छत्रपती संभाजीनगर : उबाठा आता एक मुस्लीम लीग झाली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून स्वत:ला मुस्लीम लीग असे म्हटले पाहिजे, असा घणाघात मंत्री संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर केला आहे. शुक्रवार, २ मे रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "उबाठा आता एक मुस्लीम लीग झाली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून स्वत:ला मुस्लीम लीग असे म्हटले पाहिजे. उबाठा गट सोडून काँग्रेससहित सर्व राजकीय पक्षांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. ओवैसीसारख्या कट्टर जातीवादी नेत्यानेसुद्धा देशाबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. याचा अर्थ भारतात अशी कोणतीही घटना घडल्यास आम्ही सर्व एक आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे."
"उबाठा गटाच्या नेत्यांना कोणत्या परिस्थिीत काय बोलावे याचा राजकीय लवलेश नाही. यांच्यापेक्षा ओवैसी बरे आहेत. त्यांनी देशाबद्दल स्वाभीमान तरी दाखवला. देश कोणत्या संकटात आहे याचे गांभीर्यच या मुर्ख लोकांना राहिलेले नाही. तुम्ही देशासोबत उभे राहणार आहात की, नाही? ओवैसीकडून काहीतरी शिका. ते पाकड्यांना काय बोलले ते ऐका. उबाठाचे लोक इतके व्यस्त आहेत की, विरोधी पक्षांच्या एकत्रित बैठकीला जाण्यासाठीही त्यांना वेळ नाही. उबाठा गटाने यावेळी सर्वात मोठा नालायकपणा केला आहे. देशाच्या अस्तित्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना उरलेला नाही. देशहिताचा विषय आल्यावर काँग्रेससारखा पक्षसुद्धा सरकारसोबत उभे राहण्याच्या मनस्थितीत येतात. पण उबाठावाले राजीनामा मागत इकडे तिकडे पळत आहेत. त्यांना देशाबद्दलचे प्रेम माहिती नाही तर केवळ मतांचे राजकारण माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास हे घरात रडत बसतील," अशी टीकाही त्यांनी केली.
...तर पाकिस्तानला पळता भुई थोडी होईल!
"पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे हे प्रत्येक भारतीयाचे म्हणणे आहे. पाकिस्तान नेस्तनाबूत करण्याची सगळ्यांची ईच्छा असून मोदी सरकार त्या अनुषंगाने पावले उचलत आहेत. लवकरच त्याचे पडसाद पाहायला मिळतील. पाकिस्तानच्या प्रसारण मंत्री रात्री २ वाजता पत्रकार परिषद घेण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पाकिस्तानला भारताची दहशत असून त्या भीतीपोटी त्यांनी रात्री पत्रकार परिषद घेतली. आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानला पळता भुई थोडी होईल," असा विश्वासही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.