पूर्णपणे सुटत नाहीत. परंतु, जीवनाचे मूळ प्रतिमान हे ‘आम्ही कोण म्हणून काय पुसता? आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जग तये आम्हास खेळावया’ हे असल्याने, येनकेनप्रकारे सृष्टीचे शोषण आणि मानवी लालसांची पूर्ती हेच सर्व व्यवस्थांचे अंतिम ध्येय होतेे. निसर्गाला आपल्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे मानल्याने वृत्तीत एक प्रकारची निसर्गपराङ्मुखता येत जाते आणि कृत्रिम जीवनास प्राधान्य मिळत जाते. यातूनच कडक उन्हाळी प्रदेशात असलेली वातानुकूलित कार्यालये, रात्रीच्या अंधारात शेकडो दिव्यांनी लख्ख रोषणाई करून खेळवले जाणारे खेळांचे सामने, अर्ध्या पृथ्वीला वळसा घालून जगभरात विकली जाणारी कॅलिफोर्नियाची संत्री आणि यासाठी वापरली जाणारी प्रचंड ऊर्जा, खनिजे, जलवायू असे एक न संपणारेच चक्र निर्माण होते. या शर्यतीत धावणे हे अनिवार्यच होऊन बसते आणि मग कितीही दिवे लावून रात्र पंक्चरण्याचा प्रयत्न केला, तरी काळोख पंपला जातच राहतो.
हिंदू जीवनदृष्टीची स्वाभाविक निसर्गाभिमुखता या सर्व प्रतिमानाच्या विरुद्ध ठामपणे उभी राहताना आपल्याला दिसते. सुखाचा शाश्वत विचार आपण आधी पाहिलाच आहे. सृष्टीच्या दोहनाचा विचार हा त्याच विचाराचा निसर्गसंवर्धनात्मक आयाम आहे. मूलतः मानवी समाज आणि संपूर्ण सृष्टी यांच्यातील एकात्मता लक्षात घेतल्यास, एकाचा बळी देऊन दुसर्याच्या सुखाची प्राप्ती शक्य नाही हे सहज ध्यानात येते. वनसंपत्ती, पशुधन, शेती याकडे पाहण्याचा भिन्न दृष्टिकोन तर इथे स्पष्टच आहे; परंतु औद्योगिकीकरणाचे प्रमाण, त्याचे पृथ्वीवरील वितरण, त्याचे जलवायू चक्रांवरील परिणाम या सर्वांचा पुनर्विचार या दोहनाच्या तत्त्वाआधारे पुन्हा करण्याची आज आवश्यकता आहे. नैसर्गिकरित्या मिळणार्या पदार्थांवर आपण जितक्या प्रक्रिया करतो, तितक्या स्तराचा कृत्रिम पदार्थ आपण सेवन करत असतो. जीवनातील या कृत्रिमतेचाही निसर्गावर विपरीत परिणाम होत असतो. तेव्हा मानवी जीवनातील कृत्रिमतेच्या प्रमाणाचाही पुनर्विचार आज आवश्यक आहे.
आधुनिक जीवनशैलीची ऊर्जेची आवश्यकता, तिच्या कृत्रिमतेच्या प्रमाणात वाढत जात आहे. नवनवीन ऊर्जास्रोत शोधणे हा या समस्येवरील शाश्वत उपाय नाही. परंतु, प्रचलित शोषणाधारित प्रतिमानात व्यवस्थांचे अधिकाधिक सक्षमीकरण हाच पर्याय असतो. मूलभूत क्रांती हवी असेल, तर मूलभूत प्रतिमानातच बदल करावा लागेल. पाश्चात्य वैचारिक वसाहतवादापासून मुक्ती मिळवून भारताने स्वतःच्या वैचारिक संचिताच्या पायावर उभे राहणे, हे निसर्गसंवर्धनाच्या जागतिक प्रयत्नांसाठी आज आवश्यक आहे.
- डॉ. हर्षल भडकमकर