जयपूर : (PM Narendra Modi On Operation Sindoor) राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना गुरूवारी दि. २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. यावेळी भारताने पाकविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना "हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही नव्या न्यायाची भावना आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे रागातून नाही, तर न्यायासाठी राबवले गेले. हा फक्त आक्रोश नाही, हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे.", असे प्रतिपादन केले आहे.
हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही नव्या न्यायाची भावना आहे
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ज्या लोकांनी आपल्या लेकी-बहिणींचं सौभाग्य हिरावून घेतलं, त्यांना आपण कायमचं मातीत गाडलं. जे लोक भारताच्या शांततेला कमकुवतपणा, दुबळेपणा समजत होते, आणि आपल्या शस्त्रांचा अहंकार करत होते, आज तेच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही आहे नव्या न्यायाची भावना. हे ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे जे रागातून नाही, तर न्यायासाठी राबवलं गेलं. हा फक्त आक्रोश नाही. हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे. हे भारताचे नवे स्वरूप आहे. याआधी घरात घुसून वार केला होता, आता थेट छातीवर प्रहार केला आहे. दहशतवादाची नांगी ठेचण्याची हीच रणनीती आहे, हीच पद्धत आहे, हा नवा भारत आहे."
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत दहशतवादाचा सामना करण्यासाठी त्रिसूत्री
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी तीन सूत्रं निश्चित केली आहे. पहिले - भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, त्याची वेळ आपली निश्चित करेल, पद्धतही आपली सेना ठरवेल आणि अटी देखील आपल्या असतील. दुसरे-अण्वस्त्र हल्ल्यांच्या पोकळ धमक्यांना भारत घाबरणार नाही. तिसरे आम्ही दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि दहशवाद्यांचे म्होरके यांना वेगळं मानणार नाही. त्यांना एकच मानले जाईल. पाकिस्तानचा हा ‘स्टेट’ आणि ‘नॉन-स्टेट’ अॅक्टरचा खेळ आता खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तान भारताशी थेट लढाईत कधीही जिंकू शकला नाही. प्रत्येक वेळेस त्याला हार पत्करावी लागली. म्हणूनच त्यांनी दहशतवादाचं हत्यार निवडलं. वर्षानुवर्षे हीच नीती चालू होती. निर्दोष लोकांना मारून भारतात भीतीचं वातावरण निर्माण केलं जात होतं. पण आता पाकिस्तान एक गोष्ट विसरलाय, ती म्हणजे आता भारतमातेच्या सेवेसाठी मोदी उभे आहेत." पुढे ते म्हणाले, "माझे मन शांत आहे, पण रक्त सळसळत आहे. माझ्या धमन्यांमधून रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतंय"
पाकिस्तान एक बात भूल गया कि अब मां भारती का सेवक मोदी यहां सीना तानकर खड़ा है।
मोदी का दिमाग ठंडा है, ठंडा रहता है, लेकिन मोदी का लहू गर्म होता है।
अब तो मोदी की नसों में लहू नहीं, गर्म सिंदूर बह रहा है।
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\