नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. २९ आणि ३० मे रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. परंतू, त्यांचा सिक्कीम दौरा हा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला आहे. या पाश्वभूमीवर मोदी सिक्कीमच्या जनतेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. तसेच उर्वरीत दौऱ्यातील राज्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे ते जाणार असून या राज्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.
गुरुवार, २९ मे रोजी सिक्कीम राज्याचा ५० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने गंगटोकच्या पलजोर स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार होते. परंतू खराब हवामानामुळे मोदींना सिक्कीमला जाणे शक्य झाले नाही. आता पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सिक्कीमच्या लोकांशी संवाद साधणार आहेत. सिक्कीम राज्याचा दौरा रद्द झाला असला तरीही पंतप्रधान मोदींचा उर्वरीत तीन राज्यांचा दौरा होणार आहे.
सिक्कीम राज्य सरकाराने काढलेल्या निवेदनात पंतप्रधान मोदी सिक्कीम दौऱ्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि नामची जिल्ह्यातील ७५० कोटी खर्चाच्या ५०० बेडच्या जिल्हा रुग्णालयाचे उद्धघाटन करणार होते. तसेच अटल अमृत उद्यानातील अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार होते. सांगाचोलिंग प्रवासी रोपवेचे उद्धघाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे सिक्कीमच्या राणीपूलपासून ते गंगटोक पर्यंतचे सर्व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली होती. पंतप्रधान मोदींचा सिक्कीम राज्याचा हा दुसरा दौरा होता.
ठरलेल्या दौऱ्यानुसार, पंतप्रधान मोदी दि. २९ आणि ३० रोजी सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्याची सुरुवात सिक्कीमधून होणार होती. पण खराब हवामानाच्या वातावरणामुळे ते सिक्कीमला जाऊ शकले नाही.