जयपूर : (PM Narendra Modi On Operation Sindoor at Bikaner) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भाषणापूर्वी त्यांना बिकानेर जिल्ह्यातील करणी माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल देखील महत्त्वाचे विधान केले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बिकानेर येथे रेल्वे, रस्ते, वीज, पाणी आणि इतर अनेक विकास कामांसंदर्भातील प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले की, "मी येथे करणी मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. करणी मातेच्या आशीर्वादाने विकसित भारत तयार करण्याचा आपला संकल्प अधिक मजबूत होत आहे. थोड्या वेळापूर्वी विकासाकामांसंबंधित २६ हजार कोटी रूपयांच्या योजनांचे येथे भूमीपूजन आणि लोकार्पण झाले आहे."
'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी पुढे ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना म्हणाले की, "२२ तारखेला केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी २२ मिनिटांत दहशतवाद्यांच्या ९ सर्वात मोठ्या तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. जगाने आणि देशाच्या इतर शत्रूंनीही पाहिले की जेव्हा सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा त्याचा परिणाम काय होतो. तो गोळीबार पहलगाम येथे झाला होता, मात्र त्या गोळ्यांनी १४० कोटी देशवासीयांच्या छातीवर जखमा केल्या होत्या. यानंतर प्रत्येक देशावासीयांनी एकत्र येत संकल्प केला होता की दहशतवादाला संपवून टाकू त्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देऊ. आज तुमच्या आशीर्वादाने देशाच्या लष्कराच्या शौयनि आपण ती प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. आमच्या सरकारने तिन्ही सैन्य दलांना पूर्णपणे मोकळीक दिली होती आणि तिन्ही सैन्य दलांनी मिळून असं चक्रव्यूह रचले की पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\