‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, कठोर प्रहारासाठी सदैव सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी
29-May-2025
Total Views | 8
नवी दिल्ली, पंतप्रधानांनी पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारले. ते ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाकिस्तानने हे समजून घ्यावे की आम्ही तीन वेळा घुसून हल्ला केला आहे. पाकने पुन्हा दहशतवादी हल्ला घडविल्यास आणखी जोरदार प्रहार करण्यात येईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथून पाकिस्तानला इशारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे 1010 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, भारताने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे. आता जर दहशतवादी हल्ला झाला तर शत्रूला मोठी किंमत मोजावी लागेल. पाकिस्तानने हे समजून घ्यावे की आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर तीन वेळा हल्ला केला आहे. त्यांना हे कळले पाहिजे की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. भारताला आता दहशतवाद्यांचा निवडकपणे खात्मा कसा करायचा हे माहित आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने पाकिस्तानने कधीही विचार न केलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले की, पाकिस्तानकडे जगाला देण्यासाठी काहीही सकारात्मक नाही. जेव्हापासून ते अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून त्यांनी फक्त दहशतवादालाच पोसले आहे. फाळणीपासून पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवत आहे. दहशतवाद आणि नरसंहार हे पाकिस्तानी सैन्याचे वैशिष्ट्य बनले आहे, असाही घणाघात पंतप्रधांनी यावेळी केला आहे.
बंगाल नाकारणार ‘निर्मम’ सरकार
आज पश्चिम बंगाल एकाच वेळी अनेक संकटांनी वेढलेले आहे. पहिले संकट म्हणजे समाजात पसरलेला हिंसाचार आणि अराजकता. दुसरे संकट म्हणजे माता आणि बहिणींच्या असुरक्षिततेचे, त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या जघन्य गुन्ह्यांचे. तिसरे संकट म्हणजे तरुणांमध्ये पसरलेली तीव्र निराशा, प्रचंड बेरोजगारीचे. चौथे संकट म्हणजे प्रचंड भ्रष्टाचाराचे, येथील व्यवस्थेवरील जनतेचा सतत कमी होत चाललेला विश्वास. पाचवे संकट म्हणजे गरिबांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या स्वार्थी राजकारणाचे. त्यामुळे बंगाली जनता आता ‘निर्मम’ सरकार नाकारणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.