परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्गाचे नामफलक ४८ तासांत पुन्हा बसवले
24-May-2025
Total Views | 14
मुंबई : अंधेरी चिमटपाडा परिसरातील Inconica हॉटेलपासून अंधेरी-कुर्ला मार्गापर्यंतच्या रस्त्याचे नामकरण परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्ग असे करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने याठिकाणी नामफलकही बसवले होते. मात्र, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान नामफलक हटवण्यात आला व नंतर तो दीर्घकाळ लावण्यात आलेला नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली. शुक्ला यांनी तत्काळ दखल घेत अवघ्या ४८ तासांत सदर मार्गावर पुन्हा नामफलक बसवण्याची कार्यवाही केली.
या त्वरित प्रतिसादाबद्दल अनिल गलगली यांनी त्यांचे आभार मानले. सदर माहिती स्थानिक समाजसेवक साहब सिंह आणि सरबजीत सिंह यांनी अनिल गलगली यांच्यापर्यंत पोहोचवली होती. नव्याने बसविण्यात आलेल्या नामफलकाचे उद्घाटन आमदार पटेल मूरजी यांच्या हस्ते करण्यात आले.
परमवीर चक्र विजेते सूबेदार जोगिंदर सिंह : बुमलाचे शूरवीर
१९६२ सालच्या भारत-चीन युद्धादरम्यान सूबेदार जोगिंदर सिंह अरुणाचल प्रदेशातील बुमला पोस्ट वर तैनात होते. २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनच्या सुमारे २०० सैनिकांनी भारतावर हल्ला केला, तेव्हा फक्त काही मोजके भारतीय जवान तिथे तैनात होते.
सूबेदार जोगिंदर सिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अतुलनीय शौर्य दाखवत चीनच्या सैन्याचा प्रखर प्रतिकार केला. लढाईदरम्यान त्यांच्या मांडीला गोळी लागूनही त्यांनी थांबणे टाळले, स्वतः पट्टी बांधून ते अखेरपर्यंत लढत राहिले. त्यांनी अनेक चीनी सैनिकांना ठार केले.
शेवटी ते चीनच्या ताब्यात गेले. त्यानंतर भारत सरकारने त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले. ही गोष्ट चीनला समजल्यानंतर त्यांनीही त्यांचा सन्मान राखत १९६३ मध्ये त्यांच्या अस्थी सन्मानपूर्वक त्यांच्या बटालियनला परत दिल्या.